गजानन विजय ग्रंथ सर्व अध्याय | Gajanan vijay granth sarv adhyay

shri gajanan vijay granth
vijay granth marathi

    gajanan vijay granth adhyay 1 

    अध्याय १

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥
    जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती ।
    जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥

    कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन ।
    मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥

    तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं ।
    कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥

    म्हणून आदरें वंदना । करीतसे मी तुझ्या चरणां ।
    सुरस करवी पद्मरचना । दासगणूच्या मुखानें ॥४॥

    मी अज्ञान मंदमती । नाहीं काव्यव्युत्पत्ति ।
    परी तूं वास केल्या चित्तीं । कार्य माझें होईल हें ॥५॥

    आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती ।
    जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥६॥

    त्या जगदंबेकारण । असो माझें साष्टांग नमन ।
    मी लेंकरुं आहें अजाण । अभिमान माझा धरावा ॥७॥

    तुझ्या कृपेची अगाध थोरी । पांगळाही चढे गिरी ।
    मुका सभेमाझारीं । देई व्याख्यान अस्खलित ॥८॥

    त्या तुझ्या कीर्तीला । कमीपणा न आणी भला ।
    साह्य दासगणूला । ग्रंथरचनेस करी या ॥९॥

    आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा ।
    सच्चिदानंदा रमेशा । "पाहि माम्" दिनबंधो ॥१०॥

    तूं सर्वसाक्षी जगदाधार । तूं व्यापक चराचर ।
    कर्ता करविता सर्वेश्वर । अवघे कांहीं तूंच तूं ॥११॥

    जग, जन आणि जनार्दन । तूंच एक परिपूर्ण ।
    सगुण आणि निर्गुण । तूंच कीं रे मायबापा ॥१२॥

    ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा ।
    तेथें काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥१३॥

    रामकृपा जेव्हां झाली । तेव्हां माकडां शक्ति आली ।
    गोप तेही बनले बली । यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥

    तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचें प्रयोजन ।
    चरणीं होतां अनन्य । तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥

    ऐसा संतांनीं डांगोरा । तुझा पिटला रमावरा ।
    म्हणून आलों तुझ्या द्वारां । आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥

    हें संतचरित्र रचावया । साह्य करी पंढरीराया ।
    माझ्या चित्तीं बसोनिया । ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥

    हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा ।
    ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥१८॥

    तुझें साह्य असल्यावर । काळाचाही नाहीं दर ।
    लोखंडासी भांगार । परीस करुन ठेवीतसे ॥१९॥

    तुझी कृपा हाच परीस । लोखंड मी गणूदास ।
    साह्य करी लेंकरास । परतें मजला लोटूं नको ॥२०॥

    तुला अशक्य कांहीं नाहीं । अवघेंच आहे तुझ्या ठाईं ।
    लेंकरासाठीं धांव घेई । ग्रंथ सुगम वदवावया ॥२१॥

    माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता ।
    तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥२२॥

    हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी ।
    ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥२३॥

    आतां वंदन दत्तात्रया । पाव वेगीं मसीं सदया ।
    गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥२४॥

    आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर ।
    ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥२५॥

    आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा ।
    दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥२६॥

    गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर । श्रीतुकाराम देहूकर ।
    हे भवाब्धीचें तारुं थोर । त्या श्रीरामदासा नमन असो ॥२७॥

    हे शिर्डिकर सांई समर्था । वामनशास्त्री पुण्यवंता ।
    दासगणूसी अभय आतां । तुमचें असो द्या संत हो ॥२८॥

    तुम्हां अवघ्यांच्या कृपेनें । मी हें करीन बोलणें ।
    दासगणू मी तुमचें तान्हें । कठोर मजविषयीं होऊं नका ॥२९॥

    जी कां खरी माया असते । तीच बोलाया शिकविते ।
    तुमचें माझें असें नातें । मायलेंकापरी हो ॥३०॥

    लेखणी काढी अक्षर । परी तो तिच्यांत नाहीं जोर ।
    ती निमित्तकारण साचार । लेखनरुपी कार्याला ॥३१॥

    दासगणू लेखणी येथ । तुम्ही धारण करा ती अवघे संत ।
    ग्रंथरचना रसभरित । हीच आहे प्रार्थना ॥३२॥

    आतां श्रोते सावधान । संतकथेचें करा श्रवण ।
    करोनिया एकाग्र मन । निजकल्याण व्हावया ॥३३॥

    संत हेच भूमिवर । चालते बोलते परमेश्वर ।
    वैराग्याचे सागर । दाते मोक्षपदाचे ॥३४॥

    संत हेच सन्नीतीची । मूर्ति होय प्रत्यक्ष साची ।
    संत भव्य कल्याणाची । पेठ आहे विबुध हो ॥३५॥

    त्या संतचरित्रास । श्रवण करा सावकाश ।
    आजवरी ना कवणास । संतांनीं या दगा दिला ॥३६॥

    ईश्वरी तत्त्वांचे वाटाडे । संत हेची रोकडे ।
    हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे । भरले असती प्रत्यक्ष ॥३७॥

    संतचरणीं ज्याचा हेत । त्याचा ऋणी रुक्मिणीकांत ।
    आतां मलरहित करा चित्त । गजाननचरित्र ऐकावया ॥३८॥


    भरतखंडामाझारीं । संत झाले बहुतापरी ।
    ही न पर्वणी आली खरी । अवांतर देशाकारणें ॥३९॥

    जंबुद्वीप हें धन्य धन्य । आहे पहिल्यापासोन ।
    कोणत्या सुखाची ही वाण । येथें न पडली आजवरी ॥४०॥

    याचें हेंच कारण । या भूमीस संतचरण ।
    अनादि कालापासोन । लागत आले आहेत कीं ॥४१॥

    नारद, ध्रुव, कयाधूकुमर । उद्धव, सुदामा, सुभद्रावर ।
    महाबली अंजनीकुमर । अजातशत्रू धर्मराजा ॥४२॥

    शंकराचार्य जगद्गुरु । जे पदनतांचे कल्पतरु ।
    जे अध्यात्मविद्येचे मेरु । याच देशीं झाले हो ॥४३॥

    मध्व-वल्लभ-रामानुज । याचा ऋणी अधोक्षज ।
    ज्यानें धर्माची राखिली लाज । निज सामर्थ्य दावोनिया ॥४४॥

    नरसीमेहता तुलसीदास । कबीर कमाल सुरदास ।
    गौरंग-प्रभूच्या लीलेस । वर्णन करावें कोठवरी ? ॥४५॥

    राजकन्या मिराबाई । तिच्या भक्तीस पार नाहीं ।
    जिच्यासाठीं शेषशायी । प्राशिता झाला विषातें ॥४६॥

    गोरख-मच्छेंद्र जालंदर । जे का योगयोगेश्वर ।
    ज्यांचा नवनाथ भक्तिसार । ग्रंथ असे लीलेचा ॥४७॥

    ज्यांनीं नुसतीच हरिभक्ति । करुन साधिला श्रीपती ।
    ते नामा नरहरी सन्मति । जनी कान्हो संतसखू ॥४८॥

    चोखा-सावता-कूर्मदास । दामाजीपंत पुण्यपुरुष ।
    ज्यांच्या कारणें वेदरास । गेला महार होऊन हरी ॥४९॥

    मुकुंदराज जनार्दन । बोधला निपट निरंजन ।
    ज्यांचीं चरित्रें-गायन । केलीं मागें महिपतींनीं ॥५०॥

    म्हणून त्यांचीं नांवें येथ । मी न साकल्यें आतां देत ।
    नुसते सांगतों वाचा ग्रंथ । भक्तिविजय भक्तमाला ॥५१॥

    त्यानंतर जे जे झाले । त्या त्या संतां मी गाइले ।
    ग्रंथ असती तीन केले । ते पहा म्हणजे कळेल कीं ॥५२॥

    त्या संतांच्या तोडीचा । संत श्रीगजानन साचा ।
    या अवतारी पुरुषाचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥५३॥

    मीं जीं मागें गाईलीं । संतचरित्रें असतीं भलीं ।
    तीं सारांशरुपें सांगितलीं । त्रय ग्रंथातून विबुध हो ॥५४॥

    आतां हें सांगोपांग । चरित्र कथितों ऐका चांग ।
    मम सुदैवें आला योग । हें चरित्र रचण्याचा ॥५५॥

    जो प्रथमतांच मी पाहिला । आकोटासन्निध संत भला ।
    तोच मागें राहिला । त्याचें ऐका कारण ॥५६॥

    माळा आधीं ओविती । मग मेरुमणी जोडिती ।
    तीच आजी झाली स्थिति । ह्या चरित्र रचण्याची ॥५७॥

    शेगांव नामें वर्हाडांत । ग्राम आहे प्रख्यात ।
    खामगांव नामें तालुक्यांत । व्यापार चाले जेथ मोठा ॥५८॥

    ग्राम लहान साचार । परि वैभव त्याचें महाथोर ।
    ज्याचें नांव अजरामर । झालें साधूमुळें जगत्रयीं ॥५९॥

    त्या शेगांव सरोवरीं भलें । गजानन कमल उदया आलें ।
    जें सौरभें वेधितें झालें । या अखिल ब्रह्मांडा ॥६०॥

    हा शेगांव खाणीचा । हिरा गजानन होय साचा ।
    प्रभाव त्या अवलियाचा । अल्पमतीनें वाणितों मी ॥६१॥

    तें आतां अवधारा । गजाननचरणीं प्रेम धरा ।
    येणें तुमचा उद्धार खरा । होईल हें विसरुं नका ॥६२॥

    गजाननचरित्र मेघ थोर । तुम्ही श्रोते अवघे मोर ।
    चरित्ररुपीं वर्षतां नीर । नाचाल वाटे निःसंशय ॥६३॥

    शेगांवचे पौरवासी । परम भाग्याचे निश्चयेंसी ।
    म्हणून लाधले तयांसी । गजानन हें संतरत्न ॥६४॥

    जेव्हां करावें लागे पुण्य । तेव्हांच लाभती संतचरण ।
    संतश्रेष्ठ देवाहून । येविषयीं शंका नसे ॥६५॥

    रामचंद्र पाटलांनीं । केली माझी विनवणी ।
    पंढरी क्षेत्रीं येऊनी । कार्तिकीच्या वारीला ॥६६॥

    माझ्या मनीं हेत होता । गावें गजानन-चरित्रा ।
    परी त्याची तत्त्वतां । संगत नाहीं लागली ॥६७॥

    त्या माझ्या वासनेची । पूर्तता करण्यासाठीं ।
    केली रामचंद्राची । योजना या समर्थें ॥६८॥

    खऱ्या संताचें धोरण । न कळे कोणालागोन ।
    महापुरुष गजानन । आधुनिक संत चूडामणी ॥६९॥

    या महापुरुषाचा । ठावठिकाण कोणचा ।
    वा पत्ता त्यांच्या जातीचा । इतिहासदृष्टया न लागे कीं ॥७०॥

    जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण । न कळे कोणालागून ।
    ते ब्रह्मास पाहून । निश्चय त्याचा करणें असे ॥७१॥

    जो कां हिरा तेजमान । पूर्णपणें असे जाण ।
    तेज त्याचें पाहोन । ज्ञाते तल्लीन होती कीं ॥७२॥

    तेथ त्या हिर्याची । खाण आहे कोणाचि ।
    हे विचारीं आणण्याची । गरज मुळीं राहात नसे ॥७३॥

    ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगांवनगरीं ।
    शके अठराशाभीतरीं । माघ वद्य सप्तमीला ॥७४॥

    कोणी कोणी म्हणती जन । श्रीसमर्थांचें जें कां स्थान ।
    त्या सज्जनगडाहून । या देशीं आले हे ॥७५॥

    परियाला पुरावा । सबळ ऐसा नाहीं बरवा ।
    परी कांहीं तरी असावा । अर्थ त्याच्या म्हणण्यांत ॥७६॥

    लोक अवघे भ्रष्ट झाले । नाना यातनें गांजले ।
    त्यांच्यासाठीं वाटतें केलें । कौतुक ऐसें समर्थांनीं ॥७७॥

    जगाचा करण्या उद्धार । गजाननरुपें अवतार ।
    धरुन आले महीवर । पुन्हां समर्थ सिद्धयोगी ॥७८॥

    कोणत्याही कलेवरी । योगीपुरुष प्रवेश करी ।
    ऐसा प्रकार भूमीवरी । जगद्गुरुंनीं केला असे ॥७९॥

    गोरख जन्मला उकिरड्यांत । कानीफा गजकर्णांत ।
    चांगदेव नारायण डोहांत । योनीवांचून प्रगटले ॥८०॥

    तैसेंच येथें कांहींतरी । झालें असावें निर्धारी ।
    गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥८१॥

    हें त्यांच्या लीलेवरुन । पुढें कळेल तुम्हां लागून ।
    योगाचें अगाध महिमान । त्याची सरी न ये कोणा ॥८२॥

    शेगांवीं माघमासीं । वद्य सप्तमी ज्या दिवशीं ।
    हा उदय पावला ज्ञानराशी । पदनतातें तारावया ॥८३॥

    त्या वेळची तुम्हां कथा । सांगतों मी ऐका आतां ।
    एक भाविक गृहस्थ होता । नाम ज्याचें देविदास ॥८४॥

    हा देविदास सज्जन । पातूरकरांचा वंशज जाण ।
    शाखा ज्यांची माध्यंदिन । मठाधिपती होता तो ॥८५॥

    त्याच्या एका मुलाची । ऋतुशांति होती साची ।
    त्यानिमित्त भोजनाची । तयारी होती त्याचे घरा ॥८६॥

    उष्टया पत्रावळी रस्त्यावर । टाकिल्या होत्या साचार ।
    घराचिया समोर । त्या देविदास विप्राच्या ॥८७॥

    तो गजानन समर्थसिद्धयोगी । बसले होते तया जागीं ।
    एक बंडी होती अंगीं । जुन्या पुराण्या कापडाची ॥८८॥

    कोणत्याहि उपाधीचें । नांव नव्हतें जवळीं साचें ।
    पात्र पाणी प्यावयाचें । होता एक भोपळा ॥८९॥

    कच्ची चिलीम हातांत । जी होती तयांची स्वकृत ।
    कुंभाराच्या भट्टीप्रत । जिनें नव्हतें पाहिलें ॥९०॥

    नासाग्र दृष्टि मुद्रा शांत । तपोबल अंगीं झळकत ।
    प्राचीच्या वालरवीवत् । वर्णन किती करावें ॥९१॥

    मूर्ति अवघी दिगंबर । भाव मावळला आपपर ।
    आवडनिवड साचार । राहिली न जवळी जयाच्या ॥९२॥

    ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।
    शोधन पत्रावळींचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥

    शीत पडल्या दृष्टीप्रत । तें मुखीं उचलुनी घालीत ।
    हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥

    कां कीं गर्जोन सांगे श्रुती । अन्न हेंच ब्रह्म निगुती ।
    "अन्नम् ब्रह्मेति" ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥

    त्याची पटवावया खण । शितें वेंचती दयाघन ।
    त्याचा सामान्य जनांलागून । भावार्थ तो कळला नसे ॥९६॥

    बंकटलाल आगरवाला । होता रस्त्यानें चालला ।
    त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥

    दामोदरपंत कुलकर्णी । त्यांच्या स्नेह्याचें नांव जाणी ।
    दोघे तो प्रकार पाहोनी । आश्चर्यचकित जाहले ॥९८॥

    आणि एकमेकांप्रत । बोलूं लागले ऐसें सत्य ।
    कीं याची करणी विपरीत । वेड्यापरी दिसतसे ॥९९॥

    हा अन्नार्थी जरी असतां । तरी पात्र मागून घेता ।
    देवीदासही यातें देता । कां कीं तोही सज्जन ॥१००॥

    द्वारीं आलेला याचक । लावी ना सुज्ञ परत देख ।
    कांहीं न चाले तर्क । कृतीवरुनी याच्या ह्या ॥१॥

    बंकटलाल म्हणे पंतासी । ऐसेच उभें रस्त्यासी ।
    आपण राहूं यत्कृतीसी । अजमावयाकारणें ॥२॥

    खरे साधु पिशापरी । जगीं वागती वरवरी ।
    ऐसी व्यासाची वैखरी । बोलली आहे भागवतांत ॥३॥

    कृतीनें हा दिसे वेडा । परी वाटे ज्ञानगाडा ।
    वा विमल ज्ञानाचा हुडा । असावा कीं प्रत्यक्ष ॥४॥

    ऐसा विचार परस्पर । करुं लागले साचार ।
    रत्न असतां समोर । पारखी तोच जाणे त्या ॥५॥

    पंथें हजारों लोक गेले । परी न कोणी पाहिले ।
    या दोघांवांचून भले । याचा विचार कर हो ! ॥६॥

    हिरे गारा एक्या ठायीं । मिसळल्या असती जगा ठायीं ।
    पारखी तो निवडून घेई । गार टाकून हिऱ्यातें ॥७॥

    प्रथमता तो पुढें झाला । बंकटलाल आगरवाला ।
    गजाननासी विचारण्याला । विनयानें येणें रीतीं ॥८॥

    ह्या पत्रावळीच्या शोधना । कां हो करितां कळेना ।
    क्षुधा असेल आपणां । तरी तरतूद करुं अन्नाची ॥९॥

    त्यानें ऐसें विचारिलें । परि न उत्तर मिळालें ।
    नुसतें वरी पाहिलें । उभयतांच्या मुखाकडे ॥११०॥

    तो सतेज कांती मनोहर । दंड गर्दन पिळदार ।
    भव्य छाती दृष्टि स्थिर । भृकुटी ठायीं झाली असे ॥११॥

    निजानंदीं रंगलेला । ऐसा योगी पाहिला ।
    मौनेंच नमस्कार केला । चित्तीं संतोष पावोनिया ॥१२॥

    देविदासबुवासी । सांगूं लागले प्रेमेंसी ।
    तुम्ही पात्र वाढून वेगेंसी । आणा एक बाहेर ॥१३॥

    देविदासें तैसें केलें । पक्वान्नांनीं भरलेलें ।
    पात्र आणून ठेविलें । द्वारासमोर स्वामीपुढें ॥१४॥

    ठेविलेल्या पात्रावरी । भोजना बैसली समर्थस्वारी ।
    चवी न कशाची अंतरीं । अणुमात्र उरली असे ॥१५॥

    अनुपम ब्रह्मरसाला । जो पिऊन तृप्त झाला ।
    तो कां मागतो गुळवण्याला । मिटक्या मारीत बैसेल ? ॥१६॥

    जो सार्वभौम नृपवर । झाला असे साचार ।
    अशा नरासी जहागीर । मिळाल्यासी प्रेम नुपजे ॥१७॥

    अवघीं पक्वान्नें एक केलीं । आवडनिवड नाहीं उरली ।
    जठराग्नीची तृप्ति केली । दोन प्रहरच्या समयाला ॥१८॥

    बंकटलाल तें पाहून । पंतासी करी भाषण ।
    ह्या वेडा म्हणालों आपण । ती निःसंशय झाली चुकी ॥१९॥

    सुभद्रेसाठीं द्वारकेला । अर्जुन ऐसाच वेडा झाला ।
    व्यवहाराचा विसर पडला । करुं लागला भलभलतें ॥१२०॥

    तैसाच हा ज्ञानजेठी । मुक्तिरुप सुभद्रेसाठीं ।
    वेडा झाला कसवटी । याची आतां घेणें नको ॥२१॥

    धन्य आपुलें शेगांव । दृष्टी पाहिला योगीराव ।
    "निरिच्छा" हा जहागीरगांव । दिला हरीनें जयाला ॥२२॥

    सूर्य माध्यान्हीं आला । भाग भूमीचा तप्त झाला ।
    पांखरें हीं आश्रयाला । जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥२३॥

    ऐशा भर उन्हांत । हा बैसला आनंदांत ।
    हा ब्रह्मची होय साक्षात् । भय ना कशाचें उरलें या ॥२४॥

    हा जेवळा यथेच्छपणीं । तुंब्यामध्यें नाहीं पाणी ।
    तें पंता या लागुनी । आपण देऊं आणून ॥२५॥

    पुसूं लागले दामोदर । तुंब्यामध्यें नाहीं नीर ।
    मर्जी असल्या हा चाकर । पाणी द्याया तयार असे ॥२६॥

    ऐसे शब्द ऐकिले । समर्थांनीं हास्य केलें ।
    उभयतांसी पाहून वदले । तें ऐका सांगतों ॥२७॥

    तुम्हां गरज असेल जरी । तरी आणून घाला वारी ।
    एक ब्रह्म जगदांतरीं । ओतप्रोत भरलें असें ॥२८॥

    तुम्ही आम्ही भेद तेथ । नाहीं उरला यत्किंचित ।
    परी जगव्यवहार सत्य । आचरिला पाहिजे ॥२९॥

    अन्न भक्षिलें देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी ।
    हा व्यवहार चतुरांनीं । अवश्य पाहिजे जाणिला ॥१३०॥

    म्हणून तुमच्या चातुर्यासी । गरज असल्या तुम्हां साची ।
    तरतूद करा पाण्याची । म्हणजे अवघें संपलें ॥३१॥

    हें भाषण ऐकतां । दोघे हर्षले तत्त्वतां ।
    बंकटलाल म्हणे पंता । आपुलें आहे भाग्य धन्य ॥३२॥

    पाणी आणण्या दामोदर । घरांत गेले साचार ।
    तों इकडे प्रकार । काय घडला तो ऐका ॥३३॥

    कूपाचिया शेजारीं । हाळ होता निर्धारीं ।
    जेथें जनावरें सारीं । पीत होतीं पाण्याला ॥३४॥

    तेथें जाऊन पाणी प्याले । तृप्ततेचे ढेकर दिले ।
    तों इतक्यांत घेऊन आले । पंत पाणी गडव्यांत ॥३५॥

    हां हां तें गढूळ पाणी । समर्था न लावा वदनीं ।
    तें जनावरालागुनी । योग्य आहे प्यावया ॥३६॥

    मीं हें पहा आणिलें नीर । गोड निर्मळ थंडगार ।
    वासित केलें साचार । वाळा घालून यामध्यें ॥३७॥

    ऐसें भाषण ऐकतां । महाराज वदले तत्त्वतां ।
    व्यावहारिक अवघ्या कथा । ह्या न सांगा आम्हां तुम्ही ॥३८॥

    हें अवघें चरचर । ब्रह्में व्याप्त साचार ।
    तेथें गढुळ, निर्मळ वासित नीर । हे न भेद राहिले ॥३९॥

    पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढुळ तोच पाहे ।
    सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥१४०॥

    पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा ।
    ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥४१॥

    तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन ।
    यांचेंच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥४२॥

    ऐसी ऐकतां समर्थवाणी । दोघे गेले गहिंवरोनी ।
    अनन्यभावें समर्थचरणीं । लोळावया तयार झाले ॥४३॥

    तो त्यांचा जाणोन हेत । महाराज निघाले पळत पळत ।
    वायूच्या त्या गतिप्रत । अडथळा जगीं कोण करी ? ॥४४॥

    यापुढील कथा पाही । निवेदन होईल द्वितीयाध्यायीं ।
    अवधान द्यावें लवलाही । त्या श्रवण करावया ॥४५॥

    हा गजाननविजय ग्रंथ । आल्हादवो भाविकांप्रत ।
    हेंच विनवी जोडोन हात । ईश्वरासी दासगणू ॥१४६॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु॥ शुभं भवतु ॥
    ॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 2

    अध्याय २

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जयजय अज अजिता सर्वेश्वरा । हेचंद्रभागातटविहारा ।
    पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा । दीनबंधो पाहि माम् ॥१॥

    तुझ्या वशिल्यावांचून । अवघेंच देवा आहे शीण ।
    कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण विचारी मढ्याते ॥२॥

    सरोवराची दिव्य शोभा । तोयामुळें पद्मनाभा ।
    रसभरीत आंतला गाभा । टरफलातें महत्त्व आणी ॥३॥

    तुझी कृपा त्याच परी । शरणांगतातें समर्थ करी ।
    पाप ताप दैन्य वारी । हेंच आहे मागणें ॥४॥

    मागले अध्यायीं झालें कथन । समर्थ गेले निघून ।
    तेणें बंकटलाला लागून । हुरहूर वाटूं लागली ॥५॥

    गोड न लागे अन्नपाणी । समर्थांचा ध्यास मनीं ।
    न हाले दृष्टीपासोनी । गजाननाचें रुप तें ॥६॥

    जिकडे पहावें तिकडे भास । होवो लागला त्यांचा खास ।
    याचें नांव श्रोते ध्यास । उग्या नसती पोरचेष्टा ॥७॥

    चुकलेल्या धेनूची । वत्स शुद्धि करी साची ।
    तैसी बंकटलालाची । स्थिति झाली विबुध हो ! ॥८॥

    हें हितगुज सांगावया । जागा नव्हती कोठें तया ।
    वडिलांपासीं बोलावया । छाती त्याची होईना ॥९॥

    ऐशा रीति चित्तीं भलें । विचाराचें काहूर झालें ।
    शेगांव अवघें धुंडाळिलें । परी न पत्ता लागला ॥१०॥

    घरीं येतां वडील पुसती । भवानी राम सन्मती ।
    बाळा तुझी आज वृत्ती । का रे झाली चंचळ ॥११॥

    चित्तीं उत्साह दिसेना । वदनीं दिसे म्लानपणा ।
    ऐशा असह्य यातना । होती कशाच्या सांग मज ? ॥१२॥

    तूं पोर्‍या तरणा ज्वान । नाहीं कशाची तुला वाण ।
    ऐसें साच असोन । चिंतातुर दिसतोसी ॥१३॥

    किंवा शरीरीं कांहीं व्याधी । होतसे ती सांग आधीं ।
    चोरुन पुत्र ठेवी न कधीं । गोष्ट कोणती पित्याला ॥१४॥

    कांहीं तरी सांगून । केलें पित्याचें समाधान ।
    पुन्हा शोधाकारण । फिरुं लागला शेगांवीं ॥१५॥

    बंकटलालाचे शेजारीं । एक होते सदाचारी ।
    घरीं होती जमेदारी । परी अभिमान नसे त्याचा ॥१६॥

    ते देशमुख रामाजीपंत । वयानें वृद्ध अत्यंत ।
    बंकटलालानें इत्यंभूत । हकीकत त्यांना निवेदिली ॥१७॥

    ते बोलले बंकटलाला । तुझा वृत्तान्त मी ऐकिला ।
    तूं जो पुरुष कथिसी मला । तो योगी असावा कोणीतरी ॥१८॥

    योग्यावांचुनी ऐशा क्रिया । मिळती न कोठें पाहावया ।
    पूर्वसुकृता वांचोनिया । होणें न दर्शन अशाचें ॥१९॥

    तूं घेतलें दर्शन । जन्म तुझा धन्य धन्य ।
    भेटतां ते तुजलागून । ने मलाही दर्शना ॥२०॥

    ऐशा स्थितींत दिवस चार । गेले निघून साचार ।
    बंकटलालासी तीळभर । विसर न पडे तयाचा ॥२१॥

    गोविंदबुवा टाकळीकर । होते एक कीर्तनकार ।
    ज्यांच्या कीर्तनीं शारंगधर । प्रसन्नचित्त होतसे ॥२२॥

    लौकिक यांचा वर्‍हाडांत । होता मोठया प्रमाणांत ।
    ते आले फिरत फिरत । कीर्तन कराया शेगांवीं ॥२३॥

    शंकराच्या मंदिरीं । झाली कीर्तनाची तयारी ।
    धांवो लागल्या नरनारी । कीर्तन ऐकायाकारणें ॥२४॥

    बंकटलालही तेथें आला । कीर्तन श्रवणासाठीं भला ।
    मध्यें शिंपी भेटला । पितांबर नाम ज्याचें ॥२५॥

    हा शिंपी पितांबर । भोळां भाविक होता फार ।
    त्यासी समर्थाचा समाचार । बंकटलालें कथन केला ॥२६॥

    दोघे कीर्तना चालले । तों अवचित समर्थ पाहिले ।
    मागल्या बाजूस बसलेले । फरसावरी तेधवां ॥२७॥

    मग कशाचें कीर्तन । गेले उभयतां धांवून ।
    जेवीं द्रव्य-घटातें पाहून । कृपण जाय हपापोनी ॥२८॥

    वा चातकातें स्वातिघन । वा मोरासी मेघदर्शन ।
    किंवा तो रोहिणीरमण । चकोर पाहातां आनंदें ॥२९॥

    तैसें उभयतांसी झालें । दूर उभे राहिले ।
    विनयानें बोलूं लागले । कांहीं आणूं का खावया ? ॥३०॥

    महाराज बोलले त्यावरी । तुला गरज असेल जरी ।
    आण झुणकाभाकरी । माळणीच्या सदनांतून ॥३१॥

    बंकटलालें सत्वरीं । चून अर्धी भाकरी ।
    आणोन ठेविली हातावरी । तया योगेश्वराच्या ॥३२॥

    चून भाकरी खात खात । वदले पितांबरासी समर्थ ।
    जा जावोनी ओढ्याप्रत । तुंबा भरोनी आण पाणी ॥३३॥

    पितांबर बोले गुरुराया । ओढ्यास पाणी अल्प सदया ।
    पाण्यांत तुंबा बुडावया । मुळीं नाहीं अवसर ॥३४॥

    इतुकें असून तें पाणी । खराब केलें गुरुंनीं ।
    तेवीं जाणार्‍या येणार्‍यांनीं । नाहीं पिण्याच्या योग्य तें ॥३५॥

    मर्जी असल्या दुसरीकडून । पाणी आणितों तुंबा भरुन ।
    तैं बोलले गजानन । दुसरें पाणी आम्हां नको ॥३६॥

    नाल्याचेंच आण पाणी । आंत तुंबा बुडवोनी ।
    उगीच ओंजळी-ओंजळींनीं । तुंब्यांत पाणी भरुं नको ॥३७॥

    तुंबा घेऊन पितांबर । तात्काळ गेला नाल्यावर ।
    तुंबा भरेल ऐसें नीर । कोठें न त्यानें पाहिलें ॥३८॥

    तळवे पदाचे भिजतील । इतुकेंच तेथें होतें जल ।
    करुन हातांची ओंजळ । तुंब्यांत पाणी भरणें नसे ॥३९॥

    ऐसी झाली आड विहीर । चिंतावला पितांबर ।
    हिय्या करुन अखेर । तुंवें स्पर्श केला जला ॥४०॥

    तों ऐसें झालें अघटीत । तुंबा ठेवावा जेथ जेथ ।
    तो बुडे तेथ तेथ । खळगा पाहून ओढ्याला ॥४१॥

    नाल्याचें घाण जीवन । तुंब्यांत स्फटिकासमान ।
    आल तैसें पाहोन । शिंपी चित्तीं चकित झाला ॥४२॥

    तो म्हणे ही ऐशी स्थिति । कीं आज झाली निश्चिती ।
    ती योगेश्वराची साच शक्ति । संशय येथें धरणें नको ॥४३॥

    तुंबा आणून ठेविला । योगेश्वराचे सान्निध्याला ।
    त्याचा समर्थें स्वीकार केला । झुणकाभाकर सेविल्यावर ॥४४॥

    बंकटलालासी सुपारी । मागते झाले साक्षात्कारी ।
    अरे माळिणीच्या भाकरीवरी । माझी सेवा करतोस कां ? ॥४५॥

    काढ सुपारी खिशांतून । फोडोन देई मजकारण ।
    तें ऐकतां समाधान । बंकटलालास झालें बहु ॥४६॥

    सुपारीच्या बरोबरी । दोन पैसे हातावरी ।
    ठेवितां झाला व्याघ्रांबरी । दुदंडी तांब्याचे ॥४७॥

    खडकु दुदंडी व्याघ्रांबरी । हीं मुसलमानी नाणीं सारीं ।
    चालत होतीं व्यवहारीं । तया वर्‍हाड प्रांतांत ॥४८॥

    पैशाप्रती पाहून । महाराज बोलले हांसोन ।
    काय व्यापारी समजून । मजला तूं हें अर्पिसी ? ॥४९॥

    हें नाणें तुमचें व्यवहारीं । मला न त्याची जरुरी ।
    भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ॥५०॥

    तें तुझ्याजवळ होतें । म्हणून भेटलों पुन्हां तूंतें ।
    याचा विचार चित्तातें । करी म्हणजे कळेल ॥५१॥

    जा आतां कीर्तन । दोघे जाऊन करा श्रवण ।
    मी लिंबापाशीं बैसोन । कथा त्याची ऐकतों ॥५२॥

    दोघे कीर्तनाप्रती आले । महाराज लिंबापाशीं बैसले ।
    गोविंदबुवांचें सुरु झालें । आरंभींचें निरुपण ॥५३॥

    निरुपणासी भागवतीचा । घेतला होता एक साचा ।
    श्लोक एकादश स्कंधाचा । हंसगीतामधील ॥५४॥

    बुवांनीं पूर्वार्धा विशद केलें । त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ।
    तें ऐकोन घोटाळले । गोविंदबुवा मनांत ॥५५॥

    हा उत्तरार्ध वदणारा । पुरुष अधिकारी दिसतो खरा ।
    जा त्या घेऊन मंदिरा । या हो कीर्तनश्रवणास ॥५६॥

    बंकटलाल पितांबर । आणिक मंडळी निघाली इतर ।
    समर्थासी साचार । कीर्तनासी आणावया ॥५७॥

    केली विनंती अवघ्यांनीं । श्रोते अती विनयांनीं ।
    परी बसल्या जागेपासोनी । मुळीं न महाराज हलले हो ॥५८॥

    गोविंदबुवा अखेर । येवोन जोडीते झाले कर ।
    कृपा करावी एक वार । चला शिवाच्या मंदिरीं ॥५९॥

    तुम्ही साक्षात्‌ शंकर । बरें न बसणें बाहेर ।
    धन्यावांचून मंदिर । शून्य साच समर्था ॥६०॥

    पूर्वजन्मींचें पुण्य भलें । माझें आज उदेलें ।
    म्हणून हे दृष्टी पडले । साक्षात् चरण शिवाचे ॥६१॥

    कीर्तनाची फलप्राप्ती । झाली आज मजप्रती ।
    वेळ न करा गुरुमूर्ती । चला मंदिरीं माझ्यासवें ॥६२॥

    ऐसें गोविंदबुवा बोलतां । समर्थ वदलें तत्त्वतां ।
    ठेवी एकवाक्यता । भाषणीं गोविंदा लवमात्र ॥६३॥

    तूं इतक्यांत प्रतिपादिलें । अवघें ईश्वरें व्यापिलें ।
    आंत बाहेर कांहीं न उरलें । मग हा ऐसा हट्ट कां ? ॥६४॥

    जें जें जयानें सांगावें । तें तें त्यानें आचरावें ।
    शब्दच्छलासी न करावें । साधकानें केव्हांही ॥६५॥

    भागवताचा श्लोक सांगसी । आणि त्याच्या विरुद्ध वागसी ।
    कथेकर्‍याची रीत ऐसी । बरवी नव्हे गोविंदा ॥६६॥

    पोटभर्‍या कथकेरी । तूं न व्हावें भूमीवरी ।
    जा कीर्तन समाप्त करी । मी येथून ऐकतों ॥६७॥

    बुवा कीर्तनीं परत आले । गर्जोन अवघ्यां बोलले ।
    तुमच्या शेगांवीं अमोल आलें । रत्‍न हें त्या सांभाळा ॥६८॥

    हें न शेगांव राहिलें । पंढरपूर खचीत झालें ।
    चालते बोलते येथ आले । साक्षात्‌ हे पांडुरंग ॥६९॥

    यांची तरतूद ठेवावी । सेवा यांची करावी ।
    यांची आज्ञा मानावी । वेदवाक्यापरी हो ॥७०॥

    तरीच तुमचें कल्याण । होईल निःसंशय करुन ।
    अनायासें हें निधान । जोडलें त्या दवडूं नका ॥७१॥

    कीर्तन अवघें सांग झालें । लोक आपुल्या घरां गेले ।
    बंकटलाल घरीं आले । चित्तीं हर्ष मावेना ॥७२॥

    आपल्या सन्माननीय पित्यासी । हकीकत कथिली प्रेमेंसी ।
    बाबा आपुल्या घरासी । गजानन आणा हो ! ॥७३॥

    पुत्रानें जें कथन केलें । तें भवानीरामें ऐकिलें ।
    आणि प्रेमें ऐसें वदलें । तूंच ये त्या घेऊन ॥७४॥

    पित्याची मिळाली संमती । बंकटलाल हर्षें अती ।
    म्हणे कधीं भेटेल गुरुमूर्ती । मजला सदनीं आणावया ॥७५॥

    पुढें माणिक चौकांत । चौथे दिवशीं सद्‌गुरुनाथ ।
    भेटले बंकटलाला प्रत । अस्तमानाचे समयाला ॥७६॥

    दिनपति अस्ता गेला । इकडे बोधसूर्य उदेला ।
    माणिक चौक प्राचीला । बंकटलालाच्या भाग्यानें ॥७७॥

    गुराखी घेऊन धेनूस । येऊं लागले ग्रामास ।
    समर्थांच्या आसपास । गाई जमूं लागल्या ॥७८॥

    त्या वाटले नंदसुत । आला येथें साक्षात ।
    वृक्षावरी करितात । पक्षी किलकिलाट आनंदें ॥७९॥

    दिवाबत्तीची तयारी । दुकानदार करिती खरी ।
    अशा वेळीं आला घरीं । घेऊन बंकट महाराजा ॥८०॥

    पित्यानें मूर्ति पाहातां क्षणीं । अती आनंद झाला मनीं ।
    नमन साष्टांग केलें चरणीं । पाटावरी बैसविलें ॥८१॥

    आणि विनविलें जोडोन हात । कांहीं भोजन करा येथ ।
    तुम्ही साक्षात् पार्वतीकांत । प्रदोष वेळीं आला या ॥८२॥

    शिव आराधन प्रदोषकालीं । घडेल तो भाग्यशाली ।
    ऐसी आहे ऐकिली । स्कंदपुराणीं गोष्ट म्यां ॥८३॥

    ऐसें म्हणोन आणिलें । बिल्वपत्र तात्काळ भलें ।
    समर्थांच्या ठेविलें । परमभक्तीनें मस्तकीं ॥८४॥

    करा येथें भोजन । ऐसें गेलों बोलून ।
    परी स्वयंपाकाकारण । अवधी आहे कांहींसा ॥८५॥

    स्वयंपाक होईपर्यंत । हे न थांबले जरी येथ ।
    तरी प्रदोषकालीं पार्वतीकांत । गेला उपासी घरांतूनी ॥८६॥

    त्यास करुं कैसी तोड । ऐसें संकट पडलें जड ।
    जनसमुदाय प्रचंड । जमला मौज पाहावया ॥८७॥

    विचार केला अखेरीं । दुपारच्या पुर्‍या आहेत घरीं ।
    त्याच ठेवोन तबकांतरीं । पुढें ठेवूं समर्थांच्या ॥८८॥

    ते अवघेच जाणती । कपट नाहीं माझ्या चित्तीं ।
    भावें भेटतो उमापती । ऐसा आहे सिद्धान्त ॥८९॥

    मी शिळें अवर्जुन । यास घालीत नाहीं अन्न ।
    शिवाय पक्क्या रसोईकारण । शिळें म्हणणें उचित नसे ॥९०॥

    चिंतिल्याप्रमाणें तयारी । तात्काळ त्यानें केली खरी ।
    आणून ठेविलें समोरी । तबक एक समर्थांच्या ॥९१॥

    पुर्‍या बदाम खारका । केळीं मोसंबीं मुळे देखा ।
    भालाप्रती लाविला बुका । कंठीं घातिला पुष्पहार ॥९२॥

    गुरुमूर्ति प्रसन्न चित्तें । अवघे झाले सेविते ।
    जें जें पडेल पात्रातें । तें तें खाती भराभर ॥९३॥

    उदरीं सुमारें तीन शेर । अन्न सांठविलें साचार ।
    तेथेंच राहिले रात्रभर । श्रीगजानन महाराज ॥९४॥

    बंकटलालें दुसरे दिवशीं । मंगल स्नान समर्थांसी ।
    घातलें असे अतिहर्षी । तो न थाट वर्णवे ॥९५॥

    घागरीं सुमारें शंभर । उष्णोदकाच्या साचार ।
    पाणी घालती नारीनर । मन मानेल ऐशा रीतीं ॥९६॥

    कुणी शिकेकाई लाविती । कुणी साबण घेऊन हातीं ।
    समर्थांतें घासीती । पदकमळ आवडीनें ॥९७॥

    कोणी दवना कोणी हीना । कोणी चमेली तेल जाणा ।
    कोणी बेलियाच्या मर्दना । करुं लागले निजहस्तें ॥९८॥

    अंगराग नानापरी । त्यांचें वर्णन कोण करी ।
    बंकटलालाचिया घरीं । उणें नव्हतें कशाचे तें ॥९९॥

    स्नानविधि संपला । पितांबर तो नेसविला ।
    अति सन्मानें बैसविला । योगिराज गादीवरी ॥१००॥

    भालीं गंध केशरी । गळ्यांत हार नानापरी ।
    कोणी तुळशीमंजरी । वाहूं लागले शिरावर ॥१॥

    नैवेद्य नानापरीचे । झाले समर्थार्पण साचे ।
    भाग्य त्या बंकटलालाचें । खचित आलें उदयाला ॥२॥

    तें बंकटलालाचें घर । झालें द्वारका साचार ।
    तया दिनीं सोमवार । वार शिवाचा होता हो ॥३॥

    अवघ्या मंडळींनीं आपुले । मनोरथ ते पूर्ण केले ।
    एक मात्र त्यांतून उरले । इच्छाराम शेटजी ॥४॥

    हा चुलत बंधु बंकटाचा । होता भाविक मनाचा ।
    भक्त असे शंकराचा । त्यासी ऐसें वाटलें ॥५॥

    आज आहे सोमवार । मसी उपास साचार ।
    घरां प्रत्यक्ष शंकर । चालते बोलते आलेच कीं ॥६॥

    त्यांची पूजा अस्तमानीं । यथासांग करोनी ।
    करुं पारणा ऐसी मनीं । इच्छा त्यानें धरली असे ॥७॥

    तों झाला अस्तमान । मावळलासे नारायण ।
    इच्छारामें केलें स्नान । प्रदोष वेळा लक्षुनी ॥८॥

    पूजासाहित्य घेऊन । साधु जे कां गजानन ।
    त्यांचें केलें पूजन । परम प्रेमें करोनी ॥९॥

    आणि विनंती केली वरी । झालें आहे दुपारीं ।
    आपुलें तें भोजन जरी । परी आतां कांहीं खावें ॥११०॥

    आपण जेवल्यावांचून । मी नाहीं घेणार अन्न ।
    आहे मजला उपोषण । सोमवारचें गुरुराया ! ॥११॥

    अवघ्या भक्तांचा हेत पुरला । माझा मात्र राहिला ।
    तो पाहिजे पुरविला । तुम्ही कृपा करुन ॥१२॥

    जन कुतूहल दृष्टींनीं । पाहूं लागले तया स्थानीं ।
    इच्छाराम तो घेवोनी । नैवेद्य आला परातींत ॥१३॥

    आंबेमोहर तांदळाचा । दोन मुदी भात साचा ।
    नानाविध पक्वान्नांचा । थाट केला तयानें ॥१४॥

    जिलबी राघवदास मोतीचूर । करंज्या अनारसे घीवर ।
    शाखांचे नाना प्रकार । वर्णन करावे कोठवरी ? ॥१५॥

    अगणित चटण्या कोशिंबिरी । वाडगा दह्याचा शेजारीं ।
    तुपाची ती वाटी खरी । आदनाच्या सव्य भागा ॥१६॥

    चार मनुष्यांचें अन्न । ऐसा नैवेद्य परिपूर्ण ।
    समर्थांपुढें आणून । ठेवला इच्छारामानें ॥१७॥

    पाहोन त्या नैवेद्यासी । महाराज बोलले आपणासी ।
    खातो खातो अहर्निशीं । ऐसें बोलसी गणप्पा ॥१८॥

    खा हें आतां अवघें अन्न । अघोर्‍या न करी अनमान ।
    पाहों आले अवघे जन । तुझ्या अघोर वृत्तीला ॥१९॥

    महाराज भोजना बैसले । अन्न अवघें पार केलें ।
    पात्रीं न कांहीं ठेविलें । मीठ लिंबू तेंही पाहा ॥१२०॥

    आग्रहाचा प्रकार । काय होतो अखेर ।
    हें दावण्या साचार । कौतुक केलें गुरुवरें ॥२१॥

    खणाणून उलटी झालि । खाल्ल्या अन्नाची ती भली ।
    ऐसीच गोष्ट होती केली । श्रीरामदासें एकदां ॥२२॥

    खिरीची झाली वासना । रामदासाचीया मना ।
    तिची खोड मोडण्या जाणा । आकंठ खीर प्याले कीं ॥२३॥

    उलटीं होतां परत । ती भक्षूं लागले सद्‌गुरुनाथ ।
    श्रीरामदासस्वामी समर्थ । वासनेसी जिंकावया ॥२४॥

    तैसें लोकाग्रहाला । घालावयासी शीघ्र आळा ।
    हा उलटीचा प्रकार केला । अंगीं बळ असूनिया ॥२५॥

    सत्‌पुरुषाचें आचरण । पुढील पिढीला साधन ।
    होतें कराया संरक्षण । निसर्गाच्या धर्माचें ॥२६॥

    तेंच समर्थें येथें केलें । लोकांलागीं सुचविलें ।
    आग्रह करणें न चांगलें । तो विपरीत फळ देई ॥२७॥

    असो उलटी झाल्यावरी । जागा केली साफ सारी ।
    नेवोन बैसविले पहिल्या परी । स्नान घालोन महाराजा ॥२८॥

    नरनारी दर्शनें घेती । महाराजांची आनंदवृत्ती ।
    तों भजन करण्याप्रती । दिंड्या आल्या दोन तेथें ॥२९॥

    आवाज ज्यांचे सुस्वर । खडे पहाडी मनोहर ।
    विठ्ठलाचा नामगजर । करुं लागले आवडीनें ॥१३०॥

    इकडे महाराज आसनीं । होते ते वदले वदनीं ।
    भजनाचिया मिषांनीं । "गणगण गणांत बोते" ॥३१॥

    हेंच सर्वदा त्यांचें भजन । करिती टिचक्या वाजवून ।
    ऐसा झाला आनंद जाण । रात्रभरीं ते ठायां ॥३२॥

    ’गण गण’ हें त्यांचें भजन । हमेशा चाले म्हणून ।
    लोकांनीं दिलें अभिधान । गजानन हें तयाला ॥३३॥

    जो स्वयमेव ब्रह्म झाला । नांवरुप कोठून त्याला ? ।
    नामरुपाचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ॥३४॥

    अस्ति-भाति-प्रिया ठायीं । योगेश्वर निमग्न राही ।
    त्या आनंदा न वर्णवे कांहीं । त्याची उपमा त्यालाच असे ॥३५॥

    आषाढीसी पंढरपूर । वा सिंहस्थीं गोदातीर ।
    वा कुंभमेळ्यासी साचार । गर्दी होते हरिद्वारीं ॥३६॥

    त्यापरि शेगांवांत । बंकटलालाच्या घरांत।
    लांबलांबून असंख्यात । जन येती दर्शना ॥३७॥

    स्वामी समर्थ गजानन । हेच विठ्ठल नारायण ।
    निश्चय विटेस ठेवून । पाय उभे राहिले ॥३८॥

    त्यांचें वचन गोदातीर । आनंद हा हरिद्वार ।
    गजबजलें शेगांव नगर । सदन राऊळ बंकटाचें ॥३९॥

    जो ब्रह्मपदा पोंचला । जात कोठून उरली त्याला ? ।
    सूर्याचिया प्रकाशाला । अवघेंच आहे सारखें ॥१४०॥

    नित्य यात्रा नवी येई । समाराधना होती पाही ।
    त्यांतें वाणितां शेषही । थकून जाईल निःसंशय ॥४१॥

    तेथें माझा पाड कोण । मी कीटकासमान ।
    अवघें वदे गजानन । निमित्त करुन माझ्या मुखा ॥४२॥

    समर्थांची दिनचर्या । सांगतों थोडी या ठायां ।
    अगाध त्यांचें चरित्र गाया । मज पामरा मती नसे ॥४३॥

    कधीं करावें मंगलस्नान । कधीं हाळांत जाऊन ।
    कधीं कधीं प्राशन । करावें गढूळ जलाचें ॥४४॥

    त्यांच्या दिनचर्येचा । नियम नव्हता एक साचा ।
    प्रकार वायूच्या गतीचा । न ये ठरवितां कोणासी ॥४५॥

    चिलमीवरी प्रेम भारी । ती लागे वरच्यावरी ।
    नव्हती आसक्ति तिच्यावरी । तें केवळ कौतुक ॥४६॥

    असो आतां पुढीलाध्याया । भाव ठेवा ऐकावया ।
    आली पर्वणी साधावया । वेळ करुं नका हो ! ॥४७॥

    हें श्रीगजाननचरित्र । आदर्श होवो भाविकांप्रत ।
    हेंच विनवी जोडोन हात । दासगणू ईशातें ॥१४८॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

    ॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 3

    अध्याय ३

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी ।
    तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥

    तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर ।
    तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥

    ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा ।
    दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं नका ॥३॥

    असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी ।
    दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥४॥

    लांबलांबोनी भक्त येती । समर्थांतें वंदिती ।
    मधु तेथें माशा जमती । न लगे करणें आमंत्रण ॥५॥

    एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें ।
    महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥६॥

    ती प्रभातीची होती वेळा । प्राची प्रांत ताम्र झाला ।
    पक्षी किलकिलाटाला । करुं लागले वृक्षावर ॥७॥

    कुक्कुटाचे होती स्वप्न । मंदशीत वाहे पवन ।
    वृद्ध करिती नामस्मरण । शय्येवरी बैसोनिया ॥८॥

    उदयाचलीं नारायण । येऊं पाहे हर्षें करुन ।
    तेणें तम पलायन । करुं लागला कंदरीसी ॥९॥

    परम भाविक सुवासिनी । रत सडासंमार्जनीं ।
    वत्स धेनूस पाहोनी । तोडूं लागलीं चर्‍हाटें ॥१०॥

    ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास ।
    येतां झाला दर्शनास । श्रीगजानन साधूच्या ॥११॥

    तो भिकार गोसावी । मानमान्यता त्याची राहावी ।
    कोठोनिया सांगा बरवी । श्रीमंताच्या मंडळींत ? ॥१२॥

    भगवी चिंधी डोक्यास । झोळी वाम बगलेस ।
    होती एक नेसण्यास । फाटकीसी लंगोटी ॥१३॥

    मृगाजिनाचा गुंडाळा । पाठीवरी होता भला ।
    ऐसा गोसावी बैसला । कोपर्‍यांत एकीकडे ॥१४॥

    दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार ।
    अशा स्थितींत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥१५॥

    तों ठायींच बैसोन । करुं लागला चिंतन ।
    म्हणे समर्थाचे चरण । दृष्टि पडणें कठीण मला ॥१६॥

    समर्थांचा लौकिक भला । मी काशींत ऐकला ।
    आवडीनें नवस केला । भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥१७॥

    तो मम हेतु मनांत । जिरुन जाया पाहे येथ ।
    या श्रीमान मंडळींत । माझ्या नवसास कोण पुसे ? ॥१८॥

    गांजाचें नांव काढितां । लोक मजला देतील लाथा ।
    मी तो आलों फेडण्याकरितां । नवस गांजाचा शेगांवीं ॥१९॥

    माझ्या नवसाची ती मात । सांगू तरी कवणाप्रत ? ।
    येथें एकही ना दिसत । प्रेमी या शांभवीचा ॥२०॥

    जी वस्तु ज्या आवडे खरी । तिचाच तो नवस करी ।
    आणि मानी सर्वतोपरी । हीच वस्तु उत्तम ॥२१॥

    ऐसे नाना विचार । गोसावी करी साचार ।
    झाला होता परम आतुर । दर्शन घ्याया समर्थांचें ॥२२॥

    तें त्याचें मनोगत । जाणते झाले समर्थ ।
    बोलते झाले इतरांप्रत । आणा काशीचा गोसावी ॥२३॥

    तो पहा त्या कोपर्‍याला । आहे बिचारा दडून बसला ।
    हें ऐकतां आनंद झाला । गोसाव्यास परमावधी ॥२४॥

    आणि बोलला मनांत । त्रिकालज्ञ हे खरेच संत ।
    मी जें बोललों मनांत । तें सर्व यांनीं जाणलें ॥२५॥

    ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायीं । जी गोष्ट कथिली पाही ।
    कीं स्वर्गलोकीच्या कथा त्याही । समजतात योगीवरा ॥२६॥

    त्याचें आलें प्रत्यंतर । मला येथें साचार ।
    धन्य धन्य हा साधुवर । त्रिकालज्ञ महात्मा ॥२७॥

    न बोलतां माझा नवस । जाणतील हे पुण्य पुरुष ।
    त्याचें प्रत्यंतर यावयास । अवधी उरला थोडका ॥२८॥

    मंडळींनीं गोसाव्याला । पुढें आणोन उभा केला ।
    तों महाराज वदले तयाला । काढ झोळीची पोटळी ॥२९॥

    जी तीन महिनेपर्यंत । रक्षण केलीस झोळींत ।
    त्या पोटळीचें आज येथ । होवो दे गा पारणें ॥३०॥

    गोसावी पदीं लागला । गहिंवर त्यासी दाटला ।
    गडबडा लोळूं लागला । बालकापरी स्वामीपुढें ॥३१॥

    महाराज म्हणती गोसाव्यास । पुरे आतां उठोन बैस ।
    पोटोळीच्या बुटीस । काढ बाहेर झोळीच्या ॥३२॥

    नवस केलास ते वेळीं । नाहीं लाज वाटली ।
    आणि आतां कां ही लाविली । चाळवाचाळवी निरर्थक ॥३३॥

    गोसावी होता महा धूर्त । तो बोलला भीत भीत ।
    जोडुनीया दोन्ही हात । ऐसें नम्र वाणीनें ॥३४॥

    मी बुटी काढितों । नवस आपुला फेडितों ।
    परि मागणें मागतों । एक तें द्या दीनाला ॥३५॥

    आठवण माझ्या बुटीची । नित्य राहावी आपणा साची ।
    हीच इच्छा मानसींची । आहे ती पूर्ण करा ॥३६॥

    तुम्हां बुटीचें प्रयोजन । नाहीं हें मी जाणतों पूर्ण ।
    परी बालकाची आठवण । राहाया बुटी स्वीकारा ॥३७॥

    भक्त जी जी इच्छा करीत । ती ती ज्ञाता पुरवीत ।
    अंजनीचा वृत्तान्त । आणा मनीं आपुल्या ॥३८॥

    अंजनी होती वानरी । तिनें प्रार्थिला त्रिपुरारी ।
    कीं तुम्हीं यावें माझ्या उदरीं । वानर होऊन शंकरा ! ॥३९॥

    तें हरानें मानिलें । महारुद्र पोटीं आले ।
    अंजनीचे पुरविले । मनोरथ चंद्रमौळींनीं ॥४०॥

    तेथें शंकराकारण । आड ना आलें वानरपण ।
    तेवीं माझ्या बुटीची आठवण । राहाया तीतें स्वीकारा ॥४१॥

    त्यांतून तुम्ही कर्पूरगौर । साक्षात् आहां शंकर ।
    म्हणून बुटीचा अव्हेर । करुं नको दयाळा ! ॥४२॥

    ज्ञानवल्ली शंकरानें । म्हटलें आहे इजकारणें ।
    ही इतरा आणील उणें । परि भूषण तुम्हांला ॥४३॥

    महाराज किंचित्‌ घोटाळले । परि अखेर होय म्हणाले ।
    माय पुरवी बालक-लळे । वेडेवांकुडे असले जरी ॥४४॥

    गोसाव्यानें बुटी काढिली । हातावरी घेवोन धुतली ।
    चिलमींत घालून पाजिली । पुण्यपुरुष गजानना ॥४५॥

    ऐसा बुटीचा वृत्तान्त । काथलीसे कारणासहित ।
    तो आणून ध्यानांत । विचार करणें प्रत्येकीं ॥४६॥

    कांहीं दिवस राहोन । गेला गोसावी निघोन ।
    आपणां धन्य मानोन । रामेश्वराकारणें ॥४७॥

    ऐसी गांजाची पडली प्रथा । ते ठायीं तत्त्वतां ।
    परी व्यसनाधीनता । नच आली समर्थांतें ॥४८॥

    पद्मपत्राचियेपरी । ते अलिप्त होते निर्धारी ।
    नये कोणास त्याची सरी । खरेंच अती थोर ते ॥४९॥

    वेदऋचा अस्खलित । उदात्त-अनुदात्त स्वरांसहित ।
    कधीं म्हणाव्या मुखीं सत्य । कधीं त्यांचें नांव नसे ॥५०॥

    वेदाक्षरें पडतां श्रवणीं । साशंक व्हावें वैदिकांनीं ।
    याच एका अनुमानीं । गजानन होते ब्राह्मण ॥५१॥

    कधीं गवयासमान । अन्य अन्य रागांतून ।
    एकच पदातें गाऊन । दाखवावें निजलीलें ॥५२॥

    चंदन चावल बेलकी पतीया । प्रेम भारी या पदा ठाया ।
    ते आनंदांत येवोनिया । वरच्यावरी म्हणावें ॥५३॥

    कधीं गणगणाचें भजन । कधीं धरावें नुसतें मौन ।
    कधीं राहावें पडून । शय्येवरी निचेष्टित ॥५४॥

    कधीं वागावें पिशापरी । कधीं भटकावें कांतारीं ।
    कधीं शिरावें जाऊन घरीं । एखाद्याच्या अवचीत ॥५५॥

    असो त्या शेगांवांत । जानराव देशमुख विख्यात ।
    होता त्याचा प्राणान्त । व्हावयाचा समय आला ॥५६॥

    व्याधी शरीरीं बळावली । शक्ति पार निघून गेली ।
    प्रयत्‍नांची कमाल केली । वैद्यांनीं ती आपुल्या ॥५७॥

    नाडी पाहोन अखेर । आप्ता कळविला समाचार ।
    प्रसंग आहे कठीण फार । नसे आशा वांचण्याची ॥५८॥

    आम्हीं प्रयत्‍न केले अती । परी यश ना आलें तिळरती ।
    यांना आतां घोंगडयावरती । काढोन ठेवा हेंच बरें ॥५९॥

    तें ऐकतां अवघे आप्त । दुःख करती अत्यंत ।
    जानरावा आम्हां प्रत । सोडून तूं जाऊं नको ॥६०॥

    तुझ्याप्रीत्यर्थ नवस केले । नाना दैवतांलागीं भले ।
    परी न कोणी पावले । हाय हाय रे दुर्दैवा ॥६१॥

    वैद्यानें टेकिले हात । प्रयत्‍न झाले कुंठित ।
    आतां अखेरच्या यत्‍नाप्रत । करोन पाहूं एक वेळा ॥६२॥

    बंकटलालाचिये घरीं । आहेत एक साक्षात्कारी ।
    यांच्या योगें शेगांव नगरी । झाली प्रती पंढरपूर ॥६३॥

    साधूनें आणिल्या मनांत । काय एक नाहीं होत ।
    सच्चिदानंदबाबाप्रत । ज्ञानेश्वरानें उठविलें ॥६४॥

    त्याचें पाहूं प्रत्यंतर । जा जा कोणी जोडा कर ।
    नका करुं रे उगा उशीर । वेळ अंतसमयाची ॥६५॥

    तें ऐकोनी एक आप्त । आला बंकटसदनाप्रत ।
    जानरावाची हकीकत । बंकटलाला कथन केली ॥६६॥

    जानराव देशमुखाचा । समय अंतकाळाचा ।
    आला आहे जवळी साचा । म्हणून आलों तुम्हांकडे ॥६७॥

    महाराजांचें चरणतीर्थ । द्या कृपा करोनी मजप्रत ।
    तें तीर्थ नोहे अमृत । होईल वाटे जानरावा ॥६८॥

    बंकटलाल म्हणे त्यावरी । ही गोष्ट न माझ्या करीं ।
    तुम्ही करावी अत्यादरीं । विनवणी आमुच्या वडिलाला ॥६९॥

    जसें त्यानें सुचविलें । तैसें आप्तें तात्काळ केलें ।
    भवानीरामा विनविलें । द्याया तीर्थ समर्थांचें ॥७०॥

    भवानीराम सज्जन । होता मनाचा दयाळु पूर्ण ।
    दुसर्‍याचें दुःख ऐकून । सज्जन तेच विव्हळ होती ॥७१॥

    प्याल्यामध्यें भरुन पाणी । समर्थांच्या लाविलें चरणीं ।
    आणि केली विनवणी । तीर्थ देतो जानरावा ॥७२॥

    समर्थें तुकाविली मान । तीर्थ पाजिलें नेऊन ।
    जानरावाकारण । घरघर घशाची बंद झाली ॥७३॥

    हात हालवूं लागला । किंचित् डोळा उघडीला ।
    उतार पडूं लागला । तीर्थप्रभावें देशमुखासी ॥७४॥

    तो पाहतां प्रकार । आनंदले नारीनर ।
    सत्पुरुषाचा अधिकार । आला कळून सर्वांसी ॥७५॥

    मग औषधी बंद केली । तीर्थीं भिस्त ठेविली ।
    ज्या-योगीं लाभती झाली । आरोग्यता जानरावा ॥७६॥

    आठ दिवसांमाझारीं । जानराव झाला पहिल्यापरी ।
    भवानीरामाचीये घरीं । आला दर्शना समर्थांच्या ॥७७॥

    पहा संतांचें चरणतीर्थ । साधनांत झालें अमृत ।
    संत न ते साक्षात्‌ । देव कलीयुगीचे ॥७८॥

    येथें एक ऐसी शंका । उत्थान पावे सहज देखा ।
    श्रीगजाननासारिखा संत होता शेगांवीं ॥७९॥

    मग तो तेथें असतांना । गेलें न पाहिजे कोणी जाणा ।
    यमाजी पंताचीया सदना । परि हाच आहे कुतर्क ॥८०॥

    संत मृत्यु ना टाळिती । निसर्गाप्रमाणें वागती ।
    परि संकटांतें वारिती । अगांतुक असल्यास ते ॥८१॥

    सच्चिदानंदबाबासी । ज्ञानेशें उठविलें नेवाशासी ।
    परि ते अखेर आळंदीसी । देह ठेविते झाले हो ॥८२॥

    याचें रहस्य इतुकेंचि आहे । हें गंडांतर टाळिती पाहे ।
    तें टाळणें कांहींच नोव्हे । अशक्य संत पुरुषाला ॥८३॥

    मृत्यूचे तीन प्रकार । आहेत जगीं साचार ।
    त्यांचीं नांवें क्रमवार । देतों तुम्हांकारणें ॥८४॥

    आध्यात्मिक आधिभौतिक । आणि तिसरा तो आधिदैविक ।
    त्या तिघांमाजीं बलिष्ठ देख । आध्यात्मिक मृत्यु असे ॥८५॥

    आधिभौतिकाची तयारी । कुपथ्यानें होते खरी ।
    नाना प्रकारच्या शरीरीं । व्याधि निर्माण होतात ॥८६॥

    त्यांचा जोर झाल्यावर । मृत्यु येतो अखेर ।
    त्या मृत्यूचा परिहार । करितां येतो औषधीनें ॥८७॥

    मात्र औषधी देणारा । शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा ।
    औषधीचा पसारा । आहे अवगत जयासी ॥८८॥

    एसा वैद्य भेटल्यास । आधिभौतिकाचा होय नाश ।
    तैसे आधिदैविकास । नवस सायास घालविती ॥८९॥

    हें गंडांतर रुपाचें । मृत्यु दोन प्रकारचे ।
    भौतिक आणि दैविक साचे । हे आहेत ख्यात जगीं ॥९०॥

    मृत्यु जो कां आध्यात्मिक । तो कवणाच्यानें न टळे देख।
    पाहा अर्जुनाचा बालक । कृष्णासमक्ष पडला रणीं ॥९१॥

    तैसा जानरावाचा । मृत्यु गंडांतर स्वरुपाचा ।
    होता तो टाळिला साचा । समर्थतीर्थ देवोनिया ॥९२॥

    म्हणजे गंडांतरा कारण । निवारिती साधुचरण ।
    तेंच आलें घडोन । शेगांवामाझारीं ॥९३॥

    कांहीं मृत्यु नवसांनीं । टाळिता येती या जनीं ।
    परी तो नवस श्रद्धेनीं । केला पाहिजे विबुध हो ! ॥९४॥

    श्रद्धा पूर्ण असल्यावरी । तीच मृत्यु टाळी खरी ।
    श्रद्धाच अवघ्या माझारीं । सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥९५॥

    चरणतीर्थ साधूचें । तेंही टाळी मृत्यु साचे ।
    वरील दोन प्रकारचे । परी तो साधु पाहिजे ॥९६॥

    साधू असल्या वेषधारी । ऐसी न होय गोष्ट खरी ।
    माती न होय कस्तूरी । हें ध्यानीं असूं द्या ॥९७॥

    षड्‌विकार धुतल्याविना । अंगीं साधुत्व येईना ।
    आणि साधूविण होईना । अघटित कृत्य केव्हांही ॥९८॥

    म्हणून बहुरुप्याकारण । जपणें आहे अवश्य जाण ।
    उगीच पाहून पिवळेपण । सोनें पितळेस मानूं नका ॥९९॥

    गजानन नव्हते वेषधारी । ते पूर्ण साक्षात्कारी ।
    म्हणून तीर्थानें झाली बरी । व्याधि जानरावाची ॥१००॥

    देशमुख बरा झाल्यावर । भंडारा घातिला थोर ।
    साधुप्रीत्यर्थ साचार । बंकटलालाचिये घरीं ॥१॥

    तीर्थें देशमुख बरा झाला । परी स्वामीशीं पेंच पडला ।
    त्यांनीं मनासी विचार केला । तो ऐका येणेंरितीं ॥२॥

    कडकपणा धरल्याविना । ही उपाधी टळेना ।
    स्वार्थसाधु प्रापंचिकांना । साधुत्वाची चाड नसे ॥३॥

    त्या दिवसापासून । आणूं लागलें अवसान ।
    स्वामी महाराज दयाघन । वरपांगी कडक झाले ॥४॥

    हा त्यांचा कडकपणा । असह्य झाला इतरांना ।
    परी त्यांच्या भक्तांना । कांहीं न त्याचें वाटलें ॥५॥

    जेवीं नरसिंह अवतार । इतरांसी वाटला क्रूर ।
    परी कयाधूचा कुमार । मुळीं न भ्याला त्या रुपा ॥६॥

    वाघीण इतरा भयंकर । परी तिचें जें का असेल पोर ।
    तें तिच्याच अंगावर । निर्भयपणें क्रीडा करी ॥७॥

    असो आतां गोष्ट दुसरी । सांगतों मी तुम्हां खरी ।
    कस्तुरीच्या शेजारीं । बसल्या माती मोल पावे ॥८॥

    चंदनाचा शेजार । असला थोडा बहुत हिवर ।
    वासित होतो साचार । हा न्याय निसर्गाचा ॥९॥

    वासित हिवर झालेला । चंदन मानील आपणाला ।
    तरी त्याच्या फजितीला । पारावार न राही पुढें ॥११०॥

    जेथें ऊंस निपजतो । तेथेंच निवडुंग उगवतो ।
    जेथें मोगरा वाढतो । तेथेंच येतो पिंगूळ ॥११॥

    जेथें साधु सज्जन । तेथेंच मैंद निर्माण ।
    हिरे गारा एकवटून । खाणीमाजी राहाती ॥१२॥

    स्थान एक म्हणून । किंमत नाहीं समान ।
    तेज हिर्‍याचें हिर्‍यालागून । भूषवी न गारेला ॥१३॥

    गार ती गारची राही । पायाखालीं तुडविली जाई ।
    ऐसी स्थिति कधीं न येई । अमोलिक हिर्‍याला ॥१४॥

    श्रीगजाननाचे सन्निध । ऐसाच होता एक मैंद ।
    संतसेवा हाच मद । अंगीं ज्याच्या भरला असे ॥१५॥

    तो सेवा करी वरी वरी । भाव निराळा अंतरीं ।
    मिठाई पेढे सावरी । समर्थांच्या नांवावर ॥१६॥

    भक्तगणांस ऐसे म्हणे । मी समर्थकृपेचें पोसणें ।
    प्रत्येक काम माझ्याविणें । होत नाहीं ये ठायां ॥१७॥

    मी कल्याण समर्थांचा । अत्यंत आहे आवडीचा ।
    कधीं न खालीं जावयाचा । शब्द माझा त्यांच्यापुढें ॥१८॥

    चिलीम त्यांची मीच भरी । खाण्यापिण्याची तयारी ।
    निजांगें मीच करी । अत्यंत मी आवडीचा ॥१९॥

    ऐसें लोकांस सांगतसे । आपला सवरात करीतसे ।
    त्या अधमाचें नांव असें । माळी विठोबा घाटोळ ॥१२०॥

    महाराज स्वयमेव शंकर । हा बनला नंदिकेश्वर ।
    हमेशा करी गुरगुर । आल्या गेल्या भक्तांवरी ॥२१॥

    तें अंतर्ज्ञानांनीं । जाणिलें सर्व समर्थांनीं ।
    कौतुक केलें एके दिनीं । तें ऐका विबुध हो ॥२२॥

    परस्थ कांहीं मंडळी । शेगांवीं दर्शना आली ।
    तों मूर्ति होती निजलेली । समर्थांची शय्येवर ॥२३॥

    हिय्या कुणाचा होईना । जागे करण्या समर्थांना ।
    मंडळीस होती जाणा । त्वरा पुढें जाण्याची ॥२४॥

    ते कुजबुज करुं लागले । विठोबाला विनविते झाले ।
    विठोबा आम्हां पाहिजे गेलें । येथून आतांच परगांवा ॥२५॥

    काम निकडीचें आहे फार । कैसा करावा विचार ।
    महाराज तों शय्येवर । असती निद्रिस्त जाहले ॥२६॥

    त्यांचें दर्शन घेतल्याविना । आमचा पाय निघेना ।
    हें अवघड काम होईना । तुझ्यावांचून ये ठायीं ॥२७॥

    तूं समर्थांच्या शिष्यांत । मुख्य धोरणी महा धूर्त ।
    तुला आम्ही जोडितों हात । एवढें काम करावें ॥२८॥

    ऐशा त्या स्तुतींनीं । विठोबा फुगून गेला मनीं ।
    त्यानें जाऊन तत्‌क्षणीं । महाराजांस उठविलें ॥२९॥

    मंडळींचे काम झालें । परी संकट ओढवलें ।
    घाटोळ विठोबावरी भले । कर्म जैसें तैसें फल ॥१३०॥

    समर्थांच्या हातीं काठी । एक होती भली मोठी ।
    तीच त्यांनीं घातली पाठीं । त्या विठोबा माळ्याच्या ॥३१॥

    म्हणती बेटा माजून गेला । आपुली स्थिति विसरला ।
    या लुच्च्यानें आरंभीला । उघड उघड व्यापार कीं ॥३२॥

    मला लावितो उपाधी । घंटे आणून बांधितो मठीं ।
    घुमारे घाली कधीं कधीं । ऐसा अती नीच हा ॥३३॥

    त्या घुमर्‍याचें बक्षीस । घे मी देतों तुला खास ।
    तुजवरी केल्या कृपेस । होईन प्रभूचा अपराधी ॥३४॥

    सोमला साखर मानूं नये । विषा जवळ करुं नये ।
    तस्करासी लेखूं नये । निजकंठींचा ताईत ॥३५॥

    ऐशा रीतीं ठोकला । छड्याखाली घाटोळाला ।
    विठोबा तो पळाला । पुनः न आला मागुती ॥३६॥

    खरे जे कां असती संत । ते ते ऐसेंच करितात ।
    ढोंगी मात्र जातात । अशाचिया करांमध्यें ॥३७॥

    म्हणजे अधिकारावांचून । ढोंगी बैसती होऊन ।
    संत नादीं लावण्या जन । ऐसे प्रकार किती तरी ॥३८॥

    मतलबी त्यांना साथ देती । उदो उदो त्यांचा करिती ।
    भलभलते सांगताती । साक्षात्कार ढोंग्यांचे ॥३९॥

    तेणें दोघांचें काम होई । अपार पैसा मिळविला जाई ।
    परी ही प्रथा बरी नाहीं । समाज जाईल रसातळा ॥१४०॥

    खरे जे कां असती संत । ईश्वराचे निःसीम भक्त ।
    त्यांना न मुळीं आवडत । सान्निध्य त्या षंढाचें ॥४१॥

    पतिव्रतेसी शेजार । कसबिणीचा कां पटणार ? ।
    सोन्याप्रती अलंकार । काय शोभती कथलाचे ? ॥४२॥

    संत शठातें राखिती । परी न त्याला महत्त्व देती ।
    ती जगांतील एक व्यक्ति । कृतकर्म भोगण्या आली असे ॥४३॥

    ऐसें मानसीं समजून । त्याविषयीं धरिती मौन ।
    जेवीं निवडुंगालागून । स्थान भूमी देते हो ॥४४॥

    मोगरा निवडुंग आणि शेर । हीं जमीनीचीं लेंकरं ।
    परि किंमतीचा प्रकार । निरनिराळा तो तिघांचा ॥४५॥

    मोगर्‍याचें संरक्षण । करिती निवडुंगाचें दहन ।
    चिलटांसाठीं बांधून । शेर ठेविती दारावरी ॥४६॥

    तेवीं संत भूमिपरी । रक्षण अवघ्यांचें करिती जरी ।
    किंमतीमाजीं ठेविती परी । गुणांप्रमाणें भेद पाहा ॥४७॥

    नशीब विठोबा घाटोळाचें । अति खडतर होतें साचें ।
    पाय लाभून साधूचें । दैवें दूर झालें कीं ॥४८॥

    जरी तो ना ढोंग करिता । तरी योग्यतेप्रती चढता ।
    संतांची ती योग्यता । त्यानें मुळीं ना जाणिली ॥४९॥

    कल्पवृक्षाच्या तळवटीं । बसून इच्छिली गारगोटी ।
    वा मागितली करवंटी । कामधेनूपासून ॥१५०॥

    ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें ।
    तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ॥५१॥

    हा दासगणूविरचित । श्रीगजाननविजय ग्रंथ ।
    तारक होवो भवाब्धींत । अवघ्या भाविकांकारणें ॥१५२॥

    श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥

    ॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 4

    अध्याय ४

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।
     महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥

    तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।
     तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥

    तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।
     जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥

    अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।
     माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥

    मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।
     तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥

    बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ ।
     प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥

    वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं ।
     पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥

    अक्षयतृतीयेचा दिवस । वर्‍हाडांतील लोकांस ।
     विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥

    त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें ।
     महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥

    बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन ।
     तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥

    सकाळपासून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों ।
     त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥

    ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं ।
     चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥

    विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला ।
     कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥

    पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती ।
     कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥

    मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर ।
     अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं आपुल्या ॥१५॥

    त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें ।
     दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥

    आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी ।
     ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥

    पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले ।
     विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥

    जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला ।
     अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥

    पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर ।
     नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥

    महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण ।
     त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥

    साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता ।
     उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥

    आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून ।
     ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥

    विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं ।
     चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥

    तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें ।
     ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥

    सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? ।
     त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥

    गांजा तंबाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो ।
     वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥

    जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला ।
     मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥

    बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला ।
     नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥

    तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? ।
     आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥

    साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार ।
     परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥

    जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत ।
     नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥

    पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली ।
     हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥

    ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन ।
     नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥

    ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले ।
     बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥

    बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया ।
     विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥

    काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि ।
     म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥

    महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर ।
     नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥

    बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।
     चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥

    तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।
     प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥

    काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।
     हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥

    काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।
     कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥४२॥

    याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।
     आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥

    या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।
     जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥

    असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।
     तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥

    त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।
     बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥

    लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।
     सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥

    चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।
     मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥

    मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला ।
     गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥

    गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर ।
     गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५०॥

    त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।
     कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥

    गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी ।
     गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥

    हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा ।
     माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥

    मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार ।
     जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥

    आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि ।
     सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥

    कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं ।
     पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥

    ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी ।
     बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥

    अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला ।
     पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥

    माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात ।
     हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥

    आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला ।
     पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥

    त्याचेंच हें आहे फळ । चिंचवणी नासलें सकळ ।
     तें ऐकून बंकटलाल । बोलूं लागला येणें रितीं ॥६१॥

    तुम्हीं न चिंचोके पाहिले । ते असतील किडलेले ।
     म्हणून हे नासते झाले । तुमचें चिंचवणी वाटे मला ॥६२॥

    सोनार म्हणे ऐसी शंका । शेटजी तुम्ही घेऊं नका ।
     नवी चिंच होती देखा । मग चिंचोके किडके कसे ? ॥६३॥

    जी मीं चिंच फोडिली । तिचीं टरफलें अजून पडलीं ।
     चिंचोक्यांची रास झाली । मर्जी असल्या पाहा चला ॥६४॥

    आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती ।
     मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥६५॥

    क्षमा मंतूची मागेन । अनन्यभावें करुन ।
     साधु दयेचे परिपूर्ण । सागर मूळचेच आहेत कीं ॥६६॥

    समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित ।
     घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥६७॥

    आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।
     मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥६८॥

    तूं साक्षात् उमानाथ । नांदसी या शेगांवांत ।
     ज्यांची होती मजला भ्रांत । ती त्वां आज निवटीली ॥६९॥

    माझे अपराधरुपीं अवघें तृण । जाळी कृपाकृशानें करुन ।
     समर्था आजपासोन । मी न टवाळी तुझी करी ॥७०॥

    जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली ।
     तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहूं नको ॥७१॥

    महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर ।
     तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥७२॥

    तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी ।
     पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥७३॥

    अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें ।
     हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥७४॥

    ज्यांच्या त्यांच्या तोंडीं मात । हीच निघूं लागली सत्य ।
     कस्तुरीचा नाहीं येत । वास झांकाया कवणातें ॥७५॥

    चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा ।
     निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥७६॥

    श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त ।
     अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥७७॥

    कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती ।
     कोणी पंख्यानें घालिती । वारा समर्थांकारणें ॥७८॥

    कोणी वांटिती खडीसाखर । कोणी गळ्यांत घालिती हार ।
     कोणी चंदन थंडगार । लाविती अंगीं साधूच्या ॥७९॥

    तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला ।
     दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥८०॥

    चंदू बोले कर जोडून । आतां कान्होले कोठून ? ।
     इच्छा असल्या तळून । ताजे आणितों गुरुराया ॥८१॥

    तईं महाराज वदले वाचें । नाहीं कारण ताज्याचें ।
     पाहिजेत तुझ्या उतरंडीचे । कान्हवले मज खावया ॥८२॥

    जा वेळ करुं नको । उगीच सबबी सांगूं नको ।
     गुरुपाशीं बोलूं नको । खोटें वेडया यत्किंचित् ॥८३॥

    त्या मुकिनचंदूप्रती । लोक आघे बोलती ।
     जा ये पाहून शीघ्रगती । खोटी न होय संतवाणी ॥८४॥

    चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला ।
     दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥८५॥

    तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना ।
     आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥८६॥

    अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले ।
     ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥८७॥

    मर्जी असल्या नवे करितें । समर्थास्तव तळून देतें ।
     ही पहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥८८॥

    तुम्ही थांबा क्षणभर । सामान अवघें तयार ।
     नको पाहाण्या बाजार । कान्हवल्याच्या साहित्यासी ॥८९॥

    चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी ।
     जे तूं उतरंडी माझारीं । दोन ठेविले तेच दे ॥९०॥

    समर्थांनीं ऐसेंच कथिलें । तेंच मी तुज निवेदिलें ।
     आठवण करुन चांगलें । पाहा कांहीं येधवां ॥९१॥

    ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून ।
     करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥९२॥

    कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां ।
     उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥९३॥

    दोन कान्हवले होते उरले । ते मी उतरंडीस ठेविले ।
     त्यांचें स्मरण नाहीं उरलें । सगळ्या महिन्यांत मजलागीं ॥९४॥

    त्यास महिना होऊन गेला । असेल बुरसा वरी आला ।
     ते खाण्याच्या उपयोगाला । राहिले नसतील अणुमात्र ॥९५॥

    ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली ।
     कान्हवले ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥९६॥

    आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन ।
     कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥९७॥

    बुरसा मुळींच नाहीं आला । श्रोते त्या कान्हवल्याला ।
     बट्टा संतवाणीला । नाहीं लागला कधीं जगीं ॥९८॥

    कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन ।
     धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥९९॥

    चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला ।
     लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥१००॥

    लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ ।
     भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥१॥

    चंदूच्या त्या कान्हवल्यांसी । सेविते झाले पुण्यराशी ।
     राम शबरीच्या बोरांसी । जेवीं झाला भक्षिता ॥२॥

    शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी ।
     तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥३॥

    वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार ।
     तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥४॥

    प्रारब्धाच्या पुढारी । कोण जातो भूमिवरी ? ।
     ब्रह्मदेवें जीं कां खरीं । लिहिलीं अक्षरें तेंच होय ॥५॥

    माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले ।
     म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥६॥

    जी का होती चीजवस्त । ती अवघी केली फस्त ।
     म्हणे आतां माझी गत । होईल कैशी देवदेवा ? ॥७॥

    म्यां हमाधुमीचा संसार केला । तो आतां अवघा निमाला ।
     आठविलें कधीं नाहीं तुला । एक क्षणही दीनबंधो ! ॥८॥

    आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून ।
     माझें हें अरण्यरोदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥९॥

    ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं ।
     गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥११०॥

    आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून ।
     वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥११॥

    ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला ।
     तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥१२॥

    हेंच हरीचें नामस्मरण । कां न केलें मागें जाण ।
     प्राण देहातें सोडून । जातां वैद्य बोलाविसी ! ॥१३॥

    तरुणपणीं ब्रह्मवारी । म्हातारपणीं करिसी नारी ।
     अरे वेळ गेल्यावरी । नाहीं उपयोग साधनाचा ॥१४॥

    जें करणें तें वेळेवर । करावें कीं साचार ।
     घर एकदां पेटल्यावर । कूप खणणें निरर्थक ! ॥१५॥

    ज्या कन्यापुत्रांसाठीं । तूं केलीस आटाआटी ।
     ते अवघे गेले शेवटीं । टाकोनिया तुजलागीं ॥१६॥

    अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन ।
     त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥१७॥

    तीं फळें भोगिल्याविना । सुटका तुझी होईना ।
     दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनीं ॥१८॥

    तें न माधवें ऐकिलें । हट्टासि ना सोडिलें ।
     यत्‍न लोकांचे वायां गेले । त्यासी भोजन घालण्याचे ॥१९॥

    शेगांवचा कुलकर्णी । करुं लागला विनवणी ।
     भोजनास चला सदनीं । अन्नाविण राहूं नका ॥१२०॥

    तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला ।
     समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥२१॥

    रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।
     निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥२२॥

    आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं ।
     कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥२३॥

    रुप धरिलें भयंकर । दुसरा यमाजी भास्कर ।
     आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥२४॥

    तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला ।
     धडकी भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥२५॥

    बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी ।
     ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥२६॥

    आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण ।
     तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥२७॥

    त्याची चुणूक दाखविली । पुढची स्थिति जाणविली ।
     तेथें पळाया नाहीं उरली । यमलोकांत जागा तुला ॥२८॥

    माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां ।
     यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥२९॥

    नको नको हें जीवित । द्या धाडून वैकुंठांत ।
     हीच विनंति आपणांप्रत । महाराज माझी शेवटची ॥१३०॥

    यमलोकीं जें दिसणार होतें । तें तुम्हीं दाविलें येथें ।
     आतां या लेंकरातें । यमलोकीं धाडूं नका ॥३१॥

    माझ्या पातकाच्या राशी । आहेत जरी बहुवशी ।
     परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥३२॥

    कांहीं सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिलें तुम्हांतें ।
     संतभेटी ज्याला होते । यमलोक ना तयासी ॥३३॥

    ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन ।
     महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥३४॥

    श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन ।
     जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥३५॥

    किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची ।
     ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥३६॥

    माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया ।
     ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥३७॥

    तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें ।
     आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥३८॥

    ऐशा रीतीं दोघांचा । संवाद गुप्त स्वरुपाचा ।
     झाला त्या वर्णण्या वाचा । नाहीं माझी समर्थ ॥३९॥

    इहलोकीचें देहभान । माधवाचें निमालें जाण ।
     कित्येक बोलूं लागले जन । उपवासें फिरलें मस्तक ॥१४०॥

    म्हणून वेडेचार करी । जनकल्पना नानापरी ।
     उठत्या झाल्या त्या अवसरीं । त्या किती म्हणून वर्णाव्या ? ॥४१॥

    असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण ।
     चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥४२॥

    असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली ।
     ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥४३॥

    वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा ।
     वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥४४॥

    पन्हें पेढे बरफी खवा । भिजल्या डाळीस मीठ लावा ।
     एकेक रुपया तो द्यावा । घनपाठी ब्राह्मणातें ॥४५॥

    ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले ।
     ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥४६॥

    सांगाल तो करुं खर्च । परी अडचण आहे हीच ।
     ब्राह्मण मिळविण्याचि साच । आमचा उपाय यातें नसे ॥४७॥

    महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी ।
     ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥४८॥

    मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां ।
     झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥४९॥

    सामान सर्व आणिलें । चंदनाचें उटणें केलें ।
     आंत केशर कालविलें । तैसाच आणखी कापुर ॥१५०॥

    दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला ।
     जे पदक्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥५१॥

    थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडळी आनंदली ।
     दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥५२॥

    संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ ।
     कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥५३॥

    बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतीहर्षी ।
     अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥५४॥

    हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
     साधकासी दावो पथ । विमलशा हरिभक्तीचा ॥१५५॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

    ॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 5

    अध्याय ५

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया ।
    दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥

    मी हीन दीन पातकी नर । नाहीं कोणता अधिकार ।
    सर्व बाजूंनीं लाचार । आहें मी देव देवा ॥२॥

    परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी ।
    पाहा अंगीं लाविली खरी । विभूति श्रीशंकरानें ॥३॥

    तो हीनांचा हीनपणा । थोरा न आणि कमीपणा ।
    हें जाणोन नारायणा । गणू हा ठेवा संग्रहीं ॥४॥

    सर्व लाड लेंकराचे । माता ती पुरवि साचे ।
    आहे दासगणूचें । ओझें सर्व तुझ्या शिरीं ॥५॥

    जैसें करशील तैसें करी । परी दया असूं दे अंतरीं ।
    देवा तुझ्या बळावरी । दासगणूच्या सार्‍या उड्या ॥६॥

    गजानन असतां शेगांवीं । यात्रा येई नित्य नवी ।
    ती कोठवरी वर्णावी ? । पार न लागे तियेचा ॥७॥

    महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधुवर ।
    ती उपाधी करण्या दूर । भटकूं लागले काननीं ॥८॥

    महिना महिना तिकडेच राहावें । वाटेल तेथेंच बैसावें ।
    कोणाशीं न उमगूं द्यावें । चरित्र आपुलें येतुलेंही ॥९॥

    श्रोते एका समयासी । महाराज पिंपळगांवासी ।
    गेले तेथें गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥१०॥

    त्या पिंपळगांवच्या शिवारांत । होतें एक अरण्यांत ।
    शंकराचें मंदिर सत्य । जुनें पुराणें हेमाडपंती ॥११॥

    ऐशा त्या मंदिरीं । येते झाले साक्षात्कारी ।
    बैसले शिवाच्या गाभारीं । लावोनिया पद्मासन ॥१२॥

    गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे ।
    घेऊनिया निघाले साचे । अस्तमानीं गांवाकडे ॥१३॥

    मंदिरापुढें तत्त्वतां । एक लहान ओढा होता ।
    तेथें पाणी पाजण्याकरितां । गुरें गुराखी पातले ॥१४॥

    कोणी सहज मंदिरांत । गेले वंदण्या शिवाप्रत ।
    तों तेथें पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥१५॥

    मुलें म्हणती या मंदिरीं । कोणी न पाहिला आजवरी ।
    पुरुष बसलेला निर्धारी । अस्तमानाचे समयाला ॥१६॥

    कांहीं गुराखी बाहेर आले । इतरां बोलावूं लागले ।
    कांहीं तेथेंच बैसले । सत्पुरुषाचे समोर ॥१७॥

    परी साधु बोलेना । डोळे मुळींच उघडीना ।
    याचें कारण कळेना । त्या गुराखी अर्भकांसी ॥१८॥

    कोणी म्हणती थकलेला । हा साधु दिसतो भला ।
    शक्ति मुळीं नुरली त्याला । बोलावयाकारणें ॥१९॥

    कोणी म्हणती उपवासी । असावा निश्चयेसी ।
    थोडी भाकर तयासी । देऊं आपण खावया ॥२०॥

    ऐसें म्हणून भाकर । धरली मुखासमोर ।
    भाविक मुळचीं गुराखी पोरें । हलवूं लागलीं समर्थाला ॥२१॥

    परी साधु हालेना । मुखीं शब्द बोलेना ।
    म्हणून सार्‍या गुराख्यांना । नवल वाटलें विशेष ॥२२॥

    गुराखी आपसांत बोलती । याची मुळीं ना कळे स्थिती ।
    जरी मेला म्हणावा निश्चिती । तरी आहे बसलेला ॥२३॥

    अंग ना झालें थंडगार । ऊन आहे साचार ।
    यावरुन हा जिवंत नर । आहे आहे शंका नको ॥२४॥

    कोणी म्हणे असेल भूत । मायावी रुप दावित ।
    कोणी म्हणे हें तर सत्य । शिवापुढें ना भूत येई ॥२५॥

    कोणी म्हणती स्वर्गीचा । देव हा असावा साचा ।
    लाभ त्याच्या दर्शनाचा । झाला आपणां हेंच भाग्य ॥२६॥

    याचें आतां पूजन । करुं अवघे आपण ।
    जा स्नानालागून । पाणी आणा ओढयाचें ॥२७॥

    पोरें गेलीं ओढयावरी । गेळ्यामध्यें आणिलें वारी ।
    परमभावें पायांवरी । घालिते झाले समर्थांच्या ॥२८॥

    कोणी वन्यपुष्पें आणिलीं । माळ त्यांची तयार केली ।
    कंठामध्यें घातिली । गुराख्यांनीं साधूच्या ॥२९॥

    कोणी कांदाभाकर । नैवेद्यार्थ साचार ।
    दिली ठेवून समोर । एका वडाच्या पानावरी ॥३०॥

    गुराख्यांनीं केलें नमन । आदरें भाव धरुन ।
    कांहीं वेळ केलें भजन । पुढें बसून समर्थांच्या ॥३१॥

    ऐसा आनंद चालला । तों गुराखी एक बोलला ।
    अरे वेळ बहु झाला। चला आतां गांवाकडे ॥३२॥

    दिवस गेला मावळून । कां न आलीं रानांतून ।
    मुलें गुरांना घेऊन । ऐसें लोक म्हणतील कीं ॥३३॥

    कदाचित्‌ आपणांसी । पाहण्या येतील काननासी ।
    तान्ही वांसरें घरांसी । लागलीं असतील हुंबरावया ॥३४॥

    या साधूची हकीकत । आपण सांगूं गांवांत ।
    शहाण्या वडील माणसांप्रत । म्हणजे येईल कळून कीं ॥३५॥

    तें अवघ्यांसी मानवलें । गुराखी सर्व निघून गेले ।
    गांवामाजीं कळविलें । मंदिराचें अवघे वृत्त ॥३६॥

    पुढें श्रोते प्रातःकाळीं । आली गांवची मंडळी ।
    समर्थांसी पाहाण्या भली । गुराख्यांच्या बरोबर ॥३७॥

    जैसा काल होता बसला । तैसाच आतां पाहिला ।
    भाकरीसी ना स्पर्श केला । ती जशीच्या तशीच आहे कीं ॥३८॥

    म्हणूं लागले गांवकरी । हा योगी पुरुष कोणी तरी ।
    आहे बैसला मंदिरीं । सांप्रत या शंकराच्या ॥३९॥

    कोणी ऐसें बोलले । शिव पिंडीच्या बाहेर आले ।
    आपणां दर्शन द्याया भले । चला नेऊं या गांवांत ॥४०॥

    हा समाधी उतरील । तेव्हां कांहीं बोलेल ।
    ती उतरण्या आहे वेळ । त्याला त्रास देऊं नका ॥४१॥

    बंगाल देशीं जालंदर । बारा वर्षें झाले स्थिर ।
    समाधीच्या जोरावर । गर्तेमाजीं ख्यात हें ॥४२॥

    ऐसी भवति न भवति झाली । एक पालखी आणविली ।
    त्यांत उचलून ठेविली । समर्थांची मूर्ति पाहा ॥४३॥

    ग्रामांतील नारीनर । अवघे होते बरोबर ।
    पुढें वाजंत्र्यांचा गजर । होत होता विबुध हो ! ॥४४॥

    मधून मधून तुळशीफुलें । पौर टाकीत होते भले ।
    समर्थाचें अंग झालें । गुलालानें लाली लाल ॥४५॥

    घंटाघड्याळे वाजती । लोक अवघे भजन करिती ।
    जय जय योगिराज मूर्ति । ऐसें उंच स्वरानें ॥४६॥

    मिरवणूक आली गांवांत । मारुतीच्या मंदिरांत ।
    बसविले आणून सद्‌गुरुनाथ । एका भव्य पाटावरी ॥४७॥

    तोही दिवस तैसाच गेला । मग लोकांनीं विचार केला ।
    आपण करुं स्तवनाला । उपाशी बसून याच्यापुढें ॥४८॥

    ऐसा जो तो विचार करिती । तों आले देहावरती ।
    गजानन श्रीसद्‌गुरुमूर्ति । मुगुटमणी योग्यांचे ॥४९॥

    मग काय विचारतां । आनंद झाला समस्तां ।
    प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा । स्वामीचिया चरणांवरी ॥५०॥

    नैवेद्याची धूम झाली । ज्यानें त्यानें आणिलीं ।
    पात्रें तीं वाढून भलीं । मारुतीच्या मंदिरांत ॥५१॥

    त्या अवघ्यांचा स्वीकार । समर्थें केला थोडाफार ।
    हाळोपाळींत साचार । ही वार्ता श्रुत झाली ॥५२॥

    पुढें दुसर्‍या मंगळवारीं । पिंपळगांवचे गांवकरी ।
    आले बाजारा निर्धारीं । शेगांवाकारणें ॥५३॥

    ते शेगांवच्या लोकांसी । सहज बोलले प्रेमेसी ।
    आमच्याही गांवासी । आला एक अवलिया ॥५४॥

    अवलिया थोर अधिकारी । प्रत्यक्ष आहे श्रीहरी ।
    धन्य पिंपळगांव नगरी । पाय लागले साधूचे ॥५५॥

    आम्ही तया योगीवरा । कोठें न जाऊं देऊं खरा ।
    निधि चालत आला घरा । त्यातें कोण दवडी हो ? ॥५६॥

    शेगांवचे बाजारांत । जिकडे तिकडे हीच मात ।
    बंकटलाला झालें श्रुत । वर्तमान तें अवलियाचें ॥५७॥

    बंकटलाल पत्‍नीसहित । गेला पिंपळगांवांत ।
    समर्थासी जोडोन हात । विनवूं लागला नानापरी ॥५८॥

    आतां येतो म्हणून । निघून गेलात आपण ।
    त्यास झाले पंधरा दिन । याचा विचार करा हो ॥५९॥

    गुरुराया तुम्हांवीण । भणभणीत दिसे सदन ।
    शेगांवचे अवघे जन । चिंतातुर झाले हो ॥६०॥

    गाडी आणिली आपणांसाठीं । चला शेगांवीं ज्ञानजेठी ।
    मायलेका होणें तुटी । हें कांहीं बरें नसे ॥६१॥

    कित्येक दयाळा आपुले भक्त । राहिले असती उपोषित ।
    त्या शेगांव शहरांत । नित्य दर्शन घेणारे ॥६२॥

    तुम्ही न आल्या शेगांवीं । मी ही तनु त्यागीन वरवी ।
    आमुची सांगा पुरवावी । आळ कोणी गुरुवर्या ? ॥६३॥

    बंकटलाल ऐसें वदले । महाराज गाडीवरी बसले ।
    शेगांवासी निघाले । पिंपळगांवा सोडून ॥६४॥

    जैसा मागें गोकुळाला । न्याया कृष्णा अक्रूर आला ।
    तैसा बंकटलाल भासला । अक्रूर पिंपळगांवातें ॥६५॥

    पिंपळगांवच्या लोकांप्रती । बंकटलाल समजाविती ।
    नका होऊं दुःखित चित्तीं । जाती न कोठें लांब साधु ॥६६॥

    वाटेल तेव्हां दर्शना यावें । हेतु आपुले पुरवावे ।
    जेथल्या तेथें असूं द्यावें । या अमोल मूर्तीला ॥६७॥

    बहुतेक पिंपळगांवाचा । बंकटलाल साहुकार साचा ।
    मनोभंग साहूचा । करण्या कुळांची छाती नसे ॥६८॥

    चुरमुर्‍याचे लाडू खात । पिंपळगांव बसलें स्वस्थ ।
    महाराज बसून गाडींत । जाऊं लागले शेगांवा ॥६९॥

    पथीं जातां गुरुमूर्ति । बोलली बंकटलालाप्रती ।
    ही का साहूची होय रीति । माल दुसर्‍याचा बळें न्यावा ! ॥७०॥

    मशी यावया तुझ्या घरीं । भय वाटतें अंतरीं ।
    तुझ्या घरचि नाहीं बरी । रीत हें मी पाहतों ॥७१॥

    लक्ष्मी जी लोकमाता । महाविष्णूची होय कांता ।
    जिची असे अगाध सत्ता । तिलाही त्वां कोंडिलें ॥७२॥

    तेथें माझा पाड कोण ? । म्हणून गेलों पळोन ।
    जगदंबेचे पाहून । हाल माझें चित्त भ्यालें ॥७३॥

    ऐसें ऐकतां हंसूं आलें । बंकटलालाप्रती भलें ।
    विनयानें भाषण केलें । तें ऐका सावचित्तें ॥७४॥

    बंकट बोले गुरुनाथा । माझ्या कुलपा न भ्याली माता ।
    आपुला वास तेथें होता । म्हणून झाली स्थीर ती ॥७५॥

    जेथें बाळ तेथें आई । तेथें दुज्याचा पाड काई ? ।
    आपुल्या पायापुढें नाहीं । मला धनाची किंमत ॥७६॥

    तेंच माझें धन थोर । म्हणून आलों इथवर ।
    माझें न उरलें आतां घर । तें सर्वस्वीं आपुलें ॥७७॥

    घरमालकाकारण । शिपाई आडवी कोठून ? ।
    जैसें तुमचें इच्छील मन । तैसेंच तुम्ही वागावें ॥७८॥

    इतकीच माझी विनंती । शेगांवीं असो वस्ती ।
    धेनू काननातें जाती । परी येती घरीं पुन्हां ॥७९॥

    तसेंच तुम्हीं करावें । अवघ्या जगां उद्धरावें ।
    परी आम्हां न विसरावें । शेगांवीं यावें वरचेवर ॥८०॥

    ऐसी समजूत घालून । शेगांवीं आणले गजानन ।
    तेथें कांहीं दिवस राहून । निघून गेले पुनरपि ॥८१॥

    ती ऐकावी तुम्ही कथा । सांगतों मी इथें आतां।
    अडगांव नामें ग्राम होता । एक तया वर्‍हाड प्रांतीं ॥८२॥

    त्या ग्रामाकारण । जाया निघाले दयाघन ।
    प्रातःकाळीं चुकवून । नजर शेगांवकरांची ॥८३॥

    महाराजांची चालगती । वायुचिया समान होती ।
    अंजनी-तनय मारुती । आला काय वाटे पुन्हां ॥८४॥

    मास होता वैशाख । सोळा कलांनीं तपे अर्क ।
    क्वचित्‌ कोठें न राहिलें उदक । ऐसा प्रखर उन्हाळा ॥८५॥

    माध्यान्हीच्या समयाला । अकोली गांवापासी आला ।
    हा योगयोगेश्वर साधु भला । गजानन महाराज ॥८६॥

    तों काय घडलें वर्तमान । समर्थांसी लागली तहान ।
    करिती चौफेर अवलोकन । तों उदक कोठें दिसेना ॥८७॥

    अंगावाटे चालल्या धारा । घामाच्या त्या एकसरा ।
    अधरोष्ठ तो सुकला खरा । उदकाविण समर्थांचा ॥८८॥

    ऐशा दुपारच्या अवसरीं । भास्कर नामें शेतकरी ।
    घालीत होता पाळी खरी । आपुल्या त्या शेताला ॥८९॥

    शेतकर्‍याची पाहतां स्थिति । हें अवघ्यांत मुख्य असती ।
    कृषीवल हा निश्चिती । अन्नदाता जगाचा ॥९०॥

    अंगीं ऐसें मोठेंपण । परी सोशी यातना दारुण ।
    बिचार्‍यांना ऊन ताहान । सोसणें भाग असे कीं ॥९१॥

    त्या अकोलीच्या शिवारांत । जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत ।
    एक वेळा मिळेल घृत । परि अभाव पाण्याचा ॥९२॥

    आपणांतें प्यावयासी । भास्करानें शेतासी ।
    आणिलें खापराच्या घागरीसी । उदक होतें गांवांतून ॥९३॥

    पाठीसी ती भाकर । डोईं जलाची घागर ।
    ऐसा होता प्रकार । शेतामाजीं येण्याचा ॥९४॥

    ती घागर झुडुपाखालीं । होती भास्करें ठेविली ।
    त्या ठिकाणीं स्वारी आली । भास्करा जल मागावया ॥९५॥

    समर्थ म्हणती भास्कराला । तहान लागली मला ।
    पाणी दे बा प्यावयाला । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥९६॥

    पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें ।
    पाण्यावांचून प्राणाचें । रक्षण होणें अशक्य ॥९७॥

    धनिक पाणपोया घालिती । हमरस्त्याच्या पथावरती ।
    याचें कारण शोध चित्तीं । म्हणजे येईल कळोन ॥९८॥

    भास्कर बोले त्यावर । तूं नंगा धूत दिगंबर ।
    तुला दांडग्या पाजितां नीर । पुण्यलाभ कशाचा ? ॥९९॥

    अनाथ-पंगू-दुबळ्यांसाठीं । त्या पुण्याच्या शोभती गोष्टी ।
    वा जो समाजहितासाठीं । झटे त्यासी साह्य करा ॥१००॥

    ऐसें शास्त्राचें आहे वचन । तुझ्यासारख्या मैंदाकारण ।
    आम्ही पाजितां जीवन । तें उलटें पाप होय ॥१॥

    भूतदयेच्या तत्त्वें भला । सर्प कोणी कां पोसला ? ।
    वा जागा चोरट्याला । देती सदनीं काय कोणी ? ॥२॥

    तूं भीक मागून घरोघर । केलेंस पुष्ट शरीर ।
    भारभूत साचार । झालास आपुल्या कृतीनें ॥३॥

    मीं माझ्यासाठीं घागर । आणिली सकाळीं डोक्यावर ।
    त्या आयत्या पिठावर । रेघोट्या तूं ओढूं नको ॥४॥

    तुला ना देणार पाणी । नको करुं रे विनवणी ।
    जा जा करी येथोनी । काळें आपलें चांडाळा ॥५॥

    तुझ्यासारिखे निरुद्योगी । जन्मले आमच्यांत जागजागीं ।
    म्हणून झालों अभागी । आम्ही चहूं खंडांत ॥६॥

    हें भास्कराचें भाषण । समर्थांनीं ऐकून ।
    थोडें करुनी हास्यवदन । निघोन गेले तेथोनिया ॥७॥

    थोड्या दूर अंतरावर । एक होती साच विहीर ।
    तिकडे धांव अखेर । घेतली स्वामीरायांनीं ॥८॥

    स्वामी तिकडे जाऊं लागतां । भास्कर झाला बोलतां ।
    उच्च स्वरें वेड्या वृथा । तिकडे कशाला जातोस ? ॥९॥

    ती कोरडी ठणठणीत । आहे विहीर जाण सत्य ।
    पाणी या एक कोसांत । नाहीं कोठें जाण पिशा ॥११०॥

    समर्थ बोलले त्यावरी । ही सत्य तुझी वैखरी ।
    विहिरींत पाणी नाहीं जरी । परी करितों प्रयत्‍न ॥११॥

    तुझ्यासारखे बुद्धिमान । जलनिं होती हैराण ।
    तें मी नयनीं पाहून । स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥१२॥

    तरी समाजहितासाठीं । काय मी केली सांग गोष्टी ।
    साह्य होतो जगजेठी । हेतु शुद्ध असल्यावर ॥१३॥

    समर्थ आले विहिरीपाशीं । तों थेंब नाहीं तियेशीं ।
    हताश होऊन वृक्षापाशीं । बसले एका दगडावर ॥१४॥

    डोळे मिटून केलें ध्यान । चित्तीं सांठविला नारायण ।
    जो सच्चिदानंद दयाघन । दीनोद्धार जगद्‌गुरु ॥१५॥

    समर्थ म्हणती देवदेवा । हे वामना वासुदेवा ।
    प्रद्युम्ना राघवा । हे विठ्ठला नरहरी ! ॥१६॥

    देवा ही आकोली । पाण्यावांचून त्रस्त झाली ।
    वोलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून ॥१७॥

    मानवी यत्‍न अवघे हरिले । म्हणून तुजला प्रार्थिलें ।
    पाव आतां जगन्माउले । पानी दे या विहिरीला ॥१८॥

    तुझी करणी अघटीत । जें न घडें तें घडविसी सत्य ।
    मांजरें जळत्या आव्यांत । पांडुरंगा ! तूं रक्षिलीं ॥१९॥

    प्रल्हाद भक्त करण्या खरा । स्तंभीं प्रगटलास जगदोद्धारा ।
    बारा गांव वैश्वानरा । भक्षिलें त्वां गोकुळांत ॥१२०॥

    कर नखाग्रीं धरिला गिरी । तूंच कीं रे मुरारी ।
    तुझ्या कृपेची न ये सरी । जगत्रयीं कवणास ॥२१॥

    दामाजीपंत ठाणेदार । त्याच्यासाठीं झालास महार ।
    चोख्यासाठीं ओढीलीं ढोरं । पांखरें रक्षिलीं माळ्याचीं ॥२२॥

    उपमन्यूसाठीं भला । क्षीरसमुद्र तुवां दिला ।
    तहान नामदेवाला । मारवाडांत लागली जैं ॥२३॥

    तैं तुम्ही कौतुक केलें । निर्जलता प्रांतीं भलें ।
    नाम्यासाठीं भरविलें । जल हें आण ध्यानांत ॥२४॥

    ऐसें विनवितां ईश्वरा । विहिरीलागीं फुटला झरा ।
    उफाळ्याचा साजिरा । विहीर भरली क्षणामध्यें ॥२५॥

    साह्य झाल्या जगन्नाथ । काय एक ना तें होत ।
    ईश्वरी सत्ता अगाध सत्य । जें ना घडे तेंच घडवी ॥२६॥

    तेथ पाणी समर्थ प्याले । तें भास्करानें पाहिलें ।
    चित्त त्याचें घोटाळलें । कांहीं नच चाले तर्क त्याचा ॥२७॥

    वर्षें झालीं द्वादश । जल नाहीं या विहिरीस ।
    तिलाच एका घटकेस । यानें जलमय केली कीं ॥२८॥

    यावरुन हा कोणीतरी । खचित आहे साक्षात्कारी ।
    बळेंच फिरतो पिशापरी । हें आतां समजलें ॥२९॥

    शेतीचें काम सोडून । भास्कर आला धांवून ।
    धरितां झाला दृढ चरण । मुखें स्तोत्र आरंभिलें ॥१३०॥

    हे नरदेहधारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा ।
    लेंकरासी कृपा करा । अर्भक मी तुमचें असें ॥३१॥

    तुम्हांतें ना जाणून । मी बोललों टाकून ।
    आतां पस्तावा झाला पूर्ण । क्षमा त्याची करा हो ॥३२॥

    टाकून बोलतां गौळणी । रागावला ना चक्रपाणी ।
    दयाळा बाह्य वेषांनीं । तुझ्या मजला ठकविलें ॥३३॥

    त्याचें तूंच निरसन । केलें चमत्कार दाखवून ।
    भगवंताचें देवपण । कृतीनेंच कळलें कीं ॥३४॥

    तैसा तुझा अधिकार । केवढा तरी आहे थोर ।
    तें कळलें साचार । या जलाच्या कृतीनें ॥३५॥

    कांहीं असो सद्‌गुरुनाथा । मी न सोडी तुम्हां आतां ।
    लेंकरानें भेटतां । माये कोठें न रहावें कीं ॥३६॥

    खोटी ही प्रपंच माया । आले आज कळोनिया ।
    आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ॥३७॥

    भास्करासी समर्थ म्हणती । ऐसा न होई दुःखित चित्तीं ।
    आतां घागर डोक्यावरती । गांवांतून आणूं नको ॥३८॥

    तुझ्यासाठीं हें जीवन । विहिरींत केलें निर्माण ।
    आतां कशाची नुरली वाण । मग का प्रपंच टाकिशी ? ॥३९॥

    पाणी आलें तुझ्याकरितां । बगीचा तो लाव आतां ।
    भास्कर म्हणे गुरुनाथा । हें आमीष दावूं नका ॥१४०॥

    माझा निश्चय हीच विहीर । कोरडी ठणठणीत साचार ।
    होती दयाळा आजवर । थेंब नव्हता पाण्याचा ॥४१॥

    ती विहीर फोडण्याला । तुम्हीच हा प्रयत्‍न केला ।
    साक्षात्काराचा लाविला । सुरुंग खडक फोडावया ॥४२॥

    तेणें हा फुटला खडक । भावाचें लागलें उदक ।
    आतां मला निःशंक । भक्तिपंथाचा लावीन मी ॥४३॥

    वृत्तीच्या मेदिनी ठायीं । फळझाडें तीं लावीन पाही ।
    सन्नीतीची माझे आई । तुझ्या कृपेंकरुन ॥४४॥

    सत्कर्माचीं फुलझाडें । लावीन मी जिकडे तिकडे ।
    हे क्षणैक बैलवाडे । यांचा संबंध आतां नको ॥४५॥

    पहा श्रोते संतसंगति । क्षणैक घडतां भास्कराप्रती ।
    केवढी झाली उपरति । याचा विचार करा हो ॥४६॥

    खर्‍या संताचें दर्शन । आगळें सर्व साधनांहून ।
    तुकारामें केलें वर्णन । "संतचरणरजा" चे अभंगीं ॥४७॥

    तो अभंग पहावा । चित्तीं विचार करावा ।
    आणि त्याचा अनुभव घ्यावा । निजहिताकारणें ॥४८॥

    पाणी लागलें विहिरीस । ही वार्ता आसपास ।
    पसरतां जन दर्शनास । धांवूं लागले स्वामीच्या ॥४९॥

    मधूचा लागतां सुगावा । जैशा मक्षिका घेती धांवा ।
    वा साखरेचा पाहून रवा । मुंग्या येती धांवून ॥१५०॥

    तैसे श्रोते तेथ आले । लोक अपार मिळाले ।
    विहिरीचें पाणी पाहिलें । पिऊन त्यांनीं तेधवां ॥५१॥

    उदक निर्मळ शीत मधुर । गोड अमृताहून फार ।
    करुं लागले जयजयकार । गजाननाचा लोक सारे ॥५२॥

    असो पुढें भास्करासहित । अडगांवासी न जातां परत ।
    महाराज आले शेगांवांत । श्रीगजानन सिद्धयोगी ॥५३॥

    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    होवो जगासी आदर्शभूत । संतमहिमा जाणावया ॥१५४॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 6

    अध्याय ६

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी ।
    अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥

    त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा ।
    मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥

    आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष ।
    आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥

    म्हणोन हे माधवा ! । अभिमान माझा धरावा ।
    रोष कधीं ना करावा । या अजाण लेंकरावर ॥४॥

    बालकांचें हीनपण । मातेलागीं दूषण ।
    हें मनांत आणून करणें असेल तें करी ॥५॥

    असो बंकटलाला घरीं । राहिली समर्थांची स्वारी ।
    तयीं अपूर्व एक घडली खरी । गोष्ट श्रोते ती ऐका ॥६॥

    गांवाचिया दक्षिणेस । बंकटलालाच्या मळ्यास ।
    महाराज गेले एक दिवस । कणसें मक्याचीं खावया ॥७॥

    बहुत मंडळी बरोबरी । कणसें खाया आली खरी ।
    विहिरीपासीं तयारी । केली कणसें भाजण्याची ॥८॥

    विहीर होती धनत्तर । पाणी जिला अपरंपार ।
    गर्द छायेचे वृक्ष थोर । जवळ होते चिंचेचे ॥९॥

    आगट्या पेटल्या एकसरां । आजमासें हो दहा बारा ।
    तेणें डोंब झाला खरा । गगनोदरीं धूमाचा ॥१०॥

    त्यायोगें ऐसे झाले । आग्या मोहोळ लागलेलें ।
    चिंचवृक्षावरी भलें । त्याच्या माशा उठल्या कीं ॥११॥

    त्या माशा उठतां क्षणीं । मंडळी गेली पळोनी ।
    कणसें ठिकाणच्या ठिकाणीं । मक्याचीं तीं राहिलीं हो ॥१२॥

    त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका । पसरल्या अवघ्या मळ्यांत देखा ।
    घोंगड्याचा करुन बुरखा । कोणी गेले पळून ॥१३॥

    प्राणापरी आवडती । वस्तु नसे हो कोणती ।
    अशा वेळीं समर्थमूर्ति । आसनीं होती निर्धास्त ॥१४॥

    ते नाहीं पळून गेले । आसनीं आपल्या स्वस्थ बसले ।
    विचार करुं लागले । निजचित्तीं माश्यांचा ॥१५॥

    माशी तरी मीच झालों । मोहोळ तेंही मीच बनलों ।
    कणसें खाया मीच आलों । कणसें तेंही रुपें माझीं ॥१६॥

    ऐशा विचारें आनंदांत । महाराज राहिले डोलत ।
    अंगावरी असंख्यात । माशा येऊन बैसल्या ॥१७॥

    वाटे पासोडी माश्यांची । समर्थ पांघरले साची ।
    योग्यता ब्रह्मनिष्ठाची । काय वर्णन करावी ? ॥१८॥

    माशा चावती वरच्यावरी । परी न तो पर्वा करी ।
    त्यांचे कांटे शरीरीं । बोचले असती असंख्यात ॥१९॥

    यासी झाला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर ।
    बंकटलालाचें अंतर । दुःखें व्याकुळ झालें हो ॥२०॥

    कोठून बुद्धि झाली मला । येथ आणिलें समर्थाला ।
    कणसें मक्याचीं खावयाला । मंडळीच्या समवेत ॥२१॥

    अशा समर्थालागून । दुःख द्याया मीच कारण ।
    झालों हें कां शिष्यपण । माझे हाय रे दुर्दैवा ! ॥२२॥

    बंकटलालानें तयारी । पुढें येण्याची केली खरी ।
    हें जाणोन अंतरीं । कौतुक केलें समर्थानें ॥२३॥

    जीवांनो ! जा निघोन । बसा मोहोळीं जाऊन ।
    माझ्या बंकटाकारण । तुम्हीं न कोणीं चावावें ॥२४॥

    जमलेल्या मंडळींत । बंकट हाच निःसीम भक्त ।
    जो माझ्याप्रीत्यर्थ । येत आहे धांवोनिया ॥२५॥

    ऐसें म्हणतां माशा गेल्या । मोहोळावरी जाऊन बैसल्या ।
    बंकटलालानें पाहिल्या । त्या आपल्या निजदृष्टीं ॥२६॥

    महाराज त्या पाहोनी । बोलते झाले हांसोनी ।
    वा खूप केलीस मेजवानी । आम्हांसी तूं माश्यांची ॥२७॥

    अरे ते जीव विषारी । बैसले माझ्या अंगावरी ।
    माझ्यापासून झाले दुरी । लड्डूभक्त येधवां ॥२८॥

    याचा करी विचार । संकट आल्या कोणावर ।
    कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावांचुनी ॥२९॥

    जिलबी पेढे बरफी खाती । माशा आल्या पळून जाती ।
    ऐशी जयांची आहे कृति । ते स्वार्थी भक्त निःसंशय ॥३०॥

    बंकटलाल मधुरोत्तर । करितां झाला त्यावर ।
    महाराज आणवूं कां सोनार । कांटे माश्यांचे काढवया ! ॥३१॥

    महापापी मी गुरुराया । तुम्हांलागीं त्रास द्याया ।
    आणवितां झालों या ठायां । माशा किती डसल्या तरी ! ॥३२॥

    गांधी अगणित अंगावर । उठल्या तुमच्या साचार ।
    याचा व्हावया परिहार । उपाय सांगा कोणता ? ॥३३॥

    बंकटलालाचें ऐकिलें । वचन महाराज बोलते झाले ।
    अरे यांत ना कांहीं अधिक घडलें । डसणें स्वभाव माश्यांचा ॥३४॥

    मला त्याची मुळींच बाधा । होणार नाहीं जाण कदा ।
    त्या माशीरुप सच्चिदानंदा । म्यां जाणलें म्हणोन ॥३५॥

    माशी तरी तोच झाला । तोच आहे माझा पुतळा ।
    पाण्यानेंच पाण्याला । काय दुखवितां येईल ? ॥३६॥

    हें ऐकतां ब्रह्मज्ञान । बंकटलाल धरी मौन ।
    कांटे काढण्यालागून । बाहिलें त्यानें सोनारा ॥३७॥

    सोनार चिमटे घेऊन आले । देहास शोधूं लागले ।
    कोठें आहेत कांटे रुतले । मक्षिकेचे पहावया ॥३८॥

    महाराज वदले तयांना । काय ह्या वंध्यामैथुना ।
    करितसा तुमच्या नयनां । कांटे ते ना दिसतील ॥३९॥

    त काढण्या चिमट्याची । गती नाहीं मुळींच साची ।
    साक्ष ती ह्या गोष्टीची । मीच दावितों तुम्हांला ॥४०॥

    ऐसें म्हणून कौतुक केलें । वायूलागीं रोधून धरिलें ।
    तों कांटे अवघे वरी आले । रुतलेल्या स्थलांतून ॥४१॥

    तो पाहतां प्रकार । लोक आनंदले फार ।
    कळून आला अधिकार । श्रीगजाननस्वामीचा ॥४२॥

    पुढें कणसें भाजलीं । अवघ्यांनीं तीं ग्रहण केलीं ।
    अस्तमानीं निघून आली । मंडळी निजगृहातें ॥४३॥

    असो पुढें एक वेळा । महाराज गेले अकोटाला ।
    आपुल्या बंधूस भेटण्याला । श्रीनरसिंगजीकारणें ॥४४॥

    हा कोतश्या अल्लीचा । शिष्य मराठा जातीचा ।
    कंठमणी विठ्ठलाचा । भक्‍तिबलानें झाला असे ॥४५॥

    त्या नरसिंगजीचें चरित्र । मीं भक्‍तलीलामृतांत ।
    वर्णिलें आहे इत्यंभूत । आतां तें सांगणें नको ॥४६॥

    हें आकोट नामें नगर । शेगांवाहून साचार ।
    आहे अठरा कोसांवर । ईशान्येला परियेसी ॥४७॥

    मनोवेगाचा सजवून वारु । निघते झाले सद्‌गुरु ।
    जे पदनताचे कल्पतरु । श्रीगजानन महाराज ॥४८॥

    अकोटाच्या सान्निध्यासी । एका निबिडतरशा अरण्यासी ।
    नससिंग राहे अहर्निशीं । एकान्तवास सेवावया ॥४९॥

    हें निर्जन अवघें अरण्य । महा भयकंर दारुण ।
    निंब अश्‍वत्थ रातांजन । वृक्ष जेथें उदेले ॥५०॥

    लता त्या नाना जाती । वृक्षा वेढून बैसल्या असती ।
    तृण वाढलें भूमीवरती । सर्प वारुळीं असंख्यात ॥५१॥

    ऐशा त्या अरण्यांत । नरसिंगजी जाऊन बसत ।
    म्हणून आले अवचित । समर्थ त्यासी भेटावया ॥५२॥

    सारखा भेटे सारख्यासी । पाणीच मिळें पाण्याशीं ।
    विजातीय द्रव्यासी । समरसता होणें नसे ॥५३॥

    गजाननासी पाहिलें । तेणें चित्त आनंदलें ।
    स्वामी नरसिंगजीचें भलें । तो प्रेमा न वर्णवे कीं ॥५४॥

    एक हरी एक हर । चालते बोलते परमेश्‍वर ।
    एक राम एक कुमर । वसुदेवदेवकीचा ॥५५॥

    एक मुनि वसिष्ठ । एक पाराशर ऋषि श्रेष्ठ ।
    एक जान्हवीचा कांठ । एक तट गोदेचा ॥५६॥

    एक हिरा कोहिनूर । एक कौस्तुभ साचार ।
    एक वैनतेय एक कुमर । सती वानरी अंजनीचा ॥५७॥

    दोघे भेटले एकमेकां । दोघा आनंद सारखा ।
    बैसते झाले आसनीं एका । हितगुज तें करावया ॥५८॥

    अनुभव ते आपापले । एकमेकां कथिते झाले ।
    नरसिंगा, तूं उत्तम केलें । प्रपंचांत राहिलास ॥५९॥

    मीं त्याग केला तयाचा । स्वीकार करुन योगाचा ।
    या सच्चिदानंद तत्त्वाचा । करिता झालों विचार ॥६०॥

    या योगाच्या क्रियेंत । गोष्टी होती अघटीत ।
    ज्यांचा मुळीं न लागे अंत । या सामान्य लोकांला ॥६१॥

    त्या गोष्टी लपवावया । पिसा बनलों जगा ठायां ।
    उपाधी ते नासावया । वेड बळेंच पांघरलों ॥६२॥

    तत्त्व जाणण्याकारण । मार्ग कथिले आहेत तीन ।
    कर्म, भक्ति, योग म्हणून । शास्त्रकारांनीं शास्त्रांत ॥६३॥

    फल या तिन्ही मार्गांचें । एकचि आहे अखेरीचें ।
    परी बाह्य स्वरुप त्यांचें । भिन्न भिन्न असें कीं ॥६४॥

    योगी योगक्रियेचा । जरी अभिमान वाही साचा ।
    तरी तयासी तत्त्वाचा । खर बोध ना होईल ॥६५॥

    योगक्रियावरुन । अलिप्त रहावें तयापासून ।
    कमलपत्रासमान । तरीच तत्त्व कळून ये ॥६६॥

    याचपरी प्रपंचाची । स्थिति नरसिंगा आहे साची ।
    आसक्ति कन्यापुत्रांची । मुळींच राहतां कामा नये ॥६७॥

    गार पाण्यांत राहते । परी न पाणी शिरुं देते ।
    तैसेंच वागती साचें । या प्रपंचामाझारीं ॥६८॥

    यापरी त्वां रहावें । अपेक्षारहित असावें ।
    चित्तांतून ना ढळूं द्यावें । सच्चिदानंद ईशाला ॥६९॥

    म्हणजे कांहींच अशक्य नाहीं । तूं, मी आणि शेषशायी ।
    एकरुप आहों पाही । जन जनार्दन भिन्न नसे ॥७०॥

    नरसिंग म्हणती बंधुराया ! । आलास मसी भेटावया ।
    ही तुझी केवढी दया । उपमा याला देण्या नसे ॥७१॥

    प्रपंच मुळीं अशाश्वत । त्याची काय किंमत ।
    दुपारच्या सावलीप्रत । कोण सांग खरे मानी ? ॥७२॥

    तूं कथिलें जयापरी । तैसा वागेन भूवरीं ।
    मी जाण वरच्यावरी । अशीच भेटी द्यावी तुवां ॥७३॥

    देह-प्रारब्ध जयाचें । असेल ज्या जातीचें ।
    तेंच आहे व्हावयाचें । लोकाचारी निःसंशय ॥७४॥

    तुम्हां आम्हांकारणें । जें का धाडिलें ईशानें ।
    तेंच आहे आपणां करणें । निरालसपणें भूमीवरी ॥७५॥

    आतां विनंति इतुकीच खरी । व्यावहारिक भेट वरच्यावरी ।
    देत जावी साजिरी । मी धाकटा बंधु तुझा ॥७६॥

    नंदीग्रामा राहिला भरत । रघुपतीची वाट पहात ।
    तैसाच मी या आकोटांत । राहून पाहतों वाट तुझी ॥७७॥

    तुला येथें यावया । अशक्य कांहीं नाहीं सदया ।
    अवघ्या आहेत योगक्रिया । अवगत तुला पहिल्यापून ॥७८॥

    पद न लावितां पाण्याप्रत । योगी भरधांव वरुनी पळत ।
    क्षणामाजीं फिरुन येत । शोधून अवघ्या त्रिभुवना ॥७९॥

    ऐसें हितगुज उभयतांचें । रात्रभरी झालें साचें ।
    भरतें आलें प्रेमाचें । दोघांचिया संगमीं ॥८०॥

    खरे खरे जे का संत । तेथें हेंच घडून येत ।
    दांभिकांचीं होतात । भांडणें पाहून एकमेकां ॥८१॥

    दांभिक म्हणूं नये गुरु । ते अवघे पोटभरु ।
    पुरामाजीं फुटकें तारुं । तारण्यासी समर्थ नसे ! ॥८२॥

    दांभिकांचा बोलबाला । जरी होतो जगीं भला ।
    तरी त्यागणें आहे त्याला । निवडूनिया श्रोते हो ! ॥८३॥

    संतत्व नाहीं मठांत । संतत्व नाहीं विद्वत्तेंत।
    संतत्व नाहीं कवित्वांत । तेथें स्वानुभव पाहिजे ॥८४॥

    दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें ।
    गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥

    ही संतजोडी साक्षात्कारी । दांभिकतेची साच वैरी ।
    नांदे ज्याच्या सदैव घरीं । सन्नीति सदाचार ॥८६॥

    नरसिंगजीस भेटण्या जाण । काननीं आले गजानन ।
    ऐसें कळलें वर्तमान । गुराखीद्वारें आकोटाला ॥८७॥

    तें कळतां आनंदले । लोक धावूं लागले ।
    नारळ घेऊन निघाले । पाहाया द्वय संतांसी ॥८८॥

    एकमेकां ऐसें म्हणती । चला चला रे सत्वर गती ।
    गोदा आणि भागीरथी । संगम पावली काननांत ॥८९॥

    त्या भेटरुप प्रयागासी । जाऊं आपण स्नानासी ।
    या महोदयपर्वणीसी । साधून घेऊं चला हो ॥९०॥

    तों इकडे काय झालें । गजानन आधींच निघून गेले ।
    नरसिंगासी पुसून भले । भेट ना झाली पौरांसी ॥९१॥

    पुढें एकदां गजानन । करीत असतां भ्रमण ।
    दर्यापुराच्या सन्निध जाण । येते जाहाले शिष्यांसह ॥९२॥

    दर्यापुराच्या शेजारीं । शिवर गांव निर्धारी ।
    असे चंद्रभागेच्या तीरीं । व्रजभूषणा वास जेथें ॥९३॥

    श्रोते ही चंद्रभागा । पंढरीची नाहीं बघा ।
    ही लहानशी एक गंगा । पयोष्णीला मिळणारी ॥९४॥

    या शिवर गांवांत । व्रजभूषण नामें पंडित ।
    चार भाषा अवगत । होत्या श्रोते जयाला ॥९५॥

    कीर्ति ज्याच्या विद्वत्तेची । वर्‍हाडीं पसरली साची ।
    याला भक्ति भास्कराची । आत्यंतिक असे हो ॥९६॥

    प्रत्यहीं चंद्रभागेवर । स्नान करी साचार ।
    उदयास येतां दिनकर । अर्घ्य त्यासी देतसे ॥९७॥

    पंच पंच उषःकाला । व्रजभूषण उठे भला ।
    सारुन प्रातर्विधीला । अरुणोदयीं स्नान करी ॥९८॥

    तेंही शीतोदकांनीं । ऐसा कर्मठ परी ज्ञानी ।
    मानमान्यता विद्वज्जनीं । ज्याची होती विशेष ॥९९॥

    त्या शिवरगांवाला । योगीराज फिरत आला ।
    वाटे तपाचें द्यावयाला । फल त्या व्रजभूषणासी ॥१००॥

    चंद्रभागेच्या वाळवंटीं । हा बैसला ज्ञानजेठी ।
    समोर नदीचिया कांठीं । आले व्रजभूषण स्नानाला ॥१॥

    ती प्रभातीची वेळा पाही । प्रकाशिल्या दिशा दाही ।
    कुक्कुटाचा आवाज येई । वरचेवरी ऐकावया ॥२॥

    चातक भारद्वाज पांखरें । जाऊं लागलीं अत्यादरें ।
    भास्करासी सामोरे । पूर्व दिशा लक्षून ॥३॥

    भास्कराचा उदय होतां । तम निमाला हां हां म्हणतां ।
    जैसा सभेस पंडित येतां । मूर्ख जाती उठोनी ॥४॥

    ऐशा त्या सुप्रभातीं । वाळवंटीं गुरुमूर्ति ।
    बैसली होती निश्चिती । ब्रह्मानंदीं डोलत ॥५॥

    सवें शिष्य अपार । बसले होते मंडलाकार ।
    ते शिष्य नव्हते किरणें थोर । त्या गजाननभास्कराचीं ॥६॥

    तईं व्रजभूषण तत्त्वतां । झाला सूर्यासी अर्घ्य देतां ।
    तो हा पुढें ज्ञानसविता । त्यानें पाहिला प्रत्यक्ष ॥७॥

    सूर्याप्रमाणें सतेज कांति । अजानुबाहू निश्चिती ।
    दृष्टि नासाग्राच्या वरती । स्थिर जयाची झाली असे ॥८॥

    ऐसा पुरुष पाहतां क्षणीं । व्रजभूषण हर्षला मनीं ।
    संध्यासामान घेऊनी । आला धांवून जवळ त्यांच्या ॥९॥

    अर्घ्य दिलें पायांवरी । गजाननाच्या सत्वरीं ।
    प्रदक्षणाही अखेरी । त्यानें घातली तयाला ॥११०॥

    मित्राय नमः सूर्याय नमः । भानवे नमः खगाय नमः ।
    ऐसीं नांवें घेऊन पाहा । घातले द्वादश नमस्कार ॥११॥

    शेवटीं आरती ओवाळिली । गजाननासी आदरें भली ।
    न्यूनता ती नाहीं पडली । कशाचीही त्या ठायां ॥१२॥

    प्रार्थनापूर्वक नमस्कार । साष्टांग केला अखेर ।
    मुखानें तें स्तवन थोर । महाराजाचें चाललें ॥१३॥

    माझ्या तपाचरणाचें । फळ आजि मिळालें साचें ।
    दर्शन दिव्य पायाचें । आज झालों धन्य मी ॥१४॥

    नभोदरींच्या भास्कराला । देत होतों अर्घ्य भला ।
    तों आज प्रत्यक्ष पाहिला । ज्ञाननिधि योगेश्वर ॥१५॥

    (श्लोक) हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी ? ।
    झाल्यास दर्शने तुझें भवरोगचिंता । नासे गजाननगुरो, मज पाव आतां ॥१॥

    ऐसी प्रार्थना करुन । संपविलें त्यानें स्तवन ।
    योगेश्वरें या आलिंगन । दृढ दिधलें त्या दोन्ही करें ॥१६॥

    माय जैसी लेंकराला । प्रेमें धरी पोटाला ।
    तेवीं व्रजभूषणाला । धरिते झाले महाराज ॥१७॥

    मस्तकावरी ठेविला कर । आशीर्वाद दिधला थोर ।
    सर्वदा तुझा जयजयकार । होईल बाळा व्रजभूषणा ! ॥१८॥

    कर्ममार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको ।
    मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ॥१९॥

    आचरुन कर्मफल । टाकितां भेटतो घननीळ ।
    त्याच्या अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही ॥१२०॥

    तूं आतां आपुल्या सदनीं । माझे बोल ठेवी मनीं ।
    प्रत्यहीं माझें तुला ध्यानीं । होत जाईल दर्शन ॥२१॥

    ऐसें म्हणून प्रसाद दिला । श्रीफलाचा श्रोते भला ।
    त्या व्रजभूषण पंडिताला । महाराज आले शेगांवीं ॥२२॥

    ह्या शेगांवाचें होतें नांव । पूर्वकालीं शिवगांव ।
    अपभ्रंशें लाधला ठाव । शेगांव या शब्दाला ॥२३॥

    तेंच हल्लीं प्रचलीत । आहे बुधहो वर्‍हाडांत ।
    सतरा पाटील होते सत्य । ह्या एकाच ग्रामाला ॥२४॥

    महाराज शेगांवासी आले । परी न स्थिर राहिले ।
    हमेशा ते भटकत फिरले । मनास येईल त्या स्थला ॥२५॥

    आकोट अकोलें मलकापूर । नांवें सांगावीं कुठवर ? ।
    चांदण्यांची न होणार । मोजदाद कोणाही ॥२६॥

    ज्येष्ठ आषाढ महिना गेला । पुढें श्रावण मास आला ।
    उत्सव होता सुरुं झाला । मारुतीच्या राऊळांत ॥२७॥

    हें मारुतीचें मंदिर । शेगांवीं भव्य साचार ।
    पाटील मंडळी थोर थोर । होती या भक्त देवाची ॥२८॥

    पेंडीलागीं जैसा आळा । तेवीं पाटील गांवाला ।
    जें जें कांहीं आवडे त्याला । तिकडे लोकांचा कल होई ॥२९॥

    चाले उत्सव महिनाभर । अभिषेक पोथी कीर्तन गजर ।
    अन्नदानाशीं येई पूर । अवघे लोक तृप्त होती ॥१३०॥

    या उत्सवाचा पुढारी । खंडू पाटील निर्धारी ।
    जो गांवचा कारभारी । होता उदार मनाचा ॥३१॥

    श्रोते हें पाटीलपण । आहे वाघाचें पांघरुण ।
    तें जो घेई त्याला जन । भिऊं लागती सहजची ॥३२॥

    गांव करी तें राव न करी । ऐशी मराठी भितरीं ।
    म्हण एक आहे साजरी । ती यथातथ्य असे ॥३३॥

    त्या मारुई मंदिरासी । आले गजानन पुण्यराशी ।
    श्रावणाच्या आरंभासी । उत्सव श्रीचा पाहावया ॥३४॥

    बोलले बंकटलालासी । मी आतां या मंदिरासी ।
    राहीन जाणा अहर्निशीं । त्याचा शोक करुं नको ॥३५॥

    गोसावी संन्यासी फकीर । यांना कायमचें राहण्या घर ।
    योग्य नाहीं साचार । तुम्हां प्रापंचिकाचें ॥३६॥

    मी परमहंस संन्यासी । आतां राहातों मंदिरासी ।
    तूं बोलाविशी ज्या दिवशीं । तेवढ्यापुरता येईन तेथ ॥३७॥

    हें अंतरींचें गुह्य तुला । कथन केलें बंकटलाला ।
    स्वामी शंकराचार्याला । भ्रमण करणें भाग आलें ॥३८॥

    गोसावी मच्छिंद्र जालंदर । हेही राहिले निरंतर ।
    प्रापंचिकाचें वगळून घर । काननामाजीं वृक्षातळीं ॥३९॥

    छत्रपती राजा शिवाजी । जो रणबहादूर वीरगाजी ।
    ज्यानें हिंदूची रक्षिली बाजी । दंडून दुष्ट यवनांना ॥१४०॥

    त्या शिवाजीचें प्रेम फार । होतें रामदासावर ।
    परी सज्जनगडावर । स्वामी होते वस्तीला ॥४१॥

    याचा विचार करावा । हट्ट मुळीं ना धरावा ।
    माझ्या म्हणण्यास मान द्यावा । यांत कल्याण तुझें असे ॥४२॥

    निरुपाय होऊन अखेर । देता झाला रुकार ।
    तो बंकटलाल सावकार । गजाननाचें म्हणण्याला ॥४३॥

    मंदिरीं स्वामी समर्थ येतां । हर्ष झाला समस्तां ।
    भास्कर पाटील शुश्रूषेकरितां । जवळ राही निरंतर ॥४४॥

    हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
    मुमुक्षूला दावो पथ । संतचरणसेवेचा ॥१४५॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 7

    अध्याय ७

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा ।
     संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥

    तुझ्या कृपेनें वानर । बलिष्ठ झाले भूमीवर ।
     ज्यांनीं रावणाचा चक्काचूर । केला देवा लंकेवरी ॥२॥

    तुझी कृपा झाल्या पाही । तो सर्वदा होतो विजयी ।
     जें जें इच्छील तें तें नेई । काम आपलें तडीला ॥३॥

    भूपतीचा वशीला । ज्यातें देवा ! लाधला ।
     तो वंद्य होतो दिवाणाला । नीच कितीही असला जरी ॥४॥

    ऐशा अमोघ कृपेला । होईन कां मी योग्य भला ।
     याचा जों मीं विचार केला । तों ऐसें आलें कळोन ॥५॥

    नाहीं ज्ञान नाहीं भक्ति । खरीखुरी हे श्रीपती ।
     ऐसी आहे माझी स्थिति । शोचनीय पांडुरंगा ॥६॥

    मन सदा आशाळभूत । तें ना कदा स्थिर होत ।
     नाना विकल्प मनांत । येऊं लागती वरच्यावरी ॥७॥

    मग ऐशा पातक्याला । केवि लाधावा वशीला ।
     तुझा सांग जगत्पाला । हें व्यावहारिक म्हणणें असे ॥८॥

    तुला आवडी पातक्याची । मनापासून आहे साची ।
     ऐसी साक्ष पुराणाची । आहे कीं दीनबंधो ॥९॥

    पुण्यवानाचें तारण । केल्या न कांहीं नवल जाण ।
     जो पातक्यालागून । उद्धरीतसे तोच मोठा ॥१०॥

    या जगतीं तुझ्याहून । मोठा नाहीं कोणी आन ।
     देवा मम पातकालागून । किमपि आतां पाहूं नको ॥११॥

    रक्षी आपला मोठेपणा । मज सांभाळी नारायणा ।
     दासगणू शरण चरणा । आतां उपेक्षा करुं नका ॥१२॥

    हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव ।
     याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१३॥

    हें पाटीलघराणें जाण । आहे अति पुरातन ।
     घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥१४॥

    पूर्वीपासून यांच्या घरीं । संत-सेवा होती खरी ।
     आली भाग्यें जमेदारी । मग काय विचारितां ? ॥१५॥

    महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस ।
     थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥१६॥

    कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका ।
     गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥१७॥

    पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहाजण ।
     कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हता त्याचे कुशीं ॥१८॥

    कडताजी पावतां मरण । साही मुलांचें संगोपन ।
     कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥१९॥

    कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत ।
     अष्टसिद्धि सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥२०॥

    पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार ।
     याच्या पुढें साचार । कांहीं न चाले कोणाचें ॥२१॥

    या खंडू पाटलाप्रती । पांच बंधु निश्चिती ।
     गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥२२॥

    आधींच पाटील जमेदार । सत्ता हातीं साचार ।
     पैशाचा तो निघे धूर । जयाचिया सदनामध्यें ॥२३॥

    बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती ।
     कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥२४॥

    उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा ।
     म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥२५॥

    नेहमीं कटकटी मारामार्‍या । शेगांवांत होती खर्‍या ।
     पाटील एक्या मापीं सार्‍या । लोकांप्रती मोजितसे ॥२६॥

    हा सज्जन साधुसंत । हें न ज्यांच्या मनीं येत ।
     वाटेल त्या बोलती सत्य । अद्वातद्वा यथामती ॥२७॥

    असो पाटीलबंधूंनीं । राउळांत येऊनी ।
     महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरुं केलें ॥२८॥

    कोणी म्हणावें पिश्यागण्या । खातोस का ताककण्या ? ।
     ऐशा गोष्टी अति उण्या । त्यांनीं कराव्या समर्थासी ॥२९॥

    कोणी म्हणावें खेळ कुस्ती । आम्हांसवें निश्चिती ।
     तुला लोक बोलती । योगयोगेश्वर म्हणोन ॥३०॥

    त्याचें दाव प्रत्यंतर । ना तरी आम्ही देऊं मार ।
     याचा करी विचार । बर्‍या बोलानें येधवां ॥३१॥

    त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें ।
     अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित्‌ ॥३२॥

    ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर ।
     म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥३३॥

    नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं ।
     हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥३४॥

    हे शक्तीनें माजलें । लक्ष्मीनें धुंद झाले ।
     सत्तेपुढें कांहीं न चाले । येथें यांची पाटीलकी ॥३५॥

    गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी ।
     ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परम भक्त ॥३६॥

    मात्र विनयाप्रती थारा । यांच्यापाशीं नाहीं जरा ।
     शोधुनि पहा अंतरा । त्यांच्या म्हणजे कळेल तुज ॥३७॥

    हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेंकरें आहेत साचीं ।
     कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥३८॥

    जमेदारा उर्मटपण । हेंच आहे भूषण ।
     काय वाघाचें तें वजन । असावें सांग गाईपरी ? ॥३९॥

    तलवारीला मऊपणा । मुळीं उपयोगी नाहीं जाणा ।
     अग्नीनें तो थंडपणा । सांग धरावा कवण्या रीती ? ॥४०॥

    गेल्यावरी कांहीं काळ । हा उर्मटपणा जाईल ।
     पावसाळ्याचें गढूळ जल । हिंवाळ्यांत निवळ होई ॥४१॥

    एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरीं ।
     महाराजाला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥४२॥

    तुला कुस्तींत करीन चीत । चाल जाऊं तालमींत ।
     उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥४३॥

    तुझें प्रस्थ माजलें बहु । तें खरें खोटें आज पाहूं ।
     मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥४४॥

    तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्यें गेले ।
     समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥४५॥

    खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून ।
     असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥४६॥

    हरी पाटील उठवावया । लागला यत्‍न करावया ।
     परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥४७॥

    घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली ।
     पेच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥४८॥

    हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? ।
     अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥४९॥

    हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी ।
     खोड्या आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥५०॥

    त्याचें हेंच कारण । हा गजापरी बलवान ।
     आम्ही जंबुकासमान । म्हणून नाहीं रागावला ॥५१॥

    जंबुकाच्या चेष्टेला । गजपती न मानी भला ।
     श्वानाचिया भुंकण्याला । व्याघ्र दे ना किंमत ॥५२॥

    कांहीं असो याच्या पायीं । आतां ठेवणें आली डोई ।
     आजपर्यंत मी नाहीं । कवणासीही नमन केलें ॥५३॥

    समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला ।
     ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥५४॥

    कुस्ती हा मर्दानी । षोक श्रेष्ठ सर्वांहुनी ।
     कृष्ण बलरामें बालपणीं । ऐशाच कुस्त्या केल्या रे ! ॥५५॥

    मुष्टिक आणि चाणूर । मल्लविद्येनें परमेश्वर ।
     वधिता झाला साचार । जे देहरक्षक कंसाचे॥५६॥

    पहिली संपत्ति शरीर । दुअरें तें घरदार ।
     तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ॥५७॥

    तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातीरीं ।
     गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥५८॥

    तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें ।
     ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥५९॥

    हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज ।
     येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥६०॥

    हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास ।
     शेगांवच्या लेंकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥६१॥

    ऐसें धूर्तपणाचें बोलणें । केलें पाटील हरीनें ।
     जे मुळांत असती शहाणे । त्यांना शाळा नको कीं ॥६२॥

    असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून ।
     अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥६३॥

    ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती ।
     हरी तूं त्या जोगड्याप्रति । कां भितोसी कळेना ॥६४॥

    आपण पाटलाचे कुमार । या गांवींचे जमेदार ।
     तें तूंच कां रे ठेविशी शिर । पदीं त्या नागव्याच्या ॥६५॥

    त्या पिशाचें थोतांड । गांवीं माजलें उदंड ।
     त्याचा पाहिजे काढिला दांड । लोकां सावध करावया ॥६६॥

    ऐसें न जरी आपण केलें । तरी लोक अवघे होतील खुळे ।
     पाटलाचें कर्तव्य भलें । गांवा हुशार करण्याचें ॥६७॥

    मैंद साधूचे वेष घेती । वेड्यावांकड्या कृत्या करिती ।
     बाया बापड्या भोंदिती । याचा करी विचार ॥६८॥

    सोन्या कस लाविल्याविना । न कळे रे सोनेपणा ।
     तुकारामाचा शांतपणा । कळून आला उंसानें ॥६९॥

    ज्ञानेश तेव्हां साधु कळला । जेव्हां रेडा बोलला ।
     परीक्षेविण कवणाला । अस्थानीं मान देऊं नये ॥७०॥

    चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची ।
     मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥७१॥

    हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला ।
     अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥७२॥

    जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची ।
     तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥७३॥

    आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर ।
     त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥७४॥

    ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले ।
     लेंकरांचे बालिश चाळे । मनीं न आणी सुज्ञ कदा ॥७५॥

    मारुती म्हणाला त्यावर । अरे हा भ्याला साचार ।
     ऊंसाचा तो खाण्या मार । हा कांहीं तयार नसे ॥७६॥

    मग म्हणाला गणपती । अरे मौन हीच संमती ।
     त्यानें दिधली आपणाप्रति । आतां काय पहातां ? ॥७७॥

    तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले ।
     समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥७८॥

    तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर ।
     ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥७९॥

    भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी ।
     या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥८०॥

    तुमचा पाटील-कुळांत । जन्म झाला आहे सत्य ।
     तुमचें असावें दयाभूत । अंतःकरण दीनांविषयीं ॥८१॥

    हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसीं ।
     तरी हीन दीन लेखून यासी । द्यावें सोडून हेंच बरें ॥८२॥

    अरे शूर जे का शिकारी । ते चाल करिती वाघावरी ।
     उगीच बंदूक घेऊनि करीं । न मारिती नाकतोडा ॥८३॥

    मारुतीनें जाळिली । रावणाची लंका भली ।
     उगीच नाहीं चाल केली । झोंपड्या पाहून दुबळ्यांच्या ॥८४॥

    यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिलें सारें ।
     गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥८५॥

    म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग ।
     यांत न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥८६॥

    ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत ।
     जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥८७॥

    परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले ।
     कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥८८॥

    तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं ।
     म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥८९॥

    महाराज म्हणती पोरांला । मुलांनो ! तुमच्या करांला ।
     असेल अती त्रास झाला । मारण्यानें मजलागीं ॥९०॥

    त्या श्रमाचा करण्या नास । काढून देतों इक्षुरस ।
     तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥९१॥

    ऐसें म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला ।
     हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥९२॥

    त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनीं पहा पिळिली ।
     आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥९३॥

    श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस ।
     तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥९४॥

    लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती ।
     योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥९५॥

    पौष्टिक पदार्थें शक्ति येते । परी न ऐशी कायम टिकते ।
     सशक्त आपुल्या राष्ट्रातें । करणें असल्या योग शिका ॥९६॥

    हेंच तत्त्व सुचवावयासी । त्या पाटील अर्भकांशीं ।
     करें काढून रसाशीं । दाविते झाले श्रोते हो ॥९७॥

    समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून ।
     खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥९८॥

    दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात्‌ ।
     त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥९९॥

    ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी ।
     ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥१००॥

    मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला ।
     परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित्‌ ॥१॥

    गण्या, गजा ऐसें म्हणे । पाटील समर्थाकारणें ।
     अरे तुरे हें बोलणें । होतें दोन ठिकाणीं ॥२॥

    प्रेम आत्यंतिक जें काई । तेथें ऐसें घडून येई ।
     आई लेंकरांमाजी होई । भाषण अरेतुरेचें ॥३॥

    हा एक प्रकार झाला । आतां दुसरा राहिला ।
     तोही सांगतों ऐका भला । सावधान चित्तानें ॥४॥

    नोकर चाकर हीन दीन । यांच्या सवें जें भाषण ।
     करिती संभावित जन । तेंही एकेरी स्वरुपाचें ॥५॥

    अरे तुरे म्हणण्याची । संवय पाटला पडे साची ।
     कां कीं रयत गांवचीं । लेकरें त्याचीं निःसंशय ॥६॥

    श्रोते याच संवयीनें । खंडू पाटील गण्या म्हणे ।
     श्रीसमर्थांकारणें । कांहीं न दुसरें कारण ॥७॥

    गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणीं ।
     पहा नारळालागुनी । वर करवंटीं खोबरें आंत ॥८॥

    याच न्यायें तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा ।
     वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥९॥

    कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं ।
     तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥११०॥

    सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी ।
     मग का रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्याच्या पुढें ॥११॥

    तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृधापकाळ ।
     नातवंडाचे बोल खेळ । पाहूं दे मज डोळ्यानें ॥१२॥

    आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना ।
     म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादें द्या मज ॥१३॥

    तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ ।
     आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥१४॥

    साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं ।
     संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥१५॥

    तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणें केलें ।
     मारुतीच्या मंदिरीं भलें । तें ऐका येणें रितीं ॥१६॥

    अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां ।
     इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥१७॥

    तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती ।
     इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥१८॥

    त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर ।
     तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥१९॥

    ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्याशीं बोलले ।
     आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥१२०॥

    सत्ता धन तुझ्या हातीं । तूं प्रयत्‍नवादी असशी निगुती ।
     मग विनंती आम्हांप्रति । कां करितोस कळेना ? ॥२१॥

    धन आणि बलापुढें । अवघेंच म्हणशी बापुडें ।
     मग कां रे हें न घडे । साह्यें धनबालच्या ॥२२॥

    तुझी भव्य आहे शेती । गिरण्या दुकानें पेढ्या अती ।
     तुझें न कोणी मोडती । जन शब्द या वर्‍हाडांत ॥२३॥

    मग त्या ब्रह्मदेवाला । कां न आज्ञा करिशी भला ? ।
     आपणां पुत्र द्यावयाला । हेंच कोडें पडलें मज ॥२४॥

    खंडू करी भाषण । ही गोष्ट ना यत्‍नाधीन ।
     पिकें पाण्यापासून । येती जरी जगामध्यें ॥२५॥

    तरी पाडणें पाणी । मानवाच्या न करी जाणी ।
     दुष्काळांत जमिनी । पडती उताण्या ख्यात हें ॥२६॥

    मात्र पाणी पडल्यावर । कर्तृत्व आपुलें चालवी नर ।
     तैसाच हाही प्रकार । तेथें न गती मानवाची ॥२७॥

    खंडू पाडील ऐसें बोलतां । हंसूं आलें समर्था ।
     तूं केलीस याचना आतां । मजकारणें पोराची ॥२८॥

    याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख ।
     तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥२९॥

    पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी ।
     परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठीं परमेश्वरा ॥१३०॥

    तो ऐकेल माझी भीड । त्याला न हें कांहीं जड ।
     तूं घरचा आहेस धड । रस आंब्याचा द्विजां घाली ॥३१॥

    हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण ।
     आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥३२॥

    हें खंडुनें ऐकिलें । घरीं येऊन सांगितलें ।
     कुकाजीसी निवेदिलें । मंदिरींचें वर्तमान ॥३३॥

    हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस ।
     तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥३४॥

    कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची ।
     गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥३५॥

    तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला ।
     कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥३६॥

    त्यानें दह्र्म केला बहू । गरीबां दिले गूळ गहूं ।
     पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥३७॥

    थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें ।
     पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदूपरी ॥३८॥

    आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण ।
     तो सांप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥३९॥

    पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी ।
     पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥१४०॥

    हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा ।
     शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥४१॥

    एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची ।
     अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥४२॥

    प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात ।
     सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥४३॥

    शास्त्री दोन मंत्री दोन । शस्त्री दोन तंत्री दोन ।
     एकमेकांपुढें श्वान । येतां गुरगुर रोकडी ॥४४॥

    तैसें झालें शेगांवांत । पाटील आणि देशमुखांत ।
     छत्तिसाचा आंकडा सत्य । झाला न होईल त्रेसष्टाचा ॥४५॥

    पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी ।
     पाहूनिया नातवंडासी । भीमातटीं पंढरींत ॥४६॥

    तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन ।
     तो म्हणे छत्र पूर्ण । माझें आज ढासळलें ॥४७॥

    ज्या चुलत्याच्या जिवावरी । मी निर्भय होतों भूमिवरी ।
     तो आधार माझा श्रीहरी । कां रे नेलास काढून ? ॥४८॥

    ऐशी संधि पाहून । बालंट आणायाकारण ।
     पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥४९॥

    तो वृत्तान्त अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत ।
     ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥१५०॥

    हा दासगणूविरचित । गजाननविजयनामें ग्रंथ ।
     परिसा श्रोते सावचित्त । कुतर्कातें सोडोनिया ॥१५१॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 8

    अध्याय ८

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना ।
    हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥

    तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान ।
    परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥

    तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं ।
    त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥

    गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद ।
    कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥

    अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती ।
    तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥

    जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां ।
    तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥

    ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी ।
    दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥

    हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी ।
    स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥

    तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून ।
    घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥

    मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात ।
    निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥

    ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा ।
    घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥

    तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन ।
    अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥

    असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं ।
    मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥

    जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी ।
    अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥

    क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला ।
    नेतसे यमसदनाला । प्रयत्‍न पडती लुळे तेथ ॥१५॥

    असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार ।
    करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥

    पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी ।
    कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥

    तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर ।
    तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥

    पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी ।
    गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥

    उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा ।
    तुझ्यासारख्या नकट्याचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥

    तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना ।
    त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥

    बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण ।
    कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥

    तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी ।
    कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥

    तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार ।
    देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥

    कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी ।
    तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥

    ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला ।
    मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥

    ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं ।
    भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥

    त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर ।
    पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥

    त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी ।
    महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥

    पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला ।
    तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥

    तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं ।
    मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥

    वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली ।
    ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥

    त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी ।
    समाजविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥

    कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् ।
    कांट्यांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥

    फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची ।
    आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥

    शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार ।
    पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकड्या ॥३६॥

    खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें ।
    तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥

    ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी ।
    तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥

    अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण ।
    बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥

    खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला ।
    श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥

    त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन ।
    करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥४१॥

    लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधु गेले अकोल्याला ।
    खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥

    येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर ।
    महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥

    सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत ।
    तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥

    त्याचा ऐसा परिणाम झाला । कांट्याचा नायटा केला ।
    देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥

    त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला ।
    समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥

    उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत ।
    बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥

    त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा ।
    ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥

    अब्‍रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण ।
    अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥

    त्या अपराधरुपी खड्याचा । हा डोंगर झाला साचा ।
    अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥

    जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला ।
    होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥

    तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली ।
    प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥

    तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली ।
    नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥

    ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला ।
    आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥

    घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार ।
    नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥

    इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें ।
    खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥

    अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात ।
    वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥

    स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां ।
    खर्‍या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥

    तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून ।
    एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥

    मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य ।
    परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥

    म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें ।
    सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥

    जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार ।
    किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥

    तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले ।
    जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥

    पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार ।
    कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥

    पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें ।
    नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥

    असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ ।
    ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥

    तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती ।
    परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥

    तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण ।
    तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥

    त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र ।
    जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥

    मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली ।
    म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥

    आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां ।
    हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥

    ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची ।
    वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥

    मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा ।
    उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥

    जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी ।
    तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥

    चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य ।
    वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥

    तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले ।
    मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥

    सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार ।
    दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥

    विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी ।
    चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥

    हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा ।
    हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥

    परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची ।
    कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥

    कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी ।
    हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥

    असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून ।
    देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥

    ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले ।
    महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥

    श्रोते खर्‍या संताप्रत । उपाधी ना असे पटत ।
    दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥

    गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला ।
    या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥

    एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार ।
    लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥

    हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा ।
    हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥

    त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले ।
    एका ओट्यावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥

    समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी ।
    कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥

    हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर ।
    हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥

    तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला ।
    येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥

    तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले ।
    ओट्यावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥

    समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला ।
    राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥

    महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर ।
    सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाट्या ॥९४॥

    खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी ।
    समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥

    असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत ।
    येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥

    समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला ।
    म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥

    गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी ।
    जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥

    गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर ।
    ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥

    ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे ।
    महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥

    हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी ।
    ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥

    शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित ।
    लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥

    तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं ।
    पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥

    तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत ।
    मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥

    गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती ।
    ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥

    आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त ।
    मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥

    कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी ।
    आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥

    जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल ।
    तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥

    दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी ।
    मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥

    समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं ।
    गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥

    त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य ।
    तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥

    गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले ।
    पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥

    "नैनं छिन्दन्ति" हा श्लोक । निरुपणाचा होता देख ।
    ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥

    निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्‍यास नाहीं पटलें ।
    ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥

    सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं ।
    गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥

    लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला ।
    येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥

    तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष ।
    या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥

    अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया ।
    त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥

    पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी ।
    चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥

    त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची ।
    ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥

    कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर ।
    पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥

    तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा ।
    पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥

    लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं ।
    तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥

    तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें ।
    कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥

    अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी ।
    तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥

    त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ ।
    ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥

    "नैनं छिन्दन्ति" श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर ।
    आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥

    जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी ।
    आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥

    ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी ।
    ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥

    भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्‍त पिळदार ।
    तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥

    पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर ।
    परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥

    श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत ।
    हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥

    त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें ।
    मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥

    ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं ।
    महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥

    तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर ।
    उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायाच्या ॥३५॥

    ’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य ।
    ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥

    गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत ।
    शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥

    माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा ।
    केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥

    तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों ।
    मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥

    शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी ।
    आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥

    तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां ।
    अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥

    म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥
    गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥

    लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन ।
    तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥

    अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला ।
    तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥

    ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला ।
    स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥

    मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला ।
    आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥

    ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी ।
    अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥

    नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात ।
    तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥

    गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार ।
    ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥

    स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं ।
    प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥

    स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी ।
    होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥

    उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी ।
    सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥

    ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला ।
    प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥

    ही गोष्ट दुसर्‍या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी ।
    जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥

    हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
    तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 9

    अध्याय ९

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना ।
    हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥

    तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान ।
    परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥

    तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं ।
    त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥

    गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद ।
    कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥

    अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती ।
    तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥

    जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां ।
    तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥

    ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी ।
    दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥

    हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी ।
    स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥

    तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून ।
    घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥

    मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात ।
    निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥

    ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा ।
    घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥

    तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन ।
    अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥

    असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं ।
    मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥

    जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी ।
    अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥

    क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला ।
    नेतसे यमसदनाला । प्रयत्‍न पडती लुळे तेथ ॥१५॥

    असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार ।
    करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥

    पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी ।
    कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥

    तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर ।
    तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥

    पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी ।
    गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥

    उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा ।
    तुझ्यासारख्या नकट्याचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥

    तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना ।
    त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥

    बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण ।
    कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥

    तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी ।
    कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥

    तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार ।
    देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥

    कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी ।
    तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥

    ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला ।
    मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥

    ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं ।
    भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥

    त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर ।
    पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥

    त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी ।
    महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥

    पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला ।
    तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥

    तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं ।
    मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥

    वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली ।
    ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥

    त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी ।
    समाजविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥

    कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् ।
    कांट्यांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥

    फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची ।
    आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥

    शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार ।
    पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकड्या ॥३६॥

    खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें ।
    तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥

    ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी ।
    तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥

    अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण ।
    बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥

    खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला ।
    श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥

    त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन ।
    करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥४१॥

    लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधु गेले अकोल्याला ।
    खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥

    येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर ।
    महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥

    सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत ।
    तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥

    त्याचा ऐसा परिणाम झाला । कांट्याचा नायटा केला ।
    देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥

    त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला ।
    समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥

    उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत ।
    बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥

    त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा ।
    ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥

    अब्‍रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण ।
    अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥

    त्या अपराधरुपी खड्याचा । हा डोंगर झाला साचा ।
    अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥

    जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला ।
    होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥

    तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली ।
    प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥

    तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली ।
    नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥

    ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला ।
    आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥

    घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार ।
    नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥

    इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें ।
    खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥

    अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात ।
    वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥

    स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां ।
    खर्‍या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥

    तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून ।
    एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥

    मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य ।
    परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥

    म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें ।
    सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥

    जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार ।
    किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥

    तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले ।
    जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥

    पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार ।
    कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥

    पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें ।
    नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥

    असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ ।
    ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥

    तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती ।
    परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥

    तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण ।
    तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥

    त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र ।
    जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥

    मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली ।
    म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥

    आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां ।
    हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥

    ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची ।
    वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥

    मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा ।
    उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥

    जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी ।
    तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥

    चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य ।
    वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥

    तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले ।
    मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥

    सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार ।
    दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥

    विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी ।
    चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥

    हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा ।
    हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥

    परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची ।
    कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥

    कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी ।
    हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥

    असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून ।
    देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥

    ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले ।
    महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥

    श्रोते खर्‍या संताप्रत । उपाधी ना असे पटत ।
    दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥

    गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला ।
    या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥

    एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार ।
    लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥

    हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा ।
    हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥

    त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले ।
    एका ओट्यावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥

    समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी ।
    कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥

    हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर ।
    हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥

    तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला ।
    येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥

    तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले ।
    ओट्यावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥

    समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला ।
    राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥

    महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर ।
    सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाट्या ॥९४॥

    खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी ।
    समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥

    असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत ।
    येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥

    समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला ।
    म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥

    गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी ।
    जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥

    गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर ।
    ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥

    ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे ।
    महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥

    हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी ।
    ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥

    शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित ।
    लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥

    तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं ।
    पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥

    तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत ।
    मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥

    गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती ।
    ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥

    आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त ।
    मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥

    कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी ।
    आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥

    जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल ।
    तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥

    दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी ।
    मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥

    समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं ।
    गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥

    त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य ।
    तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥

    गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले ।
    पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥

    "नैनं छिन्दन्ति" हा श्लोक । निरुपणाचा होता देख ।
    ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥

    निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्‍यास नाहीं पटलें ।
    ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥

    सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं ।
    गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥

    लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला ।
    येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥

    तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष ।
    या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥

    अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया ।
    त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥

    पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी ।
    चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥

    त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची ।
    ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥

    कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर ।
    पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥

    तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा ।
    पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥

    लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं ।
    तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥

    तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें ।
    कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥

    अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी ।
    तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥

    त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ ।
    ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥

    "नैनं छिन्दन्ति" श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर ।
    आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥

    जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी ।
    आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥

    ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी ।
    ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥

    भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्‍त पिळदार ।
    तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥

    पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर ।
    परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥

    श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत ।
    हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥

    त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें ।
    मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥

    ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं ।
    महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥

    तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर ।
    उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायाच्या ॥३५॥

    ’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य ।
    ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥

    गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत ।
    शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥

    माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा ।
    केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥

    तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों ।
    मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥

    शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी ।
    आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥

    तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां ।
    अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥

    म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥
    गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥

    लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन ।
    तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥

    अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला ।
    तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥

    ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला ।
    स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥

    मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला ।
    आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥

    ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी ।
    अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥

    नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात ।
    तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥

    गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार ।
    ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥

    स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं ।
    प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥

    स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी ।
    होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥

    उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी ।
    सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥

    ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला ।
    प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥

    ही गोष्ट दुसर्‍या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी ।
    जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥

    हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
    तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 10

    अध्याय १०

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया ।
    सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥

    देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं ।
    माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥

    माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून ।
    फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य नसे ॥३॥

    ऐसी स्थिति आहे जरी । परि देवा कृपा करी ।
    ओहळास गोदावरी । पोटीं आपल्या घेतसे ॥४॥

    तैसें तुवां करावें । दुःख अवघें निवारावें ।
    पातकाला न उरुं द्यावें । माझ्या ठायीं यत्किंचित्‌ ॥५॥

    तूं आणिल्या मनांत । अवघेंच कांहीं घडून येत ।
    रंकाचाही राव होत । तुझा लाधतां वशीला ॥६॥

    असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी ।
    जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥७॥

    हा आत्माराम भिकाजी-सुत । उमरावतीचा असे प्रांत ।
    मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥८॥

    कायस्थ प्रभू याची जात । हा संतांचा प्रेमी अमित ।
    सदाचारसंपन्न गृहस्थ । गृहस्थाश्रमीं वर्ततसे ॥९॥

    त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिले ।
    मंगलस्नान घातिलें । उष्णोदकानें गजानना ॥१०॥

    उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं ।
    वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥११॥

    कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा ।
    भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥१२॥

    कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार ।
    दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥१३॥

    धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली ।
    दर्शनालागीं दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥१४॥

    प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें ।
    यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥१५॥

    इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्याची मनीषा पुरली ।
    सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥१६॥

    तें ज्यांच्यापासीं होतें । समर्थ गेले तेथें तेथें ।
    कां कीं साधूस अवघें कळतें । अंतर्ज्ञानें करुन ॥१७॥

    गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ बडे ।
    वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१८॥

    दादासाहेब यांप्रत । म्हणत होते वर्‍हाडांत ।
    हा सज्जन भाविक अत्यंत । ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी ॥१९॥

    त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं ।
    तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥२०॥

    गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायतवाणी ।
    चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥२१॥

    ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला ।
    कसेंही करुन घराला । पाहा विनंति करुन ॥२२॥

    आपुलें निष्पाप असल्या मन । याच्या आगमनें करुन ।
    होईल आपलें पवित्र सदन । भाविकाचा देव असे ॥२३॥

    गणेश आप्पा म्हणे तिला । वेड लागलें आहे तुला ।
    हा सदनीं साधु न्यावयाला । वशिला पाहिजे बलवत्तर ॥२४॥

    पाहा खापडर्यालागुनी । हा साधु न्यावया सदनीं ।
    श्रम पडले ते आण ध्यानीं । उगा हट्ट धरुं नको ॥२५॥

    चंद्राबाई म्हणे नाथा । हें न पटे माझ्या चित्तां ।
    सांगे माझी मनदेवता । सदनीं साधु येतील हो ॥२६॥

    तुम्ही करा हो त्यांना नुसती । सदनीं येण्यास विनंति ।
    गरीबावरी असते प्रीति । संतांची ती विशेष ॥२७॥

    परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना ।
    बोलावयासी निजसदना । श्रीगजानन साधुतें ॥२८॥

    महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर।
    तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥२९॥

    तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांहीं वेळ बसावें ।
    अरे चित्तीं असेल तें बोलावें । भीड न धरितां कवणाची ॥३०॥

    ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता ।
    हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवे ॥३१॥

    समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं ।
    आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ॥३२॥

    असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतींत ।
    त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥३३॥

    तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा ।
    राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥३४॥

    तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला ।
    भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥३५॥

    त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान ।
    म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥३६॥

    प्रपंच अवघा अशाश्वत । त्यांत कशाला गोवूं चित्त ।
    केला आजपर्यंत । तोच आतां पुरे झाला ॥३७॥

    कांहीं असो आजपून । मी न सोडी त्याचे चरण ।
    अमृताला टाकून । विष प्याया कोणी जावें ? ॥३८॥

    म्हणून प्रत्येक पूजेला । बाळाभाऊ हजर भला ।
    होता बुध हो राहिला । दुसरें न कांहीं कारण ॥३९॥

    असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी ।
    मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोठयाच्या ॥४०॥

    त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस ।
    गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥४१॥

    बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची ।
    त्यांनीं जागा मळ्याची । सोडिली हें समजलें ॥४२॥

    म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य ।
    महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥४३॥

    डोळ्यांतून वाहे पाणी । खंड त्याला नसे जाणी ।
    वस्त्र टाकलें भिजवोनी । त्या अश्रूंनीं छातीचें ॥४४॥

    तैं महाराज वदले पाटलाला । ऐसा कां रे रडसी भला ? ।
    शोक कोणता तुला झाला ? । तें वेगें सांग मज ॥४५॥

    पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर ।
    महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥४६॥

    ऐसा अक्षम्य कोणता । अपराध झाला सांगा आतां ।
    माझ्याकडून ज्ञानवंता । मी लेकरुं आपुलें असे ॥४७॥

    ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची ।
    एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥४८॥

    मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं ।
    तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥४९॥

    कां कीं तुम्हांवांचून । मला न कांहीं प्रिय आन ।
    हें कळलें वर्तमान । अवघ्या पाटील मंडळीतें ॥५०॥

    तेही तेथें धांवून आले । महाराजा विनवूं लागले ।
    निजसदना या या भले । हरी आणि नारायणा ॥५१॥

    महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी ।
    येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥५२॥

    तें पुढें येईल कळोन । आतां न करा भाषण ।
    वाद दोघांचें निर्मूलन । करील हें विसरुं नका ॥५३॥

    जितके जगीं जमेदार । तितके न करिती विचार ।
    मागचा पुढचा साचार । हेंच उणें त्यांच्या ठायीं ॥५४॥

    जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसीं । मी सोडितां तत् गृहासी ।
    तो नाहीं रागावला ॥५५॥

    तें कां हें त्यासी विचार । माझी कृपा तुमच्यावर ।
    आहे ती न ढळणार । कोणत्याही कारणांनीं ॥५६॥

    बंकटलालही आला तेथ । घालूं लागला समजूत ।
    यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यांत । तुम्ही यांना नेऊं नका ॥५७॥

    माझ्या घरुन जेव्हां आले । तेव्हां सांगा मीं काय केलें ।
    आपण आहोंत त्यांचीं बाळें । ते सारखे अवघ्यांना ॥५८॥

    सखाराम आसोलकार । आहे मनाचा उदार ।
    तो जागा देण्यास इन्‌कार । करणार नाहीं वाटतें ॥५९॥

    सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा ।
    म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥६०॥

    समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं ।
    परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥६१॥

    समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार ।
    भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥६२॥

    रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी ।
    हे पांच पांडव श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥६३॥

    वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची ।
    पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित्‌ आपुल्या ॥६४॥

    पत्रें येती वरच्यावरी । बाळाभाऊस येण्या घरीं ।
    परी परिणाम अंतरीं । कांहींच त्याच्या होईना ॥६५॥

    भास्कर म्हणे गुरुराया । हा सोकला पेढे खाया ।
    म्हणून ना इच्छी जाया । आपल्यापासून कोणीकडे ॥६६॥

    तुम्ही द्यावा यातें मार । म्हणजेच हा जवळ करील घर ।
    रत्‍न चौदावें पाहिल्याबिगर । हा येथून हलणें नसे ॥६७॥

    लकडीवांचून माकड । पाहा न होई कधीं धड ।
    मोठमोठाले ते पहाड । भिऊं लागती वज्राला ॥६८॥

    एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण ।
    परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥६९॥

    बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी ।
    कां रे आम्हां त्रास देसी ? । येथें येऊन वरच्यावर ॥७०॥

    ओढाळ बैल हिरव्यावर । पाहे पडाया निरंतर ।
    त्यास जरी दिला मार । तरी तो येई तेथ पुनः ॥७१॥

    तैसी लोचटा तुझी कृति । तंतोतंत निश्चिति ।
    झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ॥७२॥

    हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपलें जाण ।
    त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥७३॥

    एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती ।
    ती गजाननें घेऊनी हातीं । बाळास झोडूं लागले ॥७४॥

    मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली ।
    मग एक मोठी घेतली । भरीव काठी वेळूची ॥७५॥

    तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले ।
    कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥७६॥

    परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला ।
    कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥७७॥

    भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार ।
    परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥७८॥

    तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी ।
    मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥७९॥

    जैसा का तो कुंभार । माती तुडवितो साचार ।
    तैसाच केला प्रकार । महाराजांनीं तुडविण्याचा ॥८०॥

    मठीं हा प्रकार चालला । शिष्यसमुदाय पळत सुटला ।
    कोणी गेले बोलावण्याला । त्यांच्या आवडीच्या मंडळीस ॥८१॥

    बंकटलाल कृष्णाजी । धांवूनी आले मठामाजीं ।
    समर्थ हात धरण्या राजी । कोणी तयार होईना ॥८२॥

    बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त ।
    पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥८३॥

    ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून ।
    हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥८४॥

    मी न बाळासी मारिलें । नाहीं तयासी तुडविलें ।
    निरखून पहा चांगलें । म्हणजे येईल कळोनी ॥८५॥

    महाराज म्हणाले बाळासी । ऊठ वत्सा वेगेसी ।
    या आलेल्या मंडळीसी । आंग तुझें दाखिव ॥८६॥

    ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला ।
    लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥८७॥

    तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं ।
    तो पहिल्यापरीच होता पाही । निमग्न आपुल्या आनंदांत ॥८८॥

    त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला ।
    मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेंवांकुडें बाळासी ॥८९॥

    सोनें कसासी उतरतें । तेव्हांच त्याची किंमत कळते ।
    आश्चर्य झालें समस्तांतें । तो प्रकार पाहून ॥९०॥

    सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला ।
    श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥९१॥

    तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें ।
    सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥९२॥

    वाटेल त्याच्या दुकानांत । गाईनें शिरावें अवचित ।
    धान्याचिया टोपल्यांत । तोंड आपुलें खुपसावें ॥९३॥

    वाटेल तितुकें यथेच्छ खावें । राहिलेलें नासावें ।
    तेल तुपाचें लवंडावें । पिंप अंगाच्या धक्क्यानें ॥९४॥

    घरीं बांधून ठेवितां । चर्‍हाटें तोडी हां हां म्हणतां ।
    सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥९५॥

    ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण ।
    लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥९६॥

    गाभण मुळींच होईना । कास कधींच करीना ।
    कोंडून ठेवितां राहीना । घरामाजीं कोठेंही ॥९७॥

    लोक म्हणती सुकलालाला । दे या खाटकास गाईला ।
    किंवा मारुन टाका तिला । तूंच गोळी घालून ॥९८॥

    सुकलाल म्हणे लोकांसी । तुम्हीच मारुन टाका तिसी ।
    वाटेल त्या प्रयत्‍नासी । करुन या विबुध हो ॥९९॥

    एका पठाणानें तिला । मारण्याचा यत्‍न केला ।
    गोळी भरुन बंदुकीला । टपून बैसला होता हो ॥१००॥

    तें कसें काय कोण जाणे । कळलें गाईकारणें ।
    तिनें येऊन शिंगानें । पठाण पाडिला उताणा ॥१॥

    मी परगांवा नेऊन । दिली होती सोडून ।
    परी ती आली परतून । त्याला सांगा काय करुं ॥२॥

    ऐसें ऐकतां लोक म्हणती । आतां याला एक युक्ति ।
    गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥३॥

    तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला ।
    अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥४॥

    साधूस गाय दिल्याचें । पुण्य तुला लाभेल साचें ।
    आणि संकट आमुचें । टळेल बापा त्यायोगें ॥५॥

    तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें ।
    तिला धरण्यासाठीं केले । प्रयत्‍न नानापरीचे ॥६॥

    एकही यत्‍न नाहीं फळला । शेवटीं एक्या पटांगणाला ।
    हरळकुंद्याचा ढीग केला । सरकी ठेवली शेजारीं ॥७॥

    ती खायालागून । गाय आली धांवून ।
    ती येतां फांस टाकून । धरिली दहावीस जणांनीं ॥८॥

    साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी ।
    आणिली शेगांवा भीतरीं । गजाननासी द्यावया ॥९॥

    जवळ शेगांव जसें जसें । येऊं लागलें तसें तसें ।
    स्वभावांत पडलासे । त्या गाईच्या पालट ॥११०॥

    समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी ।
    तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥११॥

    महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा ।
    गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥१२॥

    चारही पाय बांधलेत । गळां साखळदंड लाविलेत ।
    शिंगांचीही तीच गत । केली चर्‍हाटें काथ्याच्या ॥१३॥

    ऐसा मोठा बंदोबस्त । शोभतसे वाघिणीप्रत ।
    ही गाय बिचारी साक्षात् । तिला न ऐसें करणें बरें ॥१४॥

    अरे खुळ्यांनो, ही गाय । अवघ्या जगाची आहे माय ।
    तिला बांधिलें हाय हाय । केवढा कठीण प्रसंग आला ॥१५॥

    तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत ।
    परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥१६॥

    जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें ।
    आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥१७॥

    बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली ।
    पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥१८॥

    खालीं घालूनिया मान । प्रदक्षिणा त्या केल्या तीन ।
    समर्थांचे दिव्य चरण । चाटूं लागली जिभेनें ॥१९॥

    ऐसा प्रकार तेथें झाला । तो अवघ्यांनीं पाहिला ।
    समर्थांच्या प्रभावाला । शेषही वर्णूं शकेना ॥१२०॥

    समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास ।
    तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥२१॥

    ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार ।
    उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥२२॥

    बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली ।
    गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥२३॥

    त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्‍हाट जाण ।
    सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥२४॥

    अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते ।
    जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥२५॥

    असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा ।
    विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥२६॥

    त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत ।
    परि न आला गुण किंचित्‌ । खर्च सारा व्यर्थ गेला ॥२७॥

    त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकिली होती ।
    म्हणून सहपरिवारें सत्वर गती । आला शेगांवाकारणें ॥२८॥

    रोगव्यथेनें चालवेना । श्रोते तया लक्ष्मणा ।
    दोघांतिघांनीं उचलून जाणा । आणिले त्या मठांत ॥२९॥

    करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर ।
    त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥१३०॥

    आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या ।
    माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥३१॥

    अमृताचें दर्शन । होतां कां यावें मरण ।
    माझ्या कुंकवालागून । टिकवा हीच विनंती ॥३२॥

    त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी ।
    तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥३३॥

    जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया ।
    तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति-परायण ॥३४॥

    यापुढें न कांहीं वदले । चिलीम ओढूं लागले ।
    श्रीगजाननस्वामी भले । आपुल्या मठांत शेगांवीं ॥३५॥

    भास्कर म्हणे ’अहो बाई । आतां न बसा ये ठाईं ।
    आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥३६॥

    प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थ-करीं प्राप्त झाला ।
    तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥३७॥

    यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम ।
    लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच’ ॥३८॥

    बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला ।
    प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥३९॥

    निजगृहीं जोडपें आलें । आप्त पुसूं लागले ।
    शेगांवांत काय घडलें । तें सांगावें साकल्यें ॥१४०॥

    बाईनें अवघें वर्तमान । कळविलें लोकांलागून ।
    आंब्याचा तो प्रसाद म्हणून । दिला समर्थें मजलागीं ॥४१॥

    आणि आज्ञा केली वरी । खाऊं घाला अत्यादरीं ।
    आंबा प्रसाद निजकरीं । आपुल्या त्या पतीला ॥४२॥

    त्याप्रमाणें मींही केलें । आज सकाळीं खाऊं घातलें।
    हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तईं त्या वाटलें वाईट ॥४३॥

    अहो बाई तुम्ही काय । केलेंत हें हाय हाय ।
    आंबा हेंच कुपथ्य होय । या पोटांतील रोगाला ॥४४॥

    माधवनिदानीं हेंच कथिलें । सुश्रुतांनींही वर्णिलें ।
    निघंटानें कथन केलें । शारंगधर म्हणे ऐसेंच ॥४५॥

    तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला ।
    पत्‍नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥४६॥

    ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले ।
    जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्‍नीस ॥४७॥

    परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य ।
    रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेलें हो ॥४८॥

    शौच्यावाटें व्याधि गेली । हळुंहळूं शक्ति आली ।
    पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥४९॥

    निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी ।
    तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥१५०॥

    लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर ।
    म्हणे महाराजा माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥५१॥

    मी आलों त्याचसाठीं । चला कारंज्यास ज्ञानजेठी ।
    मला न करा हिंपुटी । नाहीं ऐसें म्हणूं नका ॥५२॥

    आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला ।
    तेधवां होते संगतीला । शंकर-भाऊ पितांबर ॥५३॥

    घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिली ।
    अवघी संपत्ति आपुली । आहे मी कोण देणार ? ॥५४॥

    परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य ।
    महाराज बघून त्याप्रत । ऐशा रितीं बोलले ॥५५॥

    म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? ।
    लक्ष्मणा ऐसे चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥५६॥

    मला दिले तूं आपलें घर । आतां उघडीं अवघीं दारें ।
    फेकून देई रस्त्यावर । अवघीं कुलपें येधवां ॥५७॥

    लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला ।
    परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥५८॥

    भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर ।
    खजिन्याच्या उमर्‍यावर । स्वतः जाऊन बैसला ॥५९॥

    आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें ।
    ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥१६०॥

    हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन ।
    बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥६१॥

    जैसें कडू वृंदावन । वरुन पाहतां दिसे छान ।
    परी अंतरीं कडवटपण । पूर्ण त्याच्या भरलें असे ॥६२॥

    सोडून त्याच्या घरासी । उपासी निघाले पुण्यरासी ।
    दांभिकाच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥६३॥

    तेथें त्याच्या घराची । वा धनदौलतीची ।
    गरज समर्था नव्हती साची । ते वैराग्याचे सागर ॥६४॥

    परी तो जें कांहीं बोलला । त्याचा सत्यपणा पाहिला ।
    खोटेंपणाचा राग आला । म्हणून गेले उठोन ॥६५॥

    जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें ।
    भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥६६॥

    मी कृपा करावया । आलों होतों या ठायां ।
    याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी तें न तुझ्या प्रारब्धीं ॥६७॥

    तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत ।
    अवघी लक्ष्मी झाली फस्त । त्या भिक्षेची वेळ आली ॥६८॥

    म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् ।
    याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडून आणिलें ॥६९॥

    श्रीगजानन चिंतामणी । त्या गार काय शोभा आणी ? ।
    वा सुवर्णालागुनी । भूषवावें का कथिलानें ? ॥१७०॥

    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । श्रीगजाननविजय नामें ग्रंथ ।
    सदा भाविक परिसोत । निज कल्याण व्हावया ॥१७०॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥

    gajanan vijay granth adhyay 11

    अध्याय ११

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति ।
    ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥

    तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर ।
    जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया प्रकृतीला ॥२॥

    तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया ।
    म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस ॥३॥

    जैसें ज्याला वाटत । तैसें तो तुला भाग देत ।
    नामामुळें तुजप्रत । भिन्नत्व ये ना कधींही ॥४॥

    शैव तुला शिव म्हणती । ब्रह्म बोलती वेदान्ती ।
    रामानुजांचा सीतापती । वैष्णवांचा विष्णू तूं ॥५॥

    उपासनेप्रमाणें । नांवें मिळालीं तुजकारणें ।
    परी तूं अभिन्नपणें । सर्वांठायींच गवससी ॥६॥

    तूं सोमनाथ विश्वेश्वर । हीम केदार ओंकार ।
    क्षिप्रातटाकीं साचार । महांकाल तूंच कीं ॥७॥

    नागनाथ वैजनाथ । घृष्णेश्वर वेरुळांत ।
    त्र्यंबक तुला म्हणतात । गोदावरीच्या तटाकीं ॥८॥

    तूं भीमाशंकर । मल्लिकार्जुन रामेश्वर ।
    तूं गोकर्णरुपी शंकर । तूं महादेव शिंगणापुरीं ॥९॥

    त्या अवघ्यांकारण । असो माझें साष्टांग नमन ।
    माझ्या त्रितापांचें हरण । शीघ्र करी दीनबंधो ॥१०॥

    देवा तुम्ही कुबेराला । क्षणांत धनपती केला ।
    मग माझ्याविषयीं कां हो पडला । प्रश्न तुम्हांसी गिरिजापते ? ॥११॥

    बाळकृष्णाच्या सदनासी । समर्थ आले दुसरे वर्षी ।
    त्या बाळापुरासी । दासनवमीकारणें ॥१२॥

    सुकलाल बाळकृष्ण । या बाळापुरालागून ।
    निःसीम भक्त होते दोन । त्यांची सरी न ये कोणा ॥१३॥

    या वेळीं बरोबर । होते पाटील भास्कर ।
    बाळाभाऊ, पितांबर । गणू, जगदेव, दिंडोकार ॥१४॥

    उत्सव दासनवमीचा । सांग झाला तेथ साचा ।
    दैवयोग भास्कराचा । तेथेंच आला ओढवून ॥१५॥

    एक कुत्रें पिसाळलेलें । भास्करा येऊन चावलें ।
    तेणें लोक इतर भ्याले । म्हणती आतां हा पिसाळलेला ॥१६॥

    उपाय अवघे व्यावहारिक । भास्करासी केले देख
    कोणी म्हणती निःशंक । डाँक्‍टरा धाडा बोलवणें ॥१७॥

    भास्कर म्हणे ते अवसरीं । वैद्याची ना जरुर खरी ।
    माझा डाँक्टर आसनावरी । बैसला आहे गजानन ॥१८॥

    त्याचकडे मजला न्यावें । वृत्त अवघें कळवावें ।
    ते सांगतील तें ऐकावें । आपला हेका करुं नका ॥१९॥

    गजाननाचे समोर । आणिला पाटील भास्कर ।
    बाळाभाऊनें समाचार । अवघा समर्थांस श्रुत केला ॥२०॥

    तो अवघा ऐकून । महाराज वदले हांसून ।
    हत्या, वैर आणि ऋण । हें कोणासी चुकेना ॥२१॥

    सुकलालच्या गाईठायीं । द्वाडपणा जो होता पाही ।
    तो या भास्करें लवलाही । शेगांवीं दवडिला ॥२२॥

    तें तिचें द्वाडपण । कुत्रें येथें झालें जाण ।
    तेंच चावलें येऊन । या पाटील भास्कराला ॥२३॥

    तिचा हरण्या द्वाडपणा । मशीं यानें केली प्रार्थना ।
    इचें प्यावया दूध जाणा । ऐसा भास्कर मतलबी ॥२४॥

    दूध पितां वाटलें गोड । आतां कां रे चाललें जड ।
    नको पडदा ठेवूंस आड । वांचवूं कां मी सांग तुला ? ॥२५॥

    हें कुत्रें निमित्त झालें । तुझें आयुष्य मुळींच सरलें ।
    आतां पाहिजे प्रयाण केलें । तूं या सोडून मृत्युलोकां ॥२६॥

    जरी इच्छा असेल मनीं । वांचण्याची तुजलागुनी ।
    तरी तुझें मी यापासुनी । रक्षण वेड्या करीन ॥२७॥

    परी ती होईल उसनवारी । जन्ममृत्यूची बाळा खरी
    या अशाश्वताच्या बाजारीं । देणें घेणें चालत ॥२८॥

    बोल आतां झडकर । काय तुझा विचार ।
    ऐसी कधीं ना येणार । पर्वणी ती जाण तुला ॥२९॥

    भास्कर बोले त्यावरी । मी अजाण सर्वतोपरी ।
    जें असेल अंतरीं । आपुल्या तेंच करावें ॥३०॥

    लेंकुराचें अवघें हित । माता एक तें जाणत ।
    ऐसें एक्या अभंगांत । श्रीतुकोबा बोलले ॥३१॥

    मी आपलें लेंकरुं । म्हणून विनंती कशास करुं ? ।
    तूं अवघ्या ज्ञानाचा सागरु । अवघें कांहीं कळतें तुला ॥३२॥

    ऐसें ऐकतां भाषण । संतोषले गजानन ।
    खर्‍याप्रती समाधान । खरें बोलतां होतसे ॥३३॥

    कोणी म्हणाले गुरुराया । भास्करासी वांचवा सदया ।
    या कुत्र्यापासूनिया । तो आपुला भक्त असे ॥३४॥

    महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझें अज्ञान ।
    अरे वेड्या जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ॥३५॥

    जन्मे न कोणी, मरे न कोणी । हें जाणावयालागुनी ।
    परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ॥३६॥

    त्याचा उपयोग करावा । मोह समूळ सोडावा ।
    प्रारब्धभोग भोगावा । निमुटपणें हेंच बरें ॥३७॥

    संचित-प्रारब्ध-क्रियमाण । हें भोगल्यावांचून ।
    या बद्ध जीवालागून । सुटका होणें मुळींच नसे ॥३८॥

    पूर्वजन्मीं जें करावें । तें या जन्मीं भोगावें ।
    आणि तें भोगण्यासाठीं यावें । जन्मा हा सिद्धान्त असे ॥३९॥

    या जन्मीं जें करावें । तें पुढच्या जन्मास उरवावें ।
    असे किती सांग घ्यावे । फेरे जन्ममृत्यूचे ? ॥४०॥

    पूर्वजन्मीचें उर्वरित । भास्कराचें न उरलें सत्य ।
    तो अवघ्यापून झाला मुक्त । मोक्षास जायाकारणें ॥४१॥

    म्हणून आग्रह करुं नका । मार्ग त्याचा आडवूं नका ।
    काय भास्करासारखा । भक्तराणा जन्मे पुन्हां ॥४२॥

    पूर्वजन्मीचें याचें वैरी । कुत्रें होतें निर्धारीं ।
    म्हणून तें या बाळापुरीं । चावतें झालें भास्करास ॥४३॥

    त्यानें अवघा आपुला । डाव येथें साधिला ।
    तैसा जरी शेष उरला । द्वेष मनीं भास्कराच्या ॥४४॥

    तरी तो त्याचा द्वेष । कारण पुढील जन्मास ।
    कारण होईल भास्करास । दावा आपुला उगवावया ॥४५॥

    म्हणून पूर्वजन्मींचें वैर सरलें । आतां न कांहीं शेष उरलें ।
    या भासकराकारण भलें । अवघ्या उपाधि निरसल्या ॥४६॥

    आतां मी इतकेंच करितों । दोन महिने वांचवितों ।
    याला न पिसाळूं देतों । श्वानविषापासून ॥४७॥

    तें न मीं केलें जरी । हा जन्मास येईल पुन्हां परी ।
    दोन महिने भूमिवरी । उरलें आयुष्य भोगावया ॥४८॥

    ऐसें ज्ञान ऐकिलें । तें कित्येकांस नाहीं पटलें ।
    मात्र बाळाभाऊ आनंदले । त्या बोधातें ऐकुनी ॥४९॥

    भास्करा, तूं धन्य धन्य । संतसेवा केलीस पूर्ण ।
    चुकलें तुझें जन्ममरण । काय योग्यता वानूं तुझी ? ॥५०॥

    ऐसा प्रकार झाल्यावरी । मंडळी आली शेगांवनगरीं ।
    भास्कर बोले मधुरोत्तरीं । महाराजांच्या भक्तगणां ॥५१॥

    बाळापूरची हकीकत । सांगे प्रत्येका इत्यंभूत ।
    माझी विनंती जोडून हात । हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥५२॥

    महाराज लाधले शेगांवा । याचा विचार करावा ।
    या कीर्तीचा अमोल्य ठेवा । सांभाळा स्मारक करुन ॥५३॥

    त्यांना स्मारकाची जरुर नाहीं । ते पुढीलांसाठीं पाही ।
    तें स्मारक साक्षी देई । त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥५४॥

    पाहा आळंदीस ज्ञानेश्वर । समर्थ सज्जनगडावर ।
    पवित्र केलें देहूनगर । त्या तुकोबारायानें ॥५५॥

    त्यांचीं स्मारकें त्या त्या ठायां । ठेविलीं भव्य करुनिया ।
    तोच पथ अनुसराया । तुम्हीं झटावें मनापून ॥५६॥

    ऐसें प्रत्येका सांगत । भास्कर राहिला निवांत ।
    परी त्याच्या मनांत । ऐसें आलें एकदां ॥५७॥

    हे मला हो हो म्हणती । माझी ऐकून विनंती ।
    परी शंका येत चित्तीं । हो म्हणण्याची यांची मला ॥५८॥

    त्यानें एकदां ऐसें केलें । अवघ्या लोकांस मिळविलें
    एक्या ठायीं मठांत भले । महाराजांच्या अपरोक्ष ॥५९॥

    बंकटलाल पाटील हरी । मारुती चंद्रभान कारभारी ।
    जो खंडुजीच्या दुकानावरी । होता कारभार करीत ॥६०॥

    श्रीपतराव वावीकर । ताराचंद साहुकार ।
    आणिक मंडळी होती इतर । नांवें कुठवर सांगावीं ? ॥६१॥आ

    मिळवूनिया त्या लोकांला । भास्करें पदर पसरीला ।
    माझा आतां संबंध उरला । दोन महिनेच तुमच्याशीं ॥६२॥

    माझ्या मनीं ऐशी आस । समर्थांचें स्मारक खास ।
    भव्य व्हावें वर्‍हाडास । या शेगांवामाझारी ॥६३॥

    तुम्ही हें करितों म्हणा । तेणें आनंद माझ्या मना ।
    होऊन सुखें करीन गमना । मी वैकुंठाकारणें ॥६४॥

    संतसेवा कधींही । अनाठाईं जाणार नाहीं
    इच्छा जयाची ज्या ज्या होई । त्या, त्या संत पुरविती ॥६५॥

    स्मारक ऐसें करावें । अवघ्यांनींच वाखाणावें ।
    पाहून त्या डोलावें । प्रत्येकानें आपुल्या मनीं ॥६६॥

    ऐसेंच स्मारक करण्याची । शपथ वाहा समर्थांची ।
    ही विनंति अखेरची । माझी ती मान्य करा ॥६७॥

    तें अवघ्यांनीं कबूल केलें । भास्कराचें स्थीरावलें ।
    यायोगें तें चित्त भलें । रुखरुख मनाची संपली ॥६८॥
    उत्तरोत्तर आनंदवृत्ती । भास्कराची वाढत होती ।

    जैसीं लेंकुरें आनंदती । पुढील सणाच्या आशेनें ॥६९॥

    माघ वद्य त्रयोदशीस । महाराज वदले भास्करास ।
    चाल त्र्यंबकेश्वरास । जाऊं आपण शिवरात्रीला ॥७०॥

    तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर । भवभवांतक भवानीवर ।
    जो आहे झाला स्थीर । श्रीगोदावरीच्या तटातें ॥७१॥

    तें ज्योतिर्लिंग मनोहर । करी पातकाचा संहार ।
    नको करुंस आतां उशीर । जाऊं गंगास्नानाला ॥७२॥

    भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं । पहाड एक ब्रह्मगिरी ।
    जेथें औषधी नानापरी । बहुसाल असती उगवलेल्या ॥७३॥

    त्या ब्रह्मगिरीवर स्थित । आहेत पहा गहनीनाथ ।
    ज्यांना आहेत अवगत । गुणधर्म औषधीचे ॥७४॥

    वेड्या कुत्र्याच्या विषावरी । तेथें औषधी आहे खरी ।
    तिचा उपयोग सत्वरीं । करुन पाहूं येधवां ॥७५॥

    भास्कर म्हणे गुरुनाथा । आतां औषधी कशाकरतां ? ।
    तुमची आहे अगाध सत्ता । औषधीहून आगळी ॥७६॥

    आपुल्या कृपेनें भलें । विष बाळापुरींच निमालें ।
    आयुष्याचे आहेत उरले । दोन महिने आतां कीं ॥७७॥

    म्हणून वाटे मजप्रती । शेगांवींच राहूं गुरुमूर्ती ।
    त्र्यंबकेश्वरा आम्हांप्रती । तुहीच आहांत साक्षात्‌ ॥७८॥

    गोदावरी तुमचे चरण । तेथेंच मी करी स्नान ।
    अन्य तीर्थाचें प्रयोजन । मला न आतां राहिलें ॥७९॥

    ऐसी ऐकतां त्याची वाणी । समर्थ वदले हांसोनी ।
    हें जरी खरें जाणी । तरी तीर्थमहिमा मानावा ॥८०॥

    चाल नको करुं उशीर । पाहूं तो त्र्यंबकेश्वर
    बाळाभाऊ पीतांबर । यांसही घे बरोबरी ॥८१॥

    मग ती मंडळी निघाली । शेगांवाहून भली ।
    शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वराकारणें ॥८२॥

    कुशावर्ती केलें स्नान । घेतलें हराचें दर्शन ।
    गंगाद्वारां जाऊन । पूजन केलें गौतमीचें ॥८३॥

    वंदिली माय निलांबिका । तेवीं गहनी निवृत्तिनाथ देखा ।
    तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥८४॥

    हा गोपाळदास महंत । काळ्या रामाच्या मंदिरांत ।
    धुनी लावूनी द्वारांत । पंचवटीच्या बसलासे ॥८५॥

    राममंदिरासमोर । एक पिंपळाचा होता पार ।
    शिष्यांसहित साधुवर । तेथें जाऊन बैसले ॥८६॥

    गोपाळदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला ।
    आज माझा बंधु आला । वर्‍हाडांतून गजानन ॥८७॥

    जा घ्या त्यांचें दर्शन । अनन्यभावें करुन ।
    माझी ही भेट म्हणून । नारळसाखर त्यांसी द्या ॥८८॥

    हा हार घाला कंठांत । तो मी एक साक्षात् ।
    देह भिन्न म्हणून द्वैत । आम्हां उभयतीं मानूं नका ॥८९॥

    शिष्यांनीं तैसेंच केलें । दर्शन घ्याया अवघे आले ।
    कंठामाजीं घातिले । दिलेल्या पुष्पहाराला ॥९०॥

    नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामीसमोर
    ती पाहून गुरुवर । ऐसें बोलले भास्कराला ॥९१॥

    हा प्रसाद अवघ्यांस वाटी । परी न होऊं देई दाटी ।
    माझ्या बंधूची झाली भेटी । आज या पंचवटींत ॥९२॥

    माझें येथील काम झालें । आतां नाशकाचें राहिलें ।
    म्हणून पाहिजे तेथें गेले । धुमाळ वकीलाच्या घरा ॥९३॥

    महाराज आले नाशकांत । लोक दर्शना जमले बहुत ।
    बारीक सारीक गोष्टी अमित । तेथें असतां जहाल्या ॥९४॥

    त्या अवघ्या सांगतां । विस्तार होईल उगीच ग्रंथा ।
    म्हणून देतों संक्षेप आतां । त्याची क्षमा करा हो ॥९५॥

    तेथें राहून कांहीं दिवस । महाराज आले शेगांवास ।
    तो अडगांवीं नेण्यास । श्यामसिंग पातला ॥९६॥

    त्यानें आग्रह केला फार । समर्थें दिलें उत्तर ।
    रामनवमी झाल्यावर । येऊं आम्ही अडगांवा ॥९७॥

    आतां तूं जावें परत । उगा न पडे आग्रहांत ।
    श्यामसिंग मुळींच भक्त । निःसीम होता समर्थांचा ॥९८॥

    तो आला तैसा परत गेला । आपुल्या त्या अडगांवाला ।
    पुन्हां श्रोते येतां झाला । रामनवमीस शेगांवीं ॥९९॥

    उत्सव करुन शेगांवांत । समर्थांना शिष्यांसहित ।
    आला घेऊन अडगांवांत । हनुमानजयंतीकारणें ॥१००॥

    अडगांवीं असतां समर्थस्वारी । चमत्कार झाले नानापरी ।
    एके दिवशीं दोन प्रहरीं । भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥१॥

    छातीवरी बैसून । भास्करा केलें ताडन ।
    लोक पहाती दुरुन । परी जवळी कोणी जाईना ॥२॥

    बाळाभाऊ जवळ होता । तो म्हणाला सद्‌गुरुनाथा ।
    भास्करासी सोडा आतां । बेजार झाला उन्हानें ॥३॥

    तैं म्हणाला भास्कर । बाळाभाऊ न जोडा कर ।
    माझा हा साक्षात् ईश्वर । काय करील तें करुं दे ॥४॥

    लोकांसी वाटती चापटया दिल्या । मला होतात गुदगुल्या ।
    अनुभवाच्या गोष्टी भल्या । अनुभवीच जाणती ॥५॥

    पुढें घेऊन भास्करासी । महाराज आले बिर्‍हाडासी ।
    त्या अडगांव ग्रामासी । उतरलेल्या ठिकाणास ॥६॥

    बाळाभाऊस बोलले । अवघे आतां दोन उरले ।
    भास्कराचे दिवस भले । पंचमीला जाईल तो ॥७॥

    आज मीं जें केलें कृत्य । ताडनाचें रानांत ।
    तें कां हें तुजप्रत । आलें असेल कळोनी ॥८॥

    तुजला या भास्करानीं । मारविलें होतें छत्रीनीं ।
    शेगांवीं माझ्या करांनीं । तें आहे कां ध्यानांत ? ॥९॥

    तें क्रियमाण नासावया । त्यास मीं मारिलें ये ठायां ।
    ह्या एकाच गोष्टीवांचूनिया । अन्य नव्हता हेत कांहीं ॥११०॥

    उत्सव पूर्ण झाल्यावर । त्या अडगांवींचा साचार ।
    काय घडला प्रकार । तो आतां परियेसा ॥११॥

    उत्सवाचा काला झाला । वद्य पंचमी दिवस आला ।
    एक प्रहर दिवसाला । समर्थ म्हणती भास्करासी ॥१२॥

    भास्करा तुझें प्रयाण । आज दिवशीं आहे जाण ।
    पद्मासन घालून । पूर्वाभिमुख बैसावें ॥१३॥

    चित्त अवघें स्थिर करी । चित्तीं सांठवावा हरी ।
    वेळ आली जवळ खरी । आतां सावध असावें ॥१४॥

    इतर जनांकारण । म्हणूं लागले करा भजन ।
    "विठ्ठल विठ्ठल नारायण" । ऐसें उच्च स्वरानें ॥१५॥

    हा तुमचा बंधु भला । जातो आज वैकुंठाला ।
    त्याच्या करा पूजनाला । माळ बुक्का वाहून ॥१६॥

    भास्करें घातलें पद्मासन । नासाग्रीं दृष्टि ठेवून ।
    वृत्ति अवघ्या केल्या लीन । अंतर्मुख होऊनियां ॥१७॥

    भक्त भास्करा पूजिती । माळा बुक्का वाहती ।
    तें कौतुक पाहाती । समर्थ दूर बैसून ॥१८॥

    भजन झालें एक प्रहर । माध्यान्हीस आला दिनकर ।
    महाराजांनीं ’हरहर’ । शब्द केला मोठयानें ॥१९॥

    त्यासरसा प्राण गेला । भास्कराचा वैकुंठाला ।
    संतांनीं हातीं धरिलें ज्याला । तो पाहुणा हरीचा ॥१२०॥

    लोक पुसती महाराजास । कोठें करणें समाधीस ।
    या भास्कराच्या शरीरास । कोठें न्यावें ठेवावया ? ॥२१॥

    समर्थ अवघ्यांस सांगती । द्वारकेश्वर जो पशुपती ।
    ज्याच्या सन्निध आहे सती । तेथें ठेवा भास्कराला ॥२२॥

    ऐसी आज्ञा होतां क्षणीं । विमान बांधिलें लोकांनीं ।
    केळीचे खांब लावुनी । चहुं बाजूंस विबुध हो ॥२३॥

    आंत ठेविलें कलेवर । पुढें भजनाचा होय गजर ।
    मिरवीत आणिला भास्कर । द्वारकेश्वराचीयापासी ॥२४॥

    सांगविधि समाधीचा । ते ठायीं झाला साचा ।
    लोक म्हणती महाराजांचा । परम भक्त गेला हो ॥२५॥

    दुसरे दिवसापासून । समाधीच्या सन्निध जाण ।
    होऊं लागलें अन्नदान । गोरगरीबांकारणें ॥२६॥

    स्थान द्वारकेश्वराचें । अडगांवाच्या सन्निध साचें ।
    अंतर एक मैलाचें । गांवापासून उत्तरेस ॥२७॥

    जागा द्वारकेश्वराची । परमरमणीय होती साची ।
    झाडी चिंचवृक्षांची । होती विशेष ते ठायां ॥२८॥

    निंब अश्वत्थ मांदार । आम्र वट औदुंबर ।
    ऐसे वृक्ष होते इतर । शिवाय कांहीं फुलझाडें ॥२९॥

    अडगांव अकोलीच्या मध्यंतरीं । हें ठिकाण निर्धारी ।
    तेथें समाधि दिधली खरी । समर्थांनीं भास्कराला ॥१३०॥

    दहा दिवस अन्नदान । झालें याचें वर्णन ।
    तुम्ही नुकतेंच केलें श्रवण । संतभंडारा नांव ज्याचें ॥३१॥

    चिंचवृक्षांच्या सावलींत । जेवाया बसे पंगत ।
    तयीं कावळे अतोनात । त्रास देऊं लागले ॥३२॥

    काव काव ऐसें करिती । द्रोण पात्रीचे उचलून नेती ।
    मलोत्सर्ग तोही करिती । जेवणारांच्या अंगावर ॥३३॥

    यायोगें लोक त्रासले । कावळ्यांस हाकूं लागले ।
    भिल्लांनीं ते तयार केले । तीरकमटे त्या मारावया ॥३४॥

    तईं बोलले गजानन । अवघ्या लोकांलागून ।
    नका मारुं त्याकारण । अपराध त्यांचा कांहीं नसे ॥३५॥

    या भंडार्‍यांत येण्याचा । हेतु इतकाच आहे त्यांचा ।
    प्रसाद आपणा भास्कराचा । इतरांपरी मिळावा ॥३६॥

    कां कीं हा भास्कर । वैकुंठीं गेला साचार ।
    हा पितृलोकावर । नाहीं मुळींच राहिला ॥३७॥

    दहा दिवसपर्यंत । प्राण अंतरिक्षांत ।
    राहे परिभ्रमण करित । सपिंडी होता जाय पुढें ॥३८॥

    त्या अकराविया दिवशीं । बली देती कावळ्याशीं ।
    काक जेव्हां स्पर्शेल त्यासी । तेव्हांच प्राण जातो पुढें ॥३९॥

    त्या बलीदानाचें । कारण भास्करा नुरलें साचें ।
    म्हणून या कावळ्यांचें । पित्त गेलें खवळून ॥१४०॥

    आत्मा या भास्कराचा । मुळींच मुक्त झाला साचा ।
    तो पाहुणा वैकुंठीचा । झाला आहे येधवां ॥४१॥

    या सोमसूर्य लोकाचें । कारण त्यासी नुरलें साचें ।
    म्हणून पिंडदानाचें । नुरलें पाहा प्रयोजन ॥४२॥

    जयाला न ऐसीं गती । त्याच्यासाठीं पिंड देती ।
    कावळ्यांची वाट पाहाती । पिंड ठेवून कलशावर ॥४३॥

    म्हणून कावळे रागावले । त्यांनीं हें जाणीतलें ।
    भास्करानें गमन केलें । एकदम वैकुंठ लोकाला ॥४४॥

    म्हणून आम्हां प्रसाद त्याचा । मिळूं द्या या भंडार्‍याचा ।
    ऐसा विचार कावळ्यांचा । दिसतो या कृतीनें ॥४५॥

    तुम्ही त्यांस मारुं नका । मीच तया सांगतों देखा ।
    अहो जिवांनो ! माझें ऐका । गोष्ट आतां सांगतों जी ॥४६॥

    तुम्ही उद्यांपासोन । वर्ज्य करा हें ठिकाण ।
    ना तरी भास्करालागून । येईल माझ्या कमीपणा ॥४७॥

    आज प्रसाद घेऊन । तुम्ही तृप्त व्हा अवघेजण ।
    मात्र उद्यांपासून । या स्थळासी येऊं नका ॥४८॥

    ऐसें महाराज बोलले । तें भाविकांसी अवघें पटलें ।
    परि कुत्सित जे कां बसले । होते त्या मंडळींत ॥४९॥

    ते एकमेकांलागुनी । म्हणते झाले हांसोनी ।
    ही गजाननानें केली वाणी । अस्थानीं कीं निरर्थक ॥१५०॥

    पक्षी कुठें कां वागतात । मानवाच्या आज्ञेंत ? ।
    पाहूं याची प्रचीत । उद्यां मुद्दाम येऊनी ॥५१॥

    हे वेडे कांहीं बोलती । भाविका नादीं लाविती ।
    आपलें स्तोम माजविती । संतत्वाचें निरर्धक ॥५२॥

    अहो साजेल तें बोलावें । जें कां पचेल तेंच खावें ।
    उसनें न कधीं आणावें । अवसान तें अंगांत ॥५३॥

    दुसरे दिवशीं ते कुत्सित । मुद्दाम पाहाया आले तेथ ।
    तों एकही ना दृष्टीप्रत । पडला त्यांच्या कावळा ॥५४॥

    मग मात्र चकित झाले । समर्थांसी शरण आले ।
    बारा वर्षें तेथ भले । कावळे न आले श्रोते हो ॥५५॥

    चौदा दिवस झाल्यावरी । गजानन फिरले माघारीं ।
    येते झाले शेगांव नगरीं । आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥५६॥

    श्रोते त्या शेगांवांत । एक गोष्ट घडली अघटित ।
    ती ऐका सावचित्त । सांगतों मी येधवां ॥५७॥

    होतें साल दुष्काळाचें । म्हणून एका विहिरीचें ।
    काम चाललें खोदण्याचें । सुरुंगातें लावून ॥५८॥

    विहीर दोन पुरुषावर । गेली खोल साचार ।
    खडक काळा लागला थोर । गती खुंटली पहारीची ॥५९॥

    म्हणून भोकें करुन । आंत दारु ठासून ।
    सुरुंगांच्या साह्यें करुन । काम फोडण्याचें सुरुं झालें ॥१६०॥

    चारी बाजूंस भोकें चार । केलीं पहारीनें तयार ।
    दारु ठासिली अखेर । आंत दोर्‍या घालुनी ॥६१॥

    एरंड पुंगळ्या पेटवून । सोडल्या चारी दोर्‍यांतून ।
    तों मध्येंच बसल्या अडकून । दोर्‍याचीया गांठीवरी ॥६२॥

    पुंगळी खालीं जाईना । दारुस विस्तव लागेना ।
    पाणी दम धरीना । आलें जवळी सुरुंगाच्या ॥६३॥

    तैं कामावरचा मिस्तरी । विचार करी अंतरीं ।
    सुरुंगास लागल्या वारी । सुरुंग वायां जाईल कीं ॥६४॥

    म्हणून गणू जवर्‍याला । मिस्तरी तो बोलला ।
    तूं उतरुन विहिरीला । पुंगळ्या थोड्या सरकीव ॥६५॥

    आणि तूं येईं लौकर वरी । पुंगळ्या जातील तोंवरी ।
    बाराचिया शेजारी । म्हणजे काम होईल ॥६६॥

    त्या पुंगळ्या सरकावण्यासी । कोणी न धजे जावयासी ।
    म्हणून या गणू जवर्‍यासी । मिस्तरीनें दटाविलें ॥६७॥

    काय करितो बिचारा । दारिद्रय होतें ज्याच्या पदरां ।
    त्याच्यावरी चाले जोरा । यज्ञास बळी बोकडाचा ॥६८॥

    या गणू जवर्‍याची । निष्ठा समर्थावरी साची ।
    आज्ञा होतां मिस्तरीची । गणू आंत उतरला ॥६९॥

    एक पुंगळी सरकविली । ती तात्काळ तळा गेली ।
    दारुप्रती जाऊन भिडली । गणू आंत सांपडला ॥१७०॥

    दुसरीस जों घाली हात । पुंगळी सरकवण्याप्रत ।
    तों पहिला सुरंग उडाला सत्य । मग काय विचारतां ? ॥७१॥

    गणू म्हणे विहिरींतून । समर्था ये धांवून ।
    माझें आतां रक्षण । तुझ्यावीण कोण करी ? ॥७२॥

    विहिरीमाजीं धुराचा । डोंब झाला होता साचा ।
    दुसरा सुरुंग पेटण्याचा । अवधि उरला थोडका ॥७३॥

    तों गणू जवर्‍या भली । कपार हातां लागली ।
    त्या कपारींत बैसली । स्वारी गणू जवर्‍याची ॥७४॥

    एकामागून एकांनीं । पेट घेतला सुरुंगांनीं ।
    उडाले सुरुंग ऐसे तिन्ही । दगड अपार निघाले ॥७५॥

    छिन्न भिन्न शरीर । झालें असेल साचार ।
    डोकावून पाहाती नारीनर । आंत गणू जवर्‍याला ॥७६॥

    तो कोठें दिसेना । जनाच्या नाना कल्पना ।
    दगडाप्रमाणें गणू जाणा । उडाला असेल बाहेर ॥७७॥

    त्याचें आसमंत भागांत । कोठें तरी असेल प्रेत ।
    पडलेलें त्या शोधण्याप्रत । माणूस कोणी पाठवा ॥७८॥

    मिस्तरीचा शब्द ऐकिला । आंतून गणू बोलला ।
    अहो मिस्त्री नाहीं मेला । गणू आहे विहिरींत ॥७९॥

    गजाननाच्या कृपेनीं । मी वांचलों या ठिकाणीं ।
    बसलों आहे दडोनी । या पहा कपारींत ॥१८०॥

    परी कपारीच्या तोंडाला । धोंडा एक मोठा पडला ।
    त्यामुळें बाहेर मला । येतां येत नाहीं कीं ॥८१॥

    गणूचे शब्द ऐकिले । लोक अवघे आनंदले ।
    लोक खालीं उतरले । तो धोंडा काढावया ॥८२॥

    दहापांच जणांनीं । धोंडा सरकविला पहारींनीं ।
    गणूस बाहेर काढूनी । घेऊन आले वरते त्या ॥८३॥

    वरतीं येतांच गांवांत । गणू गेला पळत पळत ।
    समर्थांच्या मठांत । दर्शन त्यांचें घ्यावया ॥८४॥

    गणू दर्शना येतांक्षणीं । बोलले त्या कैवल्यदानी ।
    गण्या कपारींत बैसोनी । किती धोंडे उडविलेस ? ॥८५॥

    त्यांत मोठा धोंडा तुला । रक्षण्यास येऊनी बैसला ।
    कपारीच्या तोंडाला । म्हणून तूं वांचलास ॥८६॥

    पुन्हां ना ऐसें साहस करी । पुंगलीवरुन सुटल्यापरी ।
    मधेंच तिला जाऊन करीं । कशाही प्रसंगीं धरुं नये ॥८७॥

    जा तुझें गंडांतर । आज निमालें साचार ।
    गणूप्रती पाहाया इतर । लोक आले गांवींचे ॥८८॥

    गणू म्हणे सद्‌गुरुनाथा । सुरुंग चारी पेटतां ।
    तूंच मला देऊन हातां । कपारींत बैसविलें ॥८९॥

    म्हणून मी वांचलों । तुझे पाय पाहाया आलों ।
    ना तरी असतों मेलों । विहिरीमाजीं गुरुराया ! ॥१९०॥

    ऐसें गजाननकृपेचें । महिमान आहे थोर साचें ।
    तें साकल्य वर्णण्याचें । मसीं नाहीं सामर्थ्य ॥९१॥

    श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    आल्हादवो भाविकांप्रत । हेंच इच्छी दासगणू ॥१९२॥

    शुभं भवतु ॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 12

    अध्याय १२

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति ।
    माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥

    तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता ।
    विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥

    तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी ।
    आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥

    माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता ।
    लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥

    असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला ।
    धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥५॥

    त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची ।
    कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥६॥

    तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास ।
    तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥७॥

    येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी ।
    कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥८॥

    बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला ।
    आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥९॥

    ऐसें ऐकतां भाषण । समर्थेम तुकविली मान ।
    जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥१०॥

    बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी ।
    षोडशोपचारेम अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥११॥

    प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून ।
    मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥१२॥

    शालजोडी अंगावरी । बहुमोल घातली काश्मीरी ।
    एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥१३॥

    गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत ।
    कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१४॥

    बहुमोल हिर्‍याची । वामकरीं घातिली पौची ।
    रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥१५॥

    जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविले पुढे ।
    त्रयोदश गुणी ठेविले विडे । एक्या लहान तबकांत ॥१६॥

    अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार ।
    त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपानी शिंपडीलें ॥१७॥

    एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं ।
    ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१८॥

    बेरीज करतां दहा हजार । येईल ती साचार ।
    ऐशी दक्षिणा होती थोर । किती करूं वर्णन तिचें ॥१९॥

    श्रीफल पुढें ठेवून । विनयें केलें भाषण ।
    महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥२०॥

    या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी ।
    मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥२१॥

    त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता ।
    ऐसें म्हणून ठेविला माथा । अनन्य भावें पायांवरी ॥२२॥

    त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन ।
    श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥२३॥

    असो आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें ।
    हे अलंकार घालून भले । याचें काय कारण ? ॥२४॥

    मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्‍याचा ।
    मला या दागदागिन्यांचा । काय सांग उपयोग ? ॥२५॥

    अरे हें अवघें विष । मला नको त्याचा स्पर्श ।
    या नसत्या उपाधीस । माझ्या मागें लावूं नको ॥२६॥

    अथवा तूं मोठा श्रीमान् । हें दाखवाया कारण ।
    केलेंस कां हें प्रदर्शन । सांग मसी बच्चुलाला ? ॥२७॥

    जें आवडतें जयासी । तेंच द्यावें तयासी ।
    मी वेडापिसा संन्याशी । नागवा फिरतों गांवभर ॥२८॥

    हें अवघें तुझें तुला । लखलाभ असो बच्चुलाला ।
    तुम्हां प्रापंचिकाला । या द्रव्याची जरूर ॥२९॥

    माझा यजमान भीमातटीं । उभा विटेसी जगजेठी ।
    तो काय माझ्यासाठीं । हें वैभव द्याया तयार नसे ? ॥३०॥

    ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले ।
    चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥३१॥

    दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन ।
    हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥३२॥

    त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचे ।
    ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥३३॥

    त्यानें बच्चुलालापरी । पुजन केलें आपुल्या घरीं ।
    परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥३४॥

    वरघडीचें भाषण । केलें विनय दाखवून ।
    ते कां समर्थाकारण । समजणें अशक्य आहे हो ? ॥३५॥

    जेवीं पूजा दांभिकांची । शब्दमयी असते साची ।
    पूर्तता महावस्त्राची । होती त्यांची अक्षतेनें ॥३६॥

    ' शर्कराखंडखाद्यानि ' । ऐसें म्हणोनिया वदनीं ।
    कुचका दाणा आणोनी । ठेवी पुढें भुईमुगाचा ! ॥३७॥

    अशा दांभिक पूजनाचें । फलही त्याच स्वरूपाचें ।
    वाटोळें लक्ष्मणाचें । याच कृतीनें झालें हो ॥३८॥

    हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण ।
    तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥३९॥

    आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला ।
    संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥४०॥

    बच्चुलालांनीं तपास । केला अवघ्या अकोल्यास ।
    परी न लागला थांग त्यास । समर्थांचा कोठेंही ॥४१॥

    असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा ।
    होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥४२॥

    त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली ।
    एके दिनीं ऐसी झाली । गोष्ट ऐका मठांत ॥४३॥

    फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर ।
    तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥४४॥

    अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर ।
    ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥४५॥

    नांव म्हणे सोनुबाई । हातीं कथलाचाही वाळा नाहीं ।
    नांव पाहतां गंगाबाई । आणि तडफडे तहानेनें ॥४६॥

    तशांतलाच प्रकार । आहे तुझा साचार ।
    हें फाटकें धोतर । पोतेर्‍यांच्या उपयोगी ॥४७॥

    तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी ।
    हा घे दुपेटा देतों तुसी । नेसावयाकारणें ॥४८॥

    तो न करितां अनमान । राहे बाळा नेसून ।
    यासी नको सोडूं जाण । कोणी काहीं केलें तरी ॥४९॥

    पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना ।
    भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥५०॥

    तो वेडावांकडा प्रकार । कशास बोलूं साचार ।
    गटाराचें उघडितां द्वार । घाण मात्र सुटते हो ॥५१॥

    श्रीगजानन स्वामीप्रत । शिष्य होते असंख्यांत ।
    परी अधिकारी तयांत । दोही हातांच्य बोटांइतके ॥५२॥

    पाहा श्रोते कांतारीं । वृक्ष असती नानापरी ।
    त्यांतून क्वचित् कोठें तरी । नजरेस पडती चंदनतरु ॥५३॥

    त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळीतें ।
    काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥५४॥

    हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान ।
    जें कां समर्थाकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥५५॥

    तुझी भक्ति कळून आली । तूं खुशालचंद अससी मुळीं ।
    तूं राहूं नको ये स्थळीं । अपमान करण्या सद्गुरुचा ॥५६॥

    तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला ।
    उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥५७॥

    वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें ।
    तेंच मीं हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥५८॥

    ऐसी भक्ती न भक्ती झाली । शिष्यांत तेढ माजली ।
    ती मिटवाया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥५९॥

    पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर ।
    जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥६०॥

    माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी ।
    जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥६१॥

    डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन ।
    मागें पाहे फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥६२॥

    पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी ।
    चिंतन चाललें मानसीं । निजगुरुचें सर्वदा ॥६३॥

    तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर ।
    जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥६४॥

    अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी ।
    लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥६५॥

    परी निर्भय ऐसें सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा ।
    हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥६६॥

    ते म्हणाले आपसांत । हा माकडापरि कां रे फिरत? ।
    ह्या वृक्षावरी सत्य । हें कांहीं कळेना ॥६७॥

    लहान सान फांदीला । हा निर्भयपणें फिरून आला ।
    परी नाहीं खालीं पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥६८॥

    दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं ।
    श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसें सामर्थ्य असतें रे ॥६९॥

    यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा ।
    चला हा येथ आल्याचा । वृतान्त सांगूं गांवांत ॥७०॥

    गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले ।
    आम्रवृक्षापासीं भले । कोण आले तें पहावया ॥७१॥

    म्हणाले पौरवासी नर । हा ढोंगी असावा साचार ।
    बळेंच करितो वेडेचार । गजाननाच्या शिष्यापरी ॥७२॥

    शिष्य गजानन महाराजांचा । भास्कर पाटील होता साचा ।
    झाला नुकताच अंत त्याचा । अडगांव नामें ग्रामांत ॥७३॥

    समर्थांचे शिष्य । येथें येतील कशास ? ।
    वळें करण्या उपवास । सोडून बर्फी पेढ्याला ॥७४॥

    पुसून एकदां यास पहावें । तो काय म्हणतो तें ऐकावें ।
    मग खरें खोटें ठरवावें । उगीच तर्क नाहीं बरा ॥७५॥

    एक मनुष्य पुढें झाला । पितांबरासी पुसूं लागला ।
    तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥७६॥

    पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा रहाणार ।
    मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥७७॥

    त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटण ।
    म्हणून येथें येऊन । वृक्षापासी बैसलों ॥७८॥

    तों आंब्याच्या मुळाशीं । मुंगळे होते बहुवसी ।
    म्हणून बसलों फांदीसी । वृक्षावरी जाऊन ॥७९॥

    ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण ।
    अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥८०॥

    काय म्हणे मी राजाची । राणी आवडती आहे साची ।
    खळगी भरण्या पोटाची । आले मजूरी करावया ॥८१॥

    देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा ।
    तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥८२॥

    स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान ।
    त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥८३॥

    अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली ।
    ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्र-वृक्षाला ॥८४॥

    त्यांनीं फळें आणवलीं । तूं नुसतीं पाने आण भलीं ।
    नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥८५॥

    हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा ।
    तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥८६॥

    ऐसें न जरी करशील । तरी मार खाशील ।
    खरा असल्यास होशील । वंद्य आम्हांकारणें ॥८७॥

    कां कीं शिष्य सद्गुरुचे । कांहीं अंशीं निघती साचे ।
    बापा त्यांच्याच तोडीचे । हा आहे न्याय जगीं ॥८८॥

    नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार ।
    तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥८९॥

    बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका ।
    एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥९०॥

    तैसाच मी गार परी । गजानन शिष्यांभितरीं ।
    बोललों नाहीं वैखरी । यत्किंचित खोटें हो ॥९१॥

    गारेवरून खाणीस । नाहीं येत जगीं दोष ।
    मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥९२॥

    शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर ।
    संकट शिष्यांस पडतां थोर । ते धांवा करिती सद्गुरुंचा ॥९३॥

    मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी ।
    तरी सद्गुरूचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यांस ॥९४॥

    ऐसी झाली आड-विहीर । पितांबरासी साचार ।
    झाला बिचारा चिंतातुर । कांहीं न सुचे तयासी ॥९५॥

    त्या वठलेल्या झाडापासी । मिळाले अवघे पौरवासी ।
    काय होतें तें पहावयासी । मुलें बायकांसमवेत ॥९६॥

    निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिलें कर ।
    स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्गुरुरायाचें ॥९७॥

    हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा ।
    पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥९८॥

    माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला ।
    आपुल्या ब्रीदासाठीं पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥९९॥

    माझी भिस्त तुझ्यावरी । पाव मातें लवकरी ।
    नातरी आली पाळी खरी । मजला येथें मरण्याची ॥१००॥

    प्रल्हाद खरा करण्याला । स्तंभीं नरहरी प्रगटला ।
    जनी चढवितां सुळाला । त्याचें पाणी जहालें ॥१॥

    जनीचा भार देवावर । माझा आहे तुजवर ।
    संतदेवांत अंतर । मुळींच नाहीं राहिलें ॥२॥

    देव तेची असती संत । संत तेची देव साक्षात् ।
    मला लोक म्हणतात । शिष्य गजाननाचा ॥३॥

    माझें कांहीं महत्त्व नाहीं । तें अवघें तुझ्याठायीं ।
    पुष्पामुळें किंमत येई । जगीं सूत्राकारणें ॥४॥

    तूं पुष्प मी आहे सूत । तूं कस्तुरी मी माती सत्य ।
    तुझ्यामुळें आलें येथ । संकट हें माझ्यावरी ॥५॥

    आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई ।
    या वठलेल्या वृक्षाठायीं । आणि पर्णे कोमल ॥६॥

    लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्गुरूचा नामगजर ।
    जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥७॥

    लोक अवघे गजर करती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती ।
    जन नयनीं पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥८॥

    कोणी म्हणती असेल स्वप्न । तें जें पडलें आपणांलागून ।
    पहा चिमटा घेऊन । आपुल्याला करांनीं ॥९॥

    चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति ।
    यावरी कोणी ऐसें म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥११०॥

    गारुड्याच्या खेळांत । वाद्या होती सर्प सत्य ।
    खापर्‍या असून दृष्टीप्रत । त्याचे रुपये दिसती कीं ॥११॥

    तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला ।
    फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥१२॥

    मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली ।
    श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥१३॥

    आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं ।
    चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥१४॥

    याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन ।
    येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जसी ॥१५॥

    तें अवघ्यांस मानवले । पितांबरासी मिरवीत नेलें ।
    ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेव्हां भाव उदेला ॥१६॥

    जैसा समर्थांनीं आपुला । शिष्य डोमगांवीं पाठविला ।
    कल्याण नामें करून भला । कल्याण करण्या जगाचें ॥१७॥

    तैसेंच केलें गुरुवरें । श्रीगजाननें साजिरें ।
    उदेंलें हें भाग्य खरें । त्या कोंडोली गांवचें ॥१८॥

    श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत ।
    इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥१९॥

    त्या पितांबराचे भजनीं । कोंडोली गांव लागला जाणी ।
    जेथें जाईल हिरकणी । तेथें ती मोल पावे ॥१२०॥

    मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा ।
    आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥२१॥

    आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत ।
    एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥२२॥

    शिष्य त्याचें कारण । पुसूं लागले कर जोडून ।
    महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें ? ॥२३॥

    तैं महाराज वदले लोकांला । आमचा कृष्णा पाटील गेला ।
    जो चिकणसुपारी आम्हांला । रोज आणून देत असे ॥२४॥

    त्याची झाली आठवण । राम त्याचा मुलगा लहान ।
    आतां सुपारी चिकण । कोण देतो या ठायां ? ॥२५॥

    राम थोर झाल्यावरी । करील माझी चाकरी ।
    म्हणून मी या मठांतरीं । आतां ना तयार राहावया ॥२६॥

    ऐसें महाराज बोलतां । जनांलागीं लागली चिंता ।
    महाराजांचा विचार आतां । दिसतो येथून जाण्याचा ॥२७॥

    म्हणून कसेंही करून । जाऊं न द्यावें त्याकारण ।
    चला आपण धरूं चरण । महाराजांचे येवेळां ॥२८॥

    ऐसा विचार मिळून केला । मंडळी आली मठाला ।
    श्रीपतराव बंकटलाला । ताराचंद मारुती ॥२९॥

    मंडळींनीं धरिलें चरण । महाराज आम्हां सोडून ।
    तुम्ही आपुलें ठिकाण । राहण्याचें अन्य करूं नये ॥१३०॥

    तुमची इच्छा असेल जेथ । तेथेंच राहा शेगांवांत ।
    परी सोडण्याचें मनांत । ग्राम हें आणूं नका ॥३१॥

    तैं महाराजवाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी ।
    मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥३२॥

    जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल ।
    तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥३३॥

    ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली ।
    समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥३४॥

    कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत ।
    सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥३५॥

    भूषण आपल्या साधूचें । सरकारास नाहीं साचें ।
    बंकटलाल बोलला वाचें । ऐसें संकट घालूं नका ॥३६॥

    सरकार धार्मिक कृत्याला । जागा देईल हा न उरला ।
    भरवंसा तो आम्हांला । हें राज्य परक्याचें ॥३७॥

    म्हणून आम्हांपैकीं कोणाची । जागा घ्या मागून साची ।
    आहे तयारी आमुची । ती तुम्हां द्यावयास ॥३८॥

    समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान ।
    जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥३९॥

    राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी ।

    जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ॥१४०॥

    व्यवहारदृष्ट्या मालकपण । येतें राजालागून ।
    त्याचें नाहीं भूषण । तुम्ही प्रयत्न करा जा ॥४१॥

    जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां ।
    हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥४२॥

    हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली ।
    त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥४३॥

    बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ' करी ' ।
    त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥४४॥

    आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला ।
    परी मी तुर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥४५॥

    तुम्ही एक वर्षांत । जागा केल्या व्यवस्थित ।
    तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥४६॥

    तो ठराव सरकारचा । आहे दप्तरीं नमूद साचा ।
    समर्थांच्या वाणीचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥४७॥

    मग हरी पाटील बंकटलाला । निघते झाले वर्गणीला ।
    द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥४८॥

    यापुढील अवघें वृत्त । येईल पुढल्या अध्यायांत ।
    सत्पुरुषाचा पुरविण्या हेत । देव राहे तत्पर सदा ॥४९॥

    विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा ।
    जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥१५०॥

    श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    ऐका श्रोते सावचित्त । निजकल्याण व्हावया ॥१५१॥

    शुभं भवतु ॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 13

    अध्याय १३

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा ।
    हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥

    तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता ।
    गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥

    तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन ।
    ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥

    दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला ।
    रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥

    तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा ।
    दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥

    मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी ।
    मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥

    ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत ।
    माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥

    आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण ।
    विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥८॥

    भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली ।
    वर्गणीची कांहो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥९॥

    गजानन म्हणतां महासंत । जें न घडे तें घडवीत ।
    मग त्यांच्या मठाप्रत । वर्गणी ही कशाला ? ॥१०॥

    कुबेर त्यांचा भंडारी । मग कशास फिरतां दारोदारीं ? ।
    चिठ्ठी कुबेराच्यावरी । करा म्हणजे काम झालें ॥११॥

    ऐसें ऐकतां भाषण । जगदेव बोलला हांसोन ।
    या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बर्‍यासाठीं ॥१२॥

    श्रीगजाननासाठीं । नको बांधणें मठ-मठीं ।
    ह्या अवघ्या आटाआटी । तुमचें कल्याण व्हावयास ॥१३॥

    स्वामी गजाननाचा । त्रैलोक्य हाचि मठ साचा ।
    अवघीं वनें हा बगीचा । पलंग ज्यांचा मेदिनी ॥१४॥

    अष्टसिद्धि दासीपरी । राबताती ज्याच्या घरीं ।
    तो न तुमची पर्वा करी । त्याचें वैभव निराळें ॥१५॥

    सविता सूर्यनारायण । त्यासी दीप कोठून ।
    प्रकाश देऊं शकेल जाण । प्रतिकार करण्या तमाचा ॥१६॥

    तो मुळींच प्रकाशमयी । त्याला दीपाचें काज नाहीं ।
    हलकारा तो कोठून होई । सार्वभौमा भूषविता ? ॥१७॥

    इच्छा ऐहिक वैभवाची । असते मानवांप्रति साची ।
    ती आहे व्हावयाची । पूर्ण या पुण्यकृत्यानें ॥१८॥

    रोग बरा करण्या भली । औषधाची योजना केली ।
    प्राणासाठीं नसे झाली । ती हें ध्यानीं धरा हो ॥१९॥

    रोग भय शरीरास । नाहीं मुळींच प्राणास ।
    जन्ममरण हेंही त्यास । नाहीं मुळीं राहिले ॥२०॥

    तैसी तुमची सुसंपन्नता । रक्षण व्हाया सर्वथा ।
    पुण्यरुप औषधी आतां । मिळणें भाग आहे कीं ॥२१॥

    संपन्नता हें शरीर । रोग त्याचें अनाचार ।
    त्याचा नाश होणार । या पुण्यरुप औषधीनें ॥२२॥

    म्हणून पुण्यसंचय करा । कुतर्क ना चित्तीं धरा ।
    पुण्य मेदिनीमाजीं पेरा । करा आपुल्या संपत्तीचा ॥२३॥

    वीज पेरितां खडकावर । तें वायां जातें साचार ।
    त्यास कधीं ना येणार । मोड हें ध्यानीं धरावें ॥२४॥

    अनाचार दुर्वासना । हे खडक असती जाणा ।
    तेथें टाकिल्यावरी दाणा । तो किडे पांखरें भक्षिती ॥२५॥

    संतसेवेसमान । कोणतें नाहीं पुण्य आन ।
    स्वामी सांप्रत गजानन । मुगुटमणी संतांचे ॥२६॥

    संतकार्यास कांहीं देतां । अगणित होतें सर्वथा ।
    एक दाणा टाकितां । मेदिनीमाजीं कणीस होतें ॥२७॥

    त्या कणसास दाणे येती । एकाचेच बहुत होती
    तीच पुण्याची आहे स्थिति । हें बुध हो विसरुं नका ॥२८॥

    ऐसें बोलतां साचार । कुटाळ झालो निरुत्तर ।
    खरें तत्त्व असल्यावर । कुंठित गती तर्काची ॥२९॥

    नेता असल्या वजनदार । वर्गणी ती जमे फार ।
    क्षुल्लकाच्यानें न होणार । कार्य कधीं वर्गणीचें ॥३०॥

    असो मिळाल्या जागेवरी । कोट बांधिला सत्वरीं ।
    झटूं लागले गांवकरी । मग वाण कशाची ? ॥३१॥

    बांधकाम कोटाचें । चालतां शेगांवीं साचें ।
    दगड चुना रेतीचें । सामान गाड्या वाहती ॥३२॥

    त्या वेळीं समर्थस्वारी । होती जुन्या मठावरी ।
    त्यांनीं विचार अंतरीं । ऐशा रीतीं केला हो ॥३३॥

    आपण येथें बसल्याविणें । काम न चाले झपाट्यानें ।
    म्हणून कौतुक समर्थानें । केलें कसें तें परियेसा ॥३४॥

    एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी ।
    तो गाडीवान झाला दूरी । महार होता म्हणून ॥३५॥

    तयीं महाराज वदले तयास । कां रे खालीं उतरलास ? ।
    आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ॥३६॥

    महार बोले त्यावरी । महाराज तुमच्या शेजारीं ।
    मी न बसे गाडीवरी । तें आम्हां उचित नसे ॥३७॥

    मारुती रामरुप झाला । परी रामासन्निध नाहीं बसला ।
    तो उभाच पहा राहिला । कर जोडूनी रामापुढें ॥३८॥

    बरें बापा तुझी मर्जी । त्यास हरकत नाहीं माझी ।
    बैलांनों, नीट चला आजी । गाडीवाल्यामागून ॥३९॥

    बैल तैसे वागले । नाहीं कशास बुजाले ।
    गाडीवाल्यावांचून आले । नीट सांकेतिक स्थलास ॥४०॥

    समर्थ खालीं उतरले । मध्यभागीं येऊन बसले ।
    तेथेंच हल्लीं काम झालें । त्यांच्या भव्य समाधीचें ॥४१॥

    ही जागा शेगांवांत । आहे दोन नंबरांत ।
    त्रेचाळीस पंचेचाळीस । सातशें सर्व्हे नंबराच्या ॥४२॥

    महाराज बसले ज्या ठिकाणीं । तीच यावी मेदिनी ।
    मध्यभागा म्हणूनी । हें करणें भाग पडलें ॥४३॥

    त्या दोन नंबरांतून । जागा थोडथोडी घेऊन ।
    साधिला तो मध्य जाण । ऐसे चतुर कारभारी ॥४४॥

    एक एकराचा हुकूम झाला । परी बांधकामाच्या वेळेला
    समाधिमध्य साधण्याला । जागा थोडी पडली कमी ॥४५॥

    त्यासाठीं म्हणून । अकरा गुंठे जास्त जाण ।
    जमीन ती घेऊन । बांधकाम चालविलें ॥४६॥

    पुढार्‍यांच्या होतें मनीं । वचन दिलें अधिकार्‍यांनीं ।
    आणिक एक एकर तुम्हांलागुनी । काम पाहून जागा देऊं ॥४७॥

    यास्तव केलें धाडस । अकरा गुंठे घेण्यास ।
    परी तें गेलें विकोपास । एका दुष्टाच्या बातमीमुळें ॥४८॥

    यामुळें पुढारी । थोडे घाबरले अंतरीं ।
    त्यांत जो पाटील होता हरी । तो बोलला समर्था ॥४९॥

    अकरा गुंठे जागेचा । तपास करावया साचा ।
    एक जोशी नांवाचा । आला असे अधिकारी ॥५०॥

    हांसत हांसत पाटलाला । समर्थानें शब्द दिला ।
    जागेबद्दल जो कां झाला । दंड तुम्हां तो माफ होईल ॥५१॥

    त्या अधिकारी जोशाप्रती । समर्थानें दिली स्फूर्ती ।
    चाललेल्या प्रकरणावरती । शेरा त्यांनीं मारिला ॥५२॥

    कीं हा दंड झालेला । विनाकारण आहे भला ।
    दंड गजानन संस्थेला । परत द्यावा म्हणून ॥५३॥

    मी करुन आलों चौकशी । जाऊन त्या शेगांवासी ।
    या घडलेल्या प्रकारासी । दंड होणें उचित नाहीं ॥५४॥

    म्हणून तो माफ केला । ऐसा हुकूम जेव्हां आला ।
    तैं हरी पाटलाला । आनंद झाला विशेष ॥५५॥

    तो म्हणे समर्थांचें । वाक्य ना खोटें व्हावयाचें ।
    मजवरी किटाळ महाराचें । येऊन गेलें नुकतें एक ॥५६॥

    त्या वेळीं महाराजांनीं । भिऊं नकोस म्हणोनी ।
    तुझ्या एकाही केसालागुनी । धक्का न त्याचा बसेल ॥५७॥

    तेंच खरें अखेर । घडून आलें साचार ।
    तैसाच हाही प्रकार । आज दिनीं झालासे ॥५८॥

    समर्थवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधीं ऐकिलें ।
    असो शेगांवाचे लागले । लोक भजनीं स्वामींच्या ॥५९॥

    आतां नव्या जागेंत आल्यावर । जे कांहीं घडले प्रकार ।
    म्हणजे समर्थांचे चमत्कार । ते आतां वर्णितों ॥६०॥

    मेहेरकरच्या सान्निध्याला । सवडद नामें ग्राम भला ।
    त्या गांवींचा एक आला । गंगाभारती गोसावी ॥६१॥

    यास होता महारोग । कुजून गेलें अवघें अंग ।
    उरली न पडल्यावांचून भेग । जागा दोन्ही पायांला ॥६२॥

    करपद बोटें झडून गेलीं । तनूप्रती चढली लाली ।
    कानाच्या सुजल्या पाळी । कंडू सुटला तनूतें ॥६३॥

    म्हणून गंगाभारती । त्या महारोगा त्रासला अती ।
    समर्थांची ऐकोन कीर्ति । शेगांवासी पातला ॥६४॥

    श्रोते त्या गोसाव्याप्रत । लोक आडवूं लागले बहुत ।
    तुला रक्तपिति आहे सत्य । तूं न जावें दर्शना ॥६५॥

    महाराज दिसतील ऐशा ठायीं । उभा राहून दर्शन घेई ।
    कधींही ना जवळ जाई । त्यांचे चरण धरावया ॥६६॥

    हा स्पर्शजन्य रोग फार । म्हणून वैद्य डाँक्‍टर ।
    सांगती याचा विचार । तूं आपल्या मनीं करी ॥६७॥

    परी एके दिनीं गंगाभारती । चुकवून अवघ्या लोकांप्रती ।
    येता झाला सत्वर गतीं । प्रत्यक्ष दर्शन घ्यावया ॥६८॥

    डोई ठेवितां पायावर समर्थांनीं चापट थोर ।
    मारिली त्याच्या डोक्यावर ।अति जोरानें विबुध हो ॥६९॥

    म्हणून तो उभा ठेला । समर्थास न्याहाळूं लागला ।
    स्वामींनीं त्याचे थोबाडाला । दोन्ही करें ताडिलें ॥७०॥

    फडाफड मारिल्या मुखांत । आणिक वरती एक लाथ ।
    खाकरोनी बेडक्याप्रत । थुंकले त्याच्या तनूवरी ॥७१॥

    तोच त्यांनीं मानिला । समर्थांचा प्रसाद भला ।
    बेडका होता जो कां पडला । तयाचीया अंगावर ॥७२॥

    तो त्यानें घेऊन करीं । चोळून अवघ्या शरीरीं ।
    लाविता झाला मलमापरी । आपुल्या सर्व अंगास ॥७३॥

    तो प्रकार पाहतां । एक कुटाळ तेथें होता ।
    तो गोसाव्यासी बोलतां । झाला पहा येणें रीति ॥७४॥

    आधींच शरीर नासलें । तुझें आहे बापा भलें ।
    त्यावरी यांनीं टाकिलें । या अमंगळ बेडक्यातें ॥७५॥

    तो तूं प्रसाद मानिला । अवघ्या अंगातें चोळिला ।
    जा लावून साबणाला । धुऊन टाकी सत्वर ॥७६॥

    हे ऐसे वेडेपीर । विचरुं लागतां भूमीवर ।
    त्यांशीं अंधश्रद्धेचे नर । साधु ऐसें मानिती ! ॥७७॥

    त्याचा परिणाम ऐसा होतो । अविधि कृत्यांस ऊत येतो ।
    तो येतां सहज जातो । समाज तो रसातळां ॥७८॥

    यासी तुझेंच उदाहरण । तूं औषध घेण्याचें सोडून ।
    आलास कीं रे धांवून । या वेड्यापिशापाशीं ॥७९॥

    गोसावी तें ऐकतां । हंसूं लागला सर्वथा ।
    म्हणे तुम्ही येथेंच चुकतां । याचा करा विचार ॥८०॥

    अमंगळ साधूपाशीं । कांहीं न राहतें निश्चयेंसी ।
    कस्तुरीच्या पोटाशीं । दुर्गंधी ना वसे कदा ॥८१॥

    तुम्हां दिसला बेडका । तो हा प्रत्यक्ष मलम देखा ।
    कस्तुरीच्या सारखा । सुवास येतो यालागीं ॥८२॥

    तुम्हां संशय असल्यास । पहा माझ्या अंगास ।
    हात लावूनिया खास । म्हणजे कळून येईल कीं ॥८३॥

    त्यांत थुंक्याचें नांव नाहीं । अवघी औषधी आहे पाही ।
    मी इतुका वेडा नाहीं । बेडक्यास मलम मानणारा ॥८४॥

    तुझा त्याशीं संबंध नव्हता । म्हणून बेडका दिसला तत्त्वतां ।
    समर्थांची योग्यता । त्वां न मुळीं जाणिली ॥८५॥

    त्याचें पहाण्या प्रत्यंतर । चाल जाऊं एकवार ।
    स्नान केलेल्या जागेवर । वेळ आतां करुं नको ॥८६॥

    समर्थ स्नान प्रतिदिवशीं । करतील ज्या जागेसी ।
    थल्या ओल्या मातीसी । मी लावितों निजांगा ॥८७॥

    ऐसा संवाद तेथें झाला । दोघे गेले स्नानस्थला ।
    तो कुटाळासी आला । अनुभव गोसाव्यापरीच ॥८८॥

    मृत्तिका स्नानस्थलाची । दोघांनींही घेतली साची ।
    तों गोसाव्याच्या हातींची । बसली औषधी होऊन ! ॥८९॥

    कुटाळाच्या हातांत । ओलीच माती आली खचित ! ।
    दुर्गंधीही किंचित्‌ । येत होती तियेला ॥९०॥

    तो प्रकार पाहतांक्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं ।
    कुत्सित कल्पना सोडूनी । शरण गेला समर्था ॥९१॥

    असो कोणी गोसाव्यातें । जवळ बसूं देत नव्हतें ।
    हा दूर बसून भजनातें । करी स्वामीपुढें नित्य ॥९२॥

    आवाज गंगाभारतीचा । पहाडी गोड मधुर साचा ।
    अभ्यास होता गायनाचा । त्या गंगाभारतीला ॥९३॥

    ऐसे पंधरा दिवस गेले । रोगाचें स्वरुप पालटलें ।
    लालीनें तें सोडिलें । जयाचिया अंगाला ॥९४॥

    चाफे झाले पूर्ववत्‌ । भेगा पदींच्या निमाल्या समस्त ।
    दुर्गंधीचा मोडला त्वरित । ठाव त्याचा श्रोते हो ॥९५॥

    गोसाव्याचें ऐकून भजन । होई संतुष्ट समर्थमन ।
    प्रत्येक जिवाकारण । गायन हें आवडतें ॥९६॥

    बायको गंगाभारतीची । अनुसूया नांवाची ।
    ती शेगांवीं आली साची । न्याया निज पतीला ॥९७॥

    संतोषभारती कुमार । होता तिच्याबरोबर ।
    येऊन पतीस जोडिले कर । चला आतां गांवातें ॥९८॥

    तुमची व्याधी बरी झाली । ती मीं दृष्टीं पाहिली ।
    समर्थ साक्षात्‌ चंद्रमौळी । आहेत हेंच खरें असें ॥९९॥

    मुलगा तेंच बोलला । म्हणे बापा गांवीं चला ।
    पुसून गजानन महाराजाला । येथें राहणें पुरें झालें ॥१००॥

    गंगाभारती म्हणे त्यावर । मला नका जोडूं कर ।
    आजपासून साचार । मी तुमचा खचित नाहीं ॥१॥

    ही अनाथाची माउली । स्वामी गजानन येथे बसली ।
    त्यानें माझी उतरली । धुंदी चापट मारुन ॥२॥

    राख लाविली अंगाप्रत । आणि चित्त तुझें संसारांत ।
    केलीस विटंबना बहुत । या भगव्या वस्त्राची ॥३॥

    ऐसें संकेतें बोलले । थापट्या मारुन जागें केलें ।
    आतां डोळे उघडिले । संसाराचा संबंध नको ॥४॥

    हे संतोषभारती कुमारा । तूं तुझ्या आईस नेईं घरा ।
    येथें नकोस राहूं जरा । सवडद जवळ करावें ॥५॥

    हिचें जीवमान जोंवरी । तोंवरी हिची सेवा करी ।
    ही तुझी माय खरी । हिला अंतर देऊं नको ॥६॥

    मातोश्रीची करितां सेवा । तो प्रिय होतो वासुदेवा ।
    पुंडलिकाचा ठेवावा । इतिहास तो डोळ्यांपुढें ॥७॥

    मी येतां सवडदांत । पुन्हां रोग होईल पूर्ववत्‌ ।
    म्हणून त्या आग्रहांत । तुम्हीं न पडावें दोघांनीं ॥८॥

    आजवरी तुमचा होतों । आतां देवाकडे जातों ।
    नरजन्माचा करुन घेतों । कांहीं तरी उपयोग ॥९॥

    हा वायां गेल्या खरा । नराचा जन्म साजिरा ।
    चुकेल चौर्‍यांशींचा फेरा । ऐसें साच सांगितलें ॥११०॥

    समर्थकृपेनें निश्चिती । झाली मलाही उपरती ।
    या परमार्थखिरींत माती । टाकूं नका रे मोहाची ॥११॥

    ऐसें सांगून कुटुंबाला । मुलांसह सवडदाला ।
    दिले धाडून राहिला । आपण तसाच शेगांवीं ॥१२॥

    पदपदांतरें समर्थांचीं । आवडीनें म्हणावीं साची ।
    त्यास कला गायनाची। येत होती विबुध हो ॥१३॥

    प्रत्यहीं तो अस्तमाना । एकतारा घेऊन जाणा ।
    समर्थांच्या सन्निधाना । बैसून भजन करीतसे ॥१४॥

    ऐकून त्याचें भजन । इतरांचेंही हर्षें मन ।
    वस्तु अशीच आहे गान । रंजविणारी सर्वांतें ॥१५॥

    हा गंगाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला ।
    मलकापुरास पुढें गेला । गजाननाच्या आज्ञेनें ॥१६॥

    असो एकदां पौषमासीं । झ्यामसिंग आला शेगांवासी ।
    बोलतां झाला समर्थांसी । माझ्या गांवास चला हो ॥१७॥

    मम भाच्याच्या गृहाला । अडगांवीं नेण्याला ।
    मी आलों होतों आपणांला । तयीं आपुला करार ॥१८॥

    ऐसा होता समर्था । मी नाहीं येत आतां ।
    नको करुं आग्रह वृथा । पुढें मागें येईन ॥१९॥

    त्याला दिवस झाले बहुत । आतां चला मुंडगांवांत ।
    मी आहें आपुला भक्त । माझी इच्छा पूर्ण करा ॥१२०॥

    मुडंगांवात माझे घरीं । कांहीं दिवस राहा तरी ।
    मी अवघी करुन तयारी । न्याया आलों आपणा ॥२१॥

    झ्यामसिंगाबरोबर । मुंडगांवीं आले साधुवर ।
    दर्शना लोटले नारीनर । तो न आनंद वर्णवे ॥२२॥

    झ्यामसिंगानें भंडारा । घातिला असे थोर खरा ।
    मुंडगांव झालें गोदातीरा । दुसरें कीं हो पैठण ॥२३॥

    पैठणामाजी एकनाथ । मुंडगांवीं गजानन संत ।
    भजनी दिंड्या अमित । आल्या भजन करावया ॥२४॥

    आचारी लागले स्वैपांका । अर्धा स्वैंपाक झाला निका ।
    तैं महाराज बोलले देखा । ऐसें झ्यामसिंगासी ॥२५॥

    झ्यामसिंगा, आज चतुर्दशी । मुळींच आहे रिक्त तिथी ।
    भोजनाच्या पंक्ती । पौर्णिमेला होऊं दे ॥२६॥

    झ्यामसिंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार ।
    लोक जमले आहेत फार । आपला प्रसाद घ्यावया ॥२७॥

    स्वामींनीं केलें बोलणें । तुझें व्यवहार दृष्टीनें ।
    योग्यपरी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥२८॥

    झ्यामसिंगा, हें अन्न । न येईल उपयोगाकारण ।
    तुम्हां प्रापंचिकालागून । आपलेंच व्हावें वाटतें ॥२९॥

    पंक्ती बसल्या भोजना । तों एका एकी आकाश जाणा ।
    भरुन आलें गर्जना । होऊं लागली मेघाची ॥१३०॥

    चमके वीज माथ्यावरी । झंझावात सुटला भारी ।
    कडकडा ती कांतारीं । लागलीं झाडें मोडावया ॥३१॥

    घटकेंत पाणी पाणी झालें । अन्न अवघें वाया गेलें ।
    मग झ्यामसिंगानें विनविलें । महाराजास येणें रीतीं ॥३२॥

    आतां महाराज उद्यां तरी । मुळीं न व्हावें आजच्या परी ।
    हिरमुष्टी होऊन बसली खरी । अवघी मंडळी गुरुराया ॥३३॥

    निवाराया पर्जन्याला । हा नव्हे पावसाळा ।
    आगांतुक बेटा आला । आमचा नाश करावया ॥३४॥

    आतां पाऊस पडेल । तरी शेतीचें होईल ।
    वाटोळें तें पाहा सकळ । मग म्हणतील लोक ऐसें ॥३५॥

    झ्यामसिंगे केलें पुण्य । हा भंडारा घालून ।
    तें भोंवलें आम्हांलागून । वा खूप तर्‍हा पुण्याची ॥३६॥

    तैं महाराज म्हणाले झ्यामसिंगा ! । ऐसा सचिंत होसी कां गा ।
    तुला न उद्यां देईल दगा । हा पर्जन्य कधींही ॥३७॥

    आतांच मी वारितों त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी ।
    पाहूं लागला पुण्यराशी । तों आभाळ फांकलें ॥३८॥

    मेघ क्षणांत निघून गेले । सर्व ठायीं ऊन पडलें ।
    हें एका क्षणांत झालें । अगाध सत्ता संताची ॥३९॥

    दुसरें दिवशीं पौर्णिमेला । थोर भंडारा पुन्हां झाला ।
    तो नियम चालला । अजून या मुंडगांवीं ॥१४०॥

    झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट सर्व अर्पण केली ।
    महाराजांचे चरणीं भली । त्या मुंडगांव ग्रामांत ॥४१॥

    लोक त्या मुंडगांवांत । समर्थाचे झाले भक्त ।
    पुंडलीक भोकरे म्हणूनी त्यांत । एक जवान पोर्‍या असे ॥४२॥

    हा उकिरड्या नामक कुणब्याचा । पुत्र एकुलता एक साचा ।
    भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारीं ॥४३॥

    हें उकीर्डा नाम वर्‍हाडांत । पोर नसल्या वांचत ।
    लोक नवसें ठेवितात । ऐसा प्रघात त्या प्रांतीं ॥४४॥

    तें पेंटय्या तेलंगणांत । केर पुंजा महाराष्ट्रांत ।
    तैसा उकीर्डा वर्‍हाडांत । नांव ठेविती बालकाचें ॥४५॥

    हा पुंडलिक वद्य पक्षासी । करावया वारीसी ।
    येत नियमें शेगांवासी । घ्याया दर्शन समर्थांचें ॥४६॥

    जैसें कां ते वारकरी । वद्यपक्षामाझारीं ।
    जाती इंद्रायणीचे तीरीं । देहू आळंदी गांवाला ॥४७॥

    तैसाच हा वर्‍हाडांत । वारी वद्यपक्षांत ।
    करी येऊन शेगांवांत । परम भावभक्तीनें ॥४८॥

    असो एकदां वर्‍हाडांत । रोग ग्रंथिक सन्निपात ।
    बळावला अत्यंत । गांव बाहेर पडलें कीं ॥४९॥

    या तापांत ऐसें होतें । प्रथमतां थंडी वाजते ।
    अंग ज्वरानें तप्त होतें । डोळे होती लाल बहु ॥१५०॥

    आणि कोठें तरी सांध्यावर । ग्रंथि उठे सत्वर ।
    ती होतां करी जोर । वात तिच्या मागुनी ॥५१॥

    मग रोगी बरळतसे । शुद्धि न कांहीं राहातसे ।
    तलखी अंगाची होत असे । बेशुद्ध होई क्षणक्षणां ॥५२॥

    पूर्वीं हा रोग विपरीत । नव्हता भरतखंडांत ।
    त्याचा वास युरोपांत । होता मोठया प्रमाणीं ॥५३॥

    ती सांथ इकडे आली । गांवोगांव पसरली ।
    त्याच्या प्रतिकारा सोडून दिलीं । लोकांनीं तीं घरेंदारें ॥५४॥

    त्या दुर्धर सांथीची स्वारी । आली पाहा मुंडगांवावरी।
    तों पुंडलिकाची आली वारी । शेगांवास निघाला ॥५५॥

    कसकस त्याला घरींच आली । परी ती त्यानें चोरिली ।
    शेगांवाची वाट धरली । आपुल्या पित्यासमवेत ॥५६॥

    येतां पांच कोसांवर । शरीरासी भरला ज्वर ।
    एक पाऊल भूमीवर । तयाच्यानें टाकवेना ॥५७॥

    गांठ उठली बगलेंत । हैराण झाला रस्त्यांत ।
    ऐसें पाहून पुसे तात । कां रे पुंडलिका ऐसें करिशी ? ॥५८॥

    पुंडलिक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला ।
    गोळा एक कांखेला । उठला आहे येधवां ॥५९॥

    शक्ति सारी क्षीण झाली । आतां मशीं न चालवे मुळीं ।
    काय करुं ही राहिली । वारी हायरे दुर्दैवा ॥१६०॥

    हे स्वामी दयाघना ! । वारीस खंड पाडी ना ।
    दाव तुझ्या दिव्य चरणा । भक्त वत्सला कृपानिधी ॥६१॥

    वारी सांग झाल्यावर । मग येऊं दे खुशाल ज्वर ।
    जरी सांडलें शरीर । तरी न त्याची पर्वा मला ॥६२॥

    माझा पुण्यठेवा हीच वारी । ती रक्षण आतां करी ।
    ही सांथ झाली वैरी । नाश तिचा करावयातें ॥६३॥

    शरीरसामर्थ्य जोंवर । परमार्थ घडे तोंवर ।
    बापही झाला चिंतातुर । ती मुलाची पाहून स्थिति ॥६४॥

    तोही रडूं लागला । हा एकुलता एक पुत्र मला ।
    देवा न दिवा नेईं भला । हा माझ्या वंशाचा ॥६५॥

    उकिर्डा म्हणे पुत्रास । गाडीघोडे बसावयास ।
    आणूं का या समयास । तुला बाळा बसावया ॥६६॥

    पुंडलीक वदे तयावरी । झाली पाहिजे पायींच वारी।
    उठत बसत कसें तरी । जाऊं चला शेगांवा ॥६७॥

    मध्येंच मृत्यु आल्यास । शव तरी ने शेगांवास ।
    नको करुं शोकास । हेंच आतां सांगणें ॥६८॥

    बसत उठत पुंडलिक आला । अति कष्टें शेगांवाला ।
    पाहून स्वामी समर्थाला । घातलें त्यानें दंडवत ॥६९॥

    तों समर्थांनीं माव केली । एका हातानें दाबिली ।
    कांख त्यांनींच आपुली । अति जोर करोनिया ॥१७०॥

    आणि केलें मधुरोत्तर । पुंडलिका, तुझें गंडांतर |
    टळलें आतां तिळभर । चिंता त्याची करुं नको ॥७१॥

    तैसें महाराज वदतां क्षणीं । पुंडलिकाची गांठ जाणी ।
    गेली जागच्या जागीं जिरोनी । ताप तोही उतरला ॥७२॥

    कंप अशक्‍ततेनें । राहिला देहाकारणें ।
    करीं पुंडलिकाच्या मातेनें । आणिला नैवेद्य वाढून ॥७३॥

    घांस त्या नैवेद्याचे । समर्थें घेतां दोन साचें ।
    कांपरें तें पुंडलिकाचें । गेलें बंद होवोनिया ॥७४॥

    पुंडलिक झाला पूर्ववत् । अशक्‍तता राहिली किंचित् ।
    हें गुरुभक्‍तीचें फळ सत्य । उघडा डोळे अंधांनो ! ॥७५॥

    गुरु योग्य असल्यावरी । वायां न जाई सेवा खरी ।
    कामधेनु असल्या घरीं । कां न इच्छा पुरतील ? ॥७६॥

    सांग करुन वारीला । पुंडलिक गेला मुंडगांवाला ।
    हें जो चरित्र वाची भला । त्याचें टळेल गंडांतर ॥७७॥

    संतचरित्र ना कहाणी । अनुभवाची खाण जाणी ।
    मात्र अविश्वास मनीं । संतकथेचा न यावा हो ॥७८॥

    श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    सुखद होवो भाविकांप्रत । हेंच देवा मागणें ॥१७९॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 14

    अध्याय १४

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया ।
    सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥

    ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली ।
    शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥

    भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन ।
    वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥

    शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी ।
    बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥

    जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा ।
    दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥

    हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें ।
    बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥

    तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु ।
    भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥

    एक खेडेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा ।
    बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥८॥

    हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न
    उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥९॥

    श्रोते या प्रपंचांत । संकटें येती अतोनात ।
    परी नाहीं पहा सुटत । लोभ त्याचा मानवा ॥१०॥

    या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी ।
    तो अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगें ॥११॥

    ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला ।
    आली पाळी बिचार्‍याला । कर्ज काढणें साहूचें ॥१२॥

    घरदार पडलें गहाण । अगणित झालें तया ऋण ।
    लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥१३॥

    विकावया न कांहीं उरलें । सदन अवघें साफ झालें ।
    भांडेंकुंडें तेंही गेलें । काय विपत्ती वर्णावी ? ॥१४॥

    तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर ।
    भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥१५॥

    कांता बोले टाकून । मुलें करिती अपमान ।
    पत गेली उडून । उसनें न कोणी देती हो ॥१६॥

    ऐशा तापें तापला । जीव द्याया तयार झाला ।
    पैसा संपतां प्रपंचाला । कांहीं नसे किंमत ॥१७॥

    जें सुखाचें वाटे स्थान । तेंच दुःखाचें निकेतन ।
    संपून गेल्यावरी धन । सहज होतें न्याय हा ॥१८॥

    बंडूतात्या विचार करी । जीव कोठें देऊं तरी ।
    अफू खाऊन मरूं जरी । तरी ती घ्याया पैसा नसे ॥१९॥

    जरी जाऊन विहिरीवरी । जीव हा मी देऊं तरी ।
    तितुक्यांत कोणी येऊन वरी । जरी मला काढल्यास ॥२०॥

    जीवही ना जाईल । उलटी फजीती होईल ।
    सरकार शिक्षा देईल । आत्महत्यारा म्हणून मला ॥२१॥

    यापेक्षां हिमालया । जावे वाटे जीव द्याया ।
    आत्महत्येचा ते ठायां । दोषही ना लागेल ॥२२॥

    ऐसा करूनि विचार । पडला घराच्या बाहेर ।
    अखेरचा तो नमस्कार । केला त्यानें प्रपंचाला ॥२३॥

    एक लंगोटी घातली । राख अंगा लाविली ।
    तयानें ही युक्ति केली । ओळख आपुली बुजवावया ॥२४॥

    श्रोते अब्रुदारासी । जननिंदेचें मानसीं ।
    भय वाटे अहर्निशीं । हें सकळांसी ठाऊक ॥२५॥

    बंडूतात्या म्हणे मनीं । हे दीनदयाळा चक्रपाणी ।
    अवकृपा मजलागोनी । कां रे ऐसी केलीस ? ॥२६॥

    तुझ्यावरी विश्वास माझा । पूर्ण होता अधोक्षजा ।
    तूं रंकाचा करिसी राजा । ऐसें ऐकिलें पुराणीं ॥२७॥

    तें सर्व खोटें झालें । प्रत्ययासी माझ्या आलें ।
    व्यर्थ कवींनी रंगविलें । चरित्र तुझें नारायणा ॥२८॥

    आतां जीव देतों परी । तुझ्यावरी मी श्रीहरी ।
    याचा विचार कांहीं करी । हत्या नको घेऊं मम ॥२९॥

    ऐसें मनीं बोलला । तिकिट घ्याया लागला ।
    तों एक भेटला । विप्र त्यासी स्टेशनांत ॥३०॥

    आतांच हरिद्वाराचें । तिकीट नको घेऊं साचें ।
    घेऊन दर्शन संतांचें । मग जावें हरिद्वारा ॥३१॥

    आपल्या वर्‍हाड प्रातांत । श्रीगजानन महासंत ।
    आहेत अवतरले सांप्रत । त्यांच्या दर्शना जाय तूं ॥३२॥

    संतदर्शन आजवरी । वायां न गेलें भूमीवरी ।
    उगीच त्रासून अंतरीं । भलतें कांहीं करूं नको ॥३३॥

    ऐसें बोलतां ब्राह्मण । तात्या गेला गोंधळून ।
    म्हणे हा मनुष्य कोण ? । अवचित मसी भेटला ॥३४॥

    किंवा यानें ओळखिलें । मी बंडूतात्या म्हणून भलें ।
    कांहीं न माझा तर्क चाले । पुसुं तरी याते कसा ? ॥३५॥

    कांहीं असो शेगांवासी । जाऊन वंदूं समर्थांसी ।
    ऐसें बोलून मानसीं । शेगांवासी पातला ॥३६॥

    दर्शना गेला ब्राह्मण । तों महाराज वदले हांसून ।
    कां रे देशी जाऊन प्राण । हिमालयासी बंडूतात्या ॥३७॥

    अरे आत्महत्या करूं नये । हताश कदापि होऊं नये ।
    प्रयत्न करण्या चुकूं नये । साध्य वस्तु साधण्यास ॥३८॥

    आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून ।
    तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ॥३९॥

    नको जाऊं हिमालया । गंगेमाजी प्राण द्याया ।
    परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेड्या करूं नको ॥४०॥

    तिकीट घेतां जो भेटला । स्टेशनावरी ब्राह्मण तुला ।
    ओळखिलें का सांग त्याला ? । तो कोण होता हें कांहीं ॥४१॥

    जा आतां घरीं परत । राहूं नको लवही येथ ।
    बापा तुझ्या मळ्यांत । आहे एक म्हसोबा ॥४२॥

    त्या म्हसोबाच्या पूर्वेसी । बाभुळीच्या झाडापासी ।
    खोदून पहा मेदिनीसी । दोन प्रहर रात्रीला ॥४३॥

    काम जमीन खोदण्याचें । तूंच एकटा करी साचें ।
    खालीं तीन फुटांचें । द्रव्य तुजला सांपडेल ॥४४॥

    त्यांतून थोडें कर्जदारां । देऊनी ऋणमुक्त होई खरा ।
    नको सोडूंस बायकापोरां । उसनें वैराग्य वाहूं नको ॥४५॥

    ऐसे बोलतां गजानन । आनंदला तो ब्राह्मण ।
    आला खर्ड्यास परतून । राख पुसून अंगाची ॥४६॥

    रात्रीचिया वेळेला । मळ्यांत म्हसोबापासी आला ।
    बाभूळीखालीं लागला । जमीन खोदाया कारण ॥४७॥

    तों तीन फुटांवर । लागली श्रोते घागर ।
    एक तांब्याची साचार । वेळणी होती जिच्या मुखा ॥४८॥

    त्या तांब्याच्या घागरींत । मोहरा सोन्याच्या चार शत ।
    पडल्या त्याच्या दृष्टीप्रत । मग काय विचारितां ? ॥४९॥

    करीं घागर घेऊनिया । लागला तेथेंच नाचावया ।
    जय जय गजानन गुरुराया । ऐसें मुखें बोलून ॥५०॥

    त्याच द्रव्यें करून । फेडिलें त्यानें अवघें ऋण ।
    मळा होता पडला गहाण । तोही आणिला सोडवोनी ॥५१॥

    घडी बसली प्रपंचाची । ही गजाननकृपेनें साची ।
    वृत्ति बंडूतात्याची । गेली अती आनंदून ॥५२॥

    जेवीं मृत्यूची घटकां भरतां । अमृतकलश यावा हातां ।
    वा सागरामाजीं बुडतां । तारूं दृष्टीस पडावें ॥५३॥

    बंडूतात्यास तैसें झालें । दुःखाचे ते दिवस सरले ।
    मग त्यानें पुढें केलें । येणें पहा शेगांवा ॥५४॥

    दानधर्म तेथें केला । मोठ्या प्रमाणामाजीं भला ।
    गजाननाच्या पदीं झाला । लीन अनन्यभावानें ॥५५॥

    तई महाराज वदले त्यासी । आम्हांस कां रे वंदिसी ? ।
    ज्यानें दिला आहे तुसी । द्रव्यघट तो वंदी तया ॥५६॥

    आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून ।
    उगे न करी उधळेंपण । त्यांत नसे सार कांहीं ॥५७॥

    जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती ।
    त्याची सदैव करी भक्ती । तो न उपेक्षी कदा तुला ॥५८॥

    ऐसा उपदेश ऐकिला । समर्थांसी वंदून भला ।
    बंडूतात्या गांवास गेला । आपुल्या अती आनंदें ॥५९॥

    एकेकालीं सोमवती । पर्व आले निश्चिती ।
    जी कां अमावस्या येती । सोमवारीं ती सोमवती हो ॥६०॥

    या सोमवतीचें महिमान । पुराणांत केलें कथन ।
    या दिवशीं नर्मदास्नान । अवश्य म्हणती करावें ॥६१॥

    म्हणून शेगांवची मंडळी । नर्मदेस जाया तयार झाली ।
    तयारी त्यांनीं अवघी केली । पडशा वगैरे भरून ॥६२॥

    मार्तंड पाटील बंकटलाल । मारुती चंद्रभान बजरंगलाल ।
    यांनीं केला एक मेळ । ओंकारेश्वरीं जाण्याचा ॥६३॥

    बंकटलाल म्हणे अवघ्यांसी । आपण जातों नर्मदेसी ।
    घेऊं सांगातें महाराजांसी । स्नान कराया नर्मदेचें ॥६४॥

    चौघे मठामाजीं आले । समर्थां विनवूं लागले ।
    ओंकारेश्वरीं गुरुमाऊले । चला आमुच्या समवेत ॥६५॥

    तुम्ही असल्याबरोबर । काळाचाही नाहीं दर ।
    घाला आम्हांस पायांवर । त्या ओंकारेश्वराच्या ॥६६॥

    हा अधिकार मातेविना । नाहीं पाहा इतरांना ।
    आमुची विनंती हीच चरणा । न्यावें आम्हा नर्मदेसी ॥६७॥

    तुम्ही आल्यांवांचून । आम्ही न हालूं येथून ।
    बालहट्टालागून । जननी तीच पुरवीतसे ॥६८॥

    महाराज म्हणाले तयासी । आहे नर्मदा माझ्यापाशीं ।
    उगीच त्रास द्यायासी । जाऊं कशाला तिला मग ? ॥६९॥

    मी या मठांत बैसुन । करीन नर्मदेचें स्नान ।
    तुम्ही या सारे जाऊन । श्रीओंकारेश्वराला ॥७०॥

    तेथें राजा पूर्वकालीं । मान्धाता भाग्यशाली ।
    होऊन गेला महाबली । दिगंत ज्याची कीर्ति असे ॥७१॥

    श्रीशंकराचार्य गुरुवर । यांनीं कराया जगदोध्दार ।
    तेथेंच दीक्षा साचार । परमहंसाची घेतली ॥७२॥

    जा जा तुम्ही तया स्थला । भेटा माझ्या नर्मदेला ।
    मात्र नेऊं नका मला । उगाच आग्रह करून ॥७३॥

    आतां पर्वाचें प्रयोजन । नाहीं राहिलें मजलागून ।
    ऐसें ऐकतां चवघेजण । घट्ट धरिती पायांला ॥७४॥

    कांही असो तेथवरी । चला आमुच्या बरोबरी ।
    लगेच येऊं माघारी । स्नान करूनी नर्मदेचें ॥७५॥

    महाराज म्हणाले ठिक ठिक । तुम्हीं दिसतां दांभिक ।
    नर्मदेचें आहे उदक । या आपुल्या विहिरीमध्यें ॥७६॥

    तिला टाकून आपण । तेथें कराया गेलों स्नान ।
    तरी राग येईल दारुण । माझ्या त्या नर्मदेला ॥७७॥

    म्हणून सांगतों तुम्हींच जावें । मला न आग्रहा करावें ।
    माझें वचन मानावें । यांत तुमचें कल्याण ॥७८॥

    मग मारुती चंद्रभान । करूं लागला भाषण ।
    आम्ही घेतल्यावांचुन । आपणां न जाऊं कीं ॥७९॥

    समर्थ म्हणाले मी तेथ । आल्य होईल विपरीत ।
    मग तुम्ही दोष मात्र । देऊं नये आम्हांला ॥८०॥

    ऐसें मठांत बोलणें झालें । अवघें ओंकारेश्वरा आले ।
    पर्वासाठीं मिळाले । लोक तेथें अपार ॥८१॥

    नर्मदेचे अवघे घाट । स्त्रीपुरुषांनी भरले दाट ।
    मुंगीलाही नसे वाट । जाया हराच्या मंदिरीं ॥८२॥

    कोणी स्नानास उतरले । कोणी संकल्प ऐकूं लागले ।
    कोणी घेऊन बेलफुलें । जाऊं लागले मंदिरांत ॥८३॥

    कोणी बर्फी पेढे खवा । बसून खाऊं लागले मेवा ।
    थव्यामागें लागला थवा । तेथें भजनकर्‍यांचा ॥८४॥

    पर्व संपेपर्यंत । अभिषेकाची मंदिरांत ।
    गर्दी झाली अत्यंत । शब्द कोणाचा कोणा न कळे ॥८५॥

    रम्यशा त्या ओंकारीं । समर्थाची बैसली स्वारी ।
    पद्मासन घालूनी कांठावरी । त्या महानदीच्या नर्मदेच्या ॥८६॥

    चौघे दर्शन घेऊन आले । समर्था विनवूं लागले ।
    आतां पाहिजे सोडिलें । जाणें सडकेनें आपणा ॥८७॥

    कां कीं भीड झाली फार । गाड्या मोडती वरचेवर ।
    बैल गाडीचे बुजार । आहेत आपुल्या त्यांतूनी ॥८८॥

    खेडीघाट स्टेशनाला । जाण्यायेण्याचा करार केला ।
    गाडीवाल्यानें तो भला । न सांगतां गुण बैलांचे ॥८९॥

    ते बसतां आले कळून । आपण होतां म्हणून ।
    पोंचलों येथे येऊन । बैल द्वाड गाडीचे ॥९०॥

    परत बसून गाडींत । जाणें न निर्भय वाटत ।
    म्हणून या नावेंत । बसून जाऊं स्टेशनाला ॥९१॥

    गर्दी झाली रस्त्यांनी । नदींतून जाऊ शांतपणीं ।
    ऐसेंच केलें कित्येंकांनीं । त्या पाहा नावा चालल्यात ॥९२॥

    तुम्हांस वाटेल तेंच करा । आम्हां न कांहीं विचारा ।
    मी वचनांत गुंतलों खरा । तुम्ही बसाल तेथें येऊं ॥९३॥

    ऐसें समर्थ बोलले । त्यांच्यासवें नावेंत बैसलें ।
    गर्दीतून जाऊं लागले । खेडीघाट स्टेशनाला ॥९४॥

    तों नदींत मध्यंतरीं । नाव आदळली खडकावरी ।
    फळी फुटून गेली सारी । तिच्या बुडाची एक हो ॥९५॥

    छिद्र पडलें आरपार । येऊं लागलें आंत नीर ।
    नावाड्यानें सत्वर । नदींत उड्या टाकिल्या ॥९६॥

    परी महाराज निर्धास्त होते । ' गिनगिन गणांत बोते ' ।
    ऐसें भजन मुखातें । चाललें होतें अखंड ॥९७॥

    मार्तंड बजरंग मारुती । घाबरून गेले अती ।
    उडूं लागली धडधडा छाती । बंकटलालाची विबुध हो ॥९८॥

    चवघे समर्थां बोलले । आम्ही अपराधी आहों भले ।
    आम्हीं न तुमचें ऐकिलें । शेगांवांत दयाळा ॥९९॥

    त्याचें दिलें आम्हां फळ । तुम्ही आज तात्काळ ।
    नर्मदाच झाली काळ । आम्हांलागीं बुडवावया ॥१००॥

    गुरुराया आपुली वाणी । वेदतुल्य मानूं येथूनी ।
    वांचवा या संकटातूनीं । शेगांव दृष्टी पडूं द्या ॥१॥

    ऐसें जों ते बोलतात । तों निंम्यावरी पाण्यांत ।
    नाव बुडाली लोटत लोटत । एक फर्लांग गेली हो ॥२॥

    कांहीं लोक बोलती ऐसें । मेली हीं पांच माणसें ।
    आतां यांचा भरवंसा नसे । अथांग पाणी नर्मदेला ॥३॥

    तई म्हणाले गजानन । नका होऊं हैराण ।
    तुमच्या जीवालागून । धक्का न लावी नर्मदा ॥४॥

    ऐसें म्हणून स्तवन केलें । नर्मदेचें त्यांनी भलें ।
    हे चवघे बैसले । हात जोडून नावेंत ॥५॥

    श्लोक ( अनुष्टुप छंद )

    नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी ।
    मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनीं ॥
    ऐसें स्तवन चाललें । तों आंतील पाणी निघून गेलें ।
    नर्मदेनें लाविलें । आपुल्या करास त्या छिद्रा ॥६॥

    नाव श्रोते पहिल्यापरी । आली जलाचिया वरी ।
     नावेच्या बरोबरी । होती प्रत्यक्ष नर्मदा ॥७॥

    कोळणीचा धरला वेष । मस्तकावरी कुरळ केश ।
    भिजविलें जियेच्या वस्त्रास । कंबरेपर्यंत जलानें ॥८॥

    नौका कांठास लागली । अवघ्यांनी ती पाहिली ।
    आश्चर्यचकित मुद्रा केली । पाहून तळीच्या छिद्राला ॥९॥

    ही बाई होती म्हणून । आमुचे हे वांचले प्राण ।
    बाई आपण कोठील कोण ? । हें कांहीं सांगा हो ॥११०॥

    सोडा वस्त्र बिजलेलें । आम्ही नवें देतों भलें ।
    तईं नर्मदेनें पहा केलें । ऐशा रीतीनें भाषण ॥११॥

    मी ओंकार कोळ्याची कन्यका । माझें नांव नर्मदा ऐका ।
    आम्हां परिपाठ आहे देखा । ओलें वस्त्र नेसण्याचा ॥१२॥

    मी ओलीच राहतें निरंतर । माझेंच रूप आहे नीर ।
    ऐसें बोलून नमस्कार । करून गेली गजानना ॥१३॥

    क्षणामाजीं नाहींसी । झाली ती नर्मदेसी ।
    वीज चमकून आकाशीं । घनीं जैसी लीन होते ॥१४॥

    तों पहातां प्रकार । चवघे आनंदले फार ।
    कळला स्वामींचा अधिकार । नर्मदा आली दर्शना ॥१५॥

    बंकट विचारी खोदून । समर्था ही स्त्री कोण ? ।
    तें सांगावें फोडून । गुप्त कांहीं ठेवूं नका ॥१६॥

    तईं महाराज वदले तत्त्वतां । तुम्हीं जे कां विचारितां ।
    तो कथिला आहे गाथा । नर्मदेनें तुम्हांस ॥१७॥

    कोळी जो का ओंकार । तोच हा ओंकारेश्वर ।
    माझेंच रूप आहे नीर । ऐसें नर्मदा वदलीना ? ॥१८॥

    अरे ती प्रत्यक्ष नर्मदा । संशय तेथें न घ्यावा कदा ।
    संकटामाजीं देतें सदा । हात ती आपुल्या भक्तातें ॥१९॥

    म्हणून तिचा जयजयकार । करा मोठ्यानें एक वार ।
    जय जय नर्मदे निरंतर । ऐसेंच रक्षण अंबे करी ॥१२०॥

    ऐसें ऐकतां वचन । बंकटलालादि चवघे जण ।
    समर्थांचे दिव्य चरण । वंदूं लागलें क्षणक्षणां ॥२१॥

    परत आले शेगांवांत । ज्यांना त्यांना हीच मात ।
    होऊनिया हर्षभरित । सांगूं लागले विबुध हो ॥२२॥

    सदाशिव रंगनाथ वानवळे । एक्या गृहस्थासमवेत भले ।
    शेगांवांत येते झाले । महाराजांच्या दर्शना ॥२३॥

    या सदाशिवाकारण । टोपण नांव तात्या जाण ।
    हे माधवनाथाचे छात्रगण । चित्रकूटच्या होते हो ॥२४॥

    या माधवनाथाप्रत । योगांगे होतीं अवगत ।
    ज्यांचा शिष्यगण माळव्यांत । आहे मोठ्या प्रमाणीं ॥२५॥

    सदाशिव आले शेगांवाला । जेव्हां श्रीच्या दर्शनाला ।
    तेव्हां महाराज भोजनाला । बसले होते मठांत ॥२६॥

    सदाशिवासी पाहून । माधवाची झाली आठवण ।
    गजाननाकारण । संत संता जाणती ॥२७॥

    वानवळे येतांक्षणीं । महाराज बोलले मोठ्यांनीं ।
    अरे नाथाच्या शिष्यालागुनी । बसवा आणून माझ्यापुढें ॥२८॥

    त्यांचे गुरु माधवनाथ । गेले जेवून इतक्यांत ।
    मठीं माझ्या समवेत । तों हे दोघे पातले ॥२९॥

    थोडा वेळ आधीं जरी । हे आले असते तरी ।
    भेट त्यांच्या गुरूची खरी । यांना येथें मठांत ॥१३०॥

    आतां हे मागून आले । गुरु त्यांचे निघून गेले ।
    विडा न घेतां भले । त्याची करूं पुर्तता ॥३१॥

    वानवळ्यासी आलिंगन । देते झाले दयाघन ।
    पोरें बंधूंचीं म्हणून । ऐसा तो संतप्रेमा ॥३२॥

    रीतिप्रमाणें सत्कार केला । वानवळ्याचा शेगांवाला ।
    जातांना त्या निरोप दिला । समर्थांनीं येणे रीतिं ॥३३॥

    तुम्ही माधवनाथाला । असेच जा भेटण्याला ।
    त्यांचा येथें राहिला । विडा तो त्या द्यायास ॥३४॥

    मी म्हणतों तेंच सांगा । पदरचें न घाला बघा ।
    आमच्या वाक्यामाजीं उगा । फरक तुम्ही करूं नये ॥३५॥

    म्हणा " साथे भोजन हुवा । विडा तुम्हारा याही रहा ।
    तो आम्ही आणिला पाहा । नाथां तुम्हां द्यावयास " ॥३६॥

    हें सारें बोलणें । ऐकलें त्या वानवळ्यानें ।
    घेऊन विड्याचीं दोन पानें । गमन करितां जाहला ॥३७॥

    माधवनाथा हकीकत । त्यानें कथिली इत्थंभूत ।
    महाराज आपण शेगांवांत । आला होता कां ते दिनीं ? ॥३८॥

    गजानन जें बोललें । तैसेंच आहे जाहलें ।
    भोजनसमयीं त्यांनीं केलें । स्मरण माझें तीच भेट ॥३९॥

    ऐशा रीतिं एकमेकां । आम्हीं भेटतों सदैव देखा ।
    येथें शंका घेऊं नका । स्मरण तीच भेट होय ॥१४०॥

    त्यांचा माझा एक प्राण । शरीरे हीं मात्र भिन्न भिन्न ।
    हें आहे खोल ज्ञान । तें न इतक्यांत कळे तुम्हां ॥४१॥

    बरें झालें आणिला । आमुचा विडा तुम्हीं भला ।
    जो होता राहिला । शेगांवीं शिष्य हो ॥४२॥

    पानें देतां वानवळ्यांनीं । तीं भक्षिलीं नाथांनीं ।
    खलबत्त्यांत कुटुनीं । थोडा प्रसाद दिला त्याला ॥४३॥

    संतभेटी होती कैसी । हें चांगदेवपासष्टीसी ।
    सांगते झाले ज्ञानराशीं । श्रीज्ञानेश्वर महाराज ॥४४॥

    ती पासष्टी मनीं आणा । म्हणजे ह्या कळतील खुणा ।
    स्वानुभवाच्या ठायीं जाणा । वाव न तर्काकारणें ॥४५॥

    योगी वाटेल तेथोनी । भेटे एकमेकांलागूनी ।
    भेट ठायीच बैसोनी । होतें त्याचें कौतुक हें ॥४६॥

    शेख महंमद श्रीगोंद्यांत । तुकाराम होते देहूंत ।
    आग लागतां मंडपाप्रत । देहूमाजीं कीर्तनाच्या ॥४७॥

    ती श्रीशेख महंमदांनीं । विझविली श्रीगोंद्यांत बैसुनी ।
    हें महिपतीनें लिहूनी । ठेविलें भक्तिविजयांत ॥४८॥

    जाऊन हळी खेड्यांत । विहिरींत बुडतां पाटीलसुत ।
    वांचविलें देऊन हात । महाराज माणिकप्रभूंनीं ॥४९॥

    खरा योगी असल्याविना । ऐसें कौतुक होईना ।
    हें न साधे दांभिकांना । त्यांनीं गप्पाच माराव्या ॥१५०॥

    योग अवघ्यांत बलवत्तर । त्याची न ये कोणां सर ।
    करणें असल्या राष्ट्रोध्दार । त्याचा अवलंब करा हो ॥५१॥

    श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    ऐकोत सदा प्रेमळ भक्त । निष्ठा ठेवून ग्रंथावरी ॥१५२॥

    शुभं भवतु ॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 15

    अध्याय १५

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा ।
    तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥

    राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें ।
    तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥

    आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला ।
    आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥

    या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार ।
    देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥

    एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता ।
    पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥

    अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।
    कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥

    शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा ।
    देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥

    देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें ।
    आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥

    तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार ।
    मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥

    टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर ।
    दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥

    निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी ।
    ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥

    करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य ।
    सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥

    वाक्‌चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें ।
    धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥

    कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ।
    ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥

    तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला ।
    लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥

    झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची ।
    मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥

    दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान्‌ बडेबडे ।
    जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥

    अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे ।
    नांव ऐकतां टिळकांचें । वर्‍हाड सारें आनंदलें ॥१८॥

    शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं ।
    झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥

    शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती ।
    ती वर्‍हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥

    त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला ।
    वर्‍हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥

    माता होती वर्‍हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी ।
    अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥

    आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा ।
    आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥

    आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी ।
    ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥

    अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले ।
    तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥

    या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला ।
    श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥

    शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा ।
    समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥

    टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्‍न ।
    त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥

    ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें ।
    ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥

    तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां ।
    तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥

    फिरेल नागवा सभेंत । "गिण गिण गणांत" ऐसा म्हणत ।
    मारील वाटे कदाचित्‌ । तो लोकमान्याला ॥३१॥

    कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें ।
    गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥

    त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेड्याकारण ।
    जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेड्यापरी ॥३३॥

    खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक ।
    तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥

    खर्‍याखोट्याची परीक्षा । साधूच हे करिती देखा ।
    म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥

    ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली ।
    आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥

    येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी ।
    आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥

    वेड्यापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं ।
    सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥

    करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर ।
    याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥

    स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा ।
    शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥

    त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास ।
    तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥

    पाहा पाहा कोल्हटकरा । वर्‍हाडप्रांताचा ज्ञानहिरा ।
    यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥

    यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें ।
    खर्‍या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥

    बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास ।
    तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥

    मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला ।
    चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥

    खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार ।
    आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥

    वर्‍हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें ।
    कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥

    शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं ।
    वर्‍हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥

    सण अक्षय्यतृतीयेचा । वर्‍हाडप्रांतीं महत्त्वाचा ।
    परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥

    तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण ।
    लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥

    शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी ।
    ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥

    मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला ।
    म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥

    परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं ।
    साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥

    सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी ।
    गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥

    सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा ।
    त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥

    श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान ।
    खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥

    दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई ।
    सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥

    आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार ।
    त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥

    सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला ।
    मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥

    "दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन ।
    स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥

    त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची ।
    जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥

    त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला ।
    म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥

    तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले ।
    श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥

    म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी ।
    अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥

    स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला ।
    स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥

    यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्‍न ।
    ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥

    ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती ।
    तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?" ॥६७॥

    ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले ।
    गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥

    आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत ।
    जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥

    त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला ।
    आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥

    अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत ।
    ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥

    सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली ।
    खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥

    भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला ।
    दोर्‍या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥

    राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें ।
    वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥

    प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची ।
    त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥

    दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे ।
    ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥

    अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं ।
    बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥

    तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी ।
    सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥

    मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें ।
    तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥

    लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त ।
    येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥

    तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते ।
    तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित्‌ ॥८१॥

    कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं ।
    जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥

    कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची ।
    कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥

    जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड ।
    ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥

    चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले ।
    तुम्ही अलोट प्रयत्‍न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥

    अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला ।
    होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥

    सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।
    कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥

    ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर ।
    टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥

    या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी ।
    जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥

    ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर ।
    समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥

    ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला ।
    वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥

    तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत ।
    स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥

    यश तुमच्या प्रयत्‍नासी । नाहीं निश्चयेंसी ।
    आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥

    जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो ।
    हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥

    माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी ।
    ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥

    भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन ।
    आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥

    प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी ।
    दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥

    झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास ।
    तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥

    हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी ।
    मान जगत्‌-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥

    या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार ।
    त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥

    बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी ।
    केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥

    कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर ।
    कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥

    हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी ।
    या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥

    येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर ।
    कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥

    स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते ।
    पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥
    स्वातंत्र्य हे साचार । येतें जातें वरच्यावर ।
    त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥

    गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई ।
    आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥

    यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर ।
    चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥

    असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्‌पावन जातीचा ।
    श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥

    तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत ।
    आंग्‍लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥

    पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला ।
    म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥

    तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र ।
    तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥

    आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला ।
    उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥

    टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून ।
    अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥

    तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें ।
    ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥

    द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत ।
    घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥

    तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्‍यासी ।
    जो मन्‍रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥

    त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला ।
    तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥

    मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें ।
    दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥

    चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला ।
    त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥

    दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त ।
    उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥

    पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं ।
    आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥

    दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत ।
    बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥

    मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा ।
    म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेड्या करुं नको ॥२४॥

    अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत ।
    सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥

    त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं ।
    कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥

    ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे ।
    बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥

    तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती ।
    याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥

    ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी ।
    हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥

    अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन ।
    या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥

    तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला ।
    योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥

    तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई ।
    ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥

    पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला ।
    विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥

    एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन ।
    कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥

    महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही ।
    कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥

    जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत ।
    तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥

    श्रीधर बी.ए.एम्‌.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें ।
    शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥

    संत साक्षात्‌ ईश्वर । चालते बोलते भूमीवर ।
    त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥

    पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला ।
    म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥

    हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें ।
    वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥

    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 16

    अध्याय १६

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा ।
    परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥

    तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण ।
    ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥

    आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? ।
    काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥

    म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका ।
    आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥

    तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण ।
    आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥

    गजाननमाया अघटित । कोण जाणें तिजप्रत ।
    महाराजांचा एक भक्त । पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥

    हा शेगांवची करी वारी । समर्थाविषयीं प्रेम भारी ।
    हमेश त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥७॥

    त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही ।
    निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासीं बसत नसे ॥८॥

    ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार ।
    भरवून भोंदी नारीनर । हाच धंदा तियेचा ॥९॥

    ती बोलली पुंडलिकाला । तुझा जन्म वाया गेला ।
    कां कीं तूं नाहीं केला । सद्गुरु तो आपणांतें ॥१०॥

    गजाननाच्या वार्‍या करिसीं । सद्गुरु त्याला मानिसी ।
    परी त्यानें सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥११॥

    अरे विधीवांचून । गुरु न होत कधीं जाण ।
    शेगांवचा गजानन । वेडापिसा साच असे ॥१२॥

    तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला ।
    या काकतालीयन्यायाला । बळी पुंडलिका पडूं नको ॥१३॥

    ' गिन गिन गणातें ' हें भजन । पिशापरी आचरण ।
    कोणाचेंही खाई जाण । ऐसा मुळीं भ्रष्ट तो ॥१४॥

    म्हणून तुला सांगतें । चाल अंजनगांवातें ।
    केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥१५॥

    उद्यां त्यांचें कीर्तन । अंजनगांवीं असे जाण ।
    तें ऐकावया कारण । उठून जाऊं प्रातःकाळीं ॥१६॥

    गुरु असावा महाज्ञानी । चातुर्य-शास्त्र-चिंतामणी ।
    गुरु असावा परमगुणी । भक्तिपथातें दावितां ॥१७॥

    यांतील लक्षण एकही । गजाननाच्या नसे ठायीं ।
    म्हणून वेळ न करी कांहीं । चाल अंजनगांवांतें ॥१८॥

    तो भोकरे पुंडलिक । होता मनाचा भाविक ।
    भागीच्या भाषणें देख । चित्त त्याचें घोटाळलें ॥१९॥

    त्यानें ऐसा विचार केला । उदईक अंजनगांवाला ।
    जाऊं कीर्तन ऐकण्याला । पुढचा विचार पुढें करूं ॥२०॥

    ऐसा विचार करून । भागीसी बोलला जाण ।
    अंजनगांवालागून । चाल येतों तुझ्यासवें ॥२१॥

    दोघांचा विचार झाला । पुंडलिक रात्रीं स्वस्थ निजला ।
    तों तीन प्रहर रात्रीला । काय घडलें तें ऐका ॥२२॥

    पुंडलिकाच्या समोर । एक पुरुष दिगंबर ।
    उभा राहिला साचार । थेट समर्थांच्या परी ॥२३॥

    पुरुष म्हणे रे पुंडलिका । अंजनगांवासी जातोस कां ? ।
    गुरु करायातें निका । त्या भागीच्या सल्ल्यानें ॥२४॥

    जातोस तरी जावें त्वरित । त्याचें नांव काशीनाथ ।
    तेथें जातां फिटेल भ्रांत । तुझी वेड्या निश्चयें ॥२५॥

    कानांत कांहीं बोलला । म्हणून कां तो गुरु झाला ।
    लोक कानगोष्टीला । किती तरी करतात ॥२६॥

    मग ते एकमेकांचे । काय गुरु होती साचे ।
    नादीं दंभाचाराचे । त्वां पुंडलिका पडूं नये ॥२७॥

    तूं इकडे करी कान । मंत्र देतों तुजकारण ।
    ' गण गण ' ऐसें बोलून । महाराज स्तब्ध जहाले ॥२८॥

    आणखी काय आहे आस । ती मी आज पुरवीन खास ।
    ऐसे ऐकतां पुंडलिकास । आनंद अति जाहला ॥२९॥

    पाहूं लागला निरखून । स्वप्नीं त्या पुरुषालागून ।
    तों पाहिलें गजानन । शेगांवचे स्वामी पहा ॥३०॥

    पुंडलिक म्हणे गुरुराया । पादुका द्या ह्या मला सदया ।
    नित्य पूजा करावया । यावीण आणखी आस नसे ॥३१॥

    बरें उद्या दोन प्रहर । दिवस येतां साचार ।
    पादुकांची पूजा कर । ह्या मी दिधल्या घेई तुला ॥३२॥

    पादुका त्या घ्यावयाला । स्वप्नीं पुंडलिक उठून बसला ।
    तोंच आली तयाला । साक्षात् जागृति श्रोते हो ॥३३॥

    जागा होऊनी सभोंवार । पाहूं लागला साचार ।
    तो कोणीच दिसेना अखेर । नाहीं पत्ता पादुकांचा ॥३४॥

    उलगडा कांहीं होईना । संशय मनींचा जाईना ।
    म्हणे स्वामींच्या भाषणा । बाट न लागला आजवरी ॥३५॥

    स्वप्नीं येऊन दर्शन । त्यांनीं दिलें मजकारण ।
    कशी भागी ठाकरीण । तेंही स्वप्नीं कथन केलें ॥३६॥

    तैसेंच उद्यां दोन प्रहरीं । पादुकांची पूजा करी ।
    ऐसें बोलले साक्षात्कारी । त्याचा समजूं काय अर्थ ? ॥३७॥

    किंवा नव्या पादुका करून । म्यां करावें पूजन ।
    ऐसें त्यांचें आहे मन । हें कांहीं कळेना ॥३८॥

    मी पदींच्या मागितल्या । पादुका त्या होत्या भल्या ।
    त्याच त्यांनीं मसी दिल्या । मग नव्या घेऊं कशास ? ॥३९॥

    ऐसें नाना तर्क करी । पुंडलिक आपल्या अंतरीं ।
    तों इतक्यांत आली घरीं । भागी ठाकरीण बोलावण्या ॥४०॥

    अंजनगांवीं चाल आतां । मोक्ष गुरू करण्याकरितां ।
    दिसूं लागला आहे आतां रस्ता । अरुणोदयाचे प्रकाशें ॥४१॥

    पुंडलिक म्हणे भागाबाई । मी कांहीं येत नाहीं ।
    मर्जी असल्यास तूंच जाई । अंजनगांवाकारणें ॥४२॥

    मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला ।
    तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥४३॥

    तें ऐकतां भागाबाई । अंजनगांवास गेली पाही ।
    आतां मुंडगांवाचें ठाईं । काय झालें तें ऐका ॥४४॥

    झ्यामसिंग रजपूत । गेला होता शेगांवांत ।
    दर्शन स्वामींचें घेण्याप्रत । दोन दिवस याच्या आधीं ॥४५॥

    तो जेव्हां मूंडगावाला । येण्या परत निघाला ।
    तईं बाळाभाऊला । ऐसें बोलले महाराज ॥४६॥

    या पादुका पुंडलिकासी । द्याया देई याच्यापासी ।
    समर्थ आज्ञा होतां ऐसी । तैसेंच केलें बाळानें ॥४७॥

    करीं घेऊन पादुका । झ्यामसिंगास बोलला देखा ।
    भोकरे जो का पुंडलिका । तुमच्या गांवींचा असे हो ॥४८॥

    त्यास ह्या द्या नेऊन । करायासी पूजन ।
    तें झ्यामसिंगें ऐकून । पादुका घेतां जहाला ॥४९॥

    झ्यामसिंग आला मुंडगांवांत । तों पुंडलिक भेटला वेशींत ।
    पुसूं लागला त्याप्रत । कुशलवृत्त समर्थांचें ॥५०॥

    प्रसाद मला द्यावयासी । कांहीं दिला का तुम्हांपासी ? ।
    हें ऐकतां झ्यामसिंगासी । महदाश्चर्य वाटलें ॥५१॥

    सवें घेऊन पुंडलिकाला । झ्यामसिंग घेऊन घरीं गेला ।
    खोदून विचारूं लागला । तूं ऐसें कां विचारिलें ? ॥५२॥

    पुंडलिकानें स्वप्नाची । गोष्ट त्याला कथिली साची ।
    ती ऐकतां झ्यामसिंगाची । भ्रांति नष्ट झाली हो ॥५३॥

    लगेच पादुका काढिल्या । पुंडलिकाच्या हातीं दिल्या ।
    त्याच अजून आहेत भल्या । मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥५४॥

    दोन प्रहरीं पूजन । पुंडलिकानें केलें जाण ।
    मनोभावें करून । त्या प्रसादी पादुकांचें ॥५५॥

    पहा श्रोते खरें संत । सांभाळिती आपुलें भक्त ।
    आडमार्गानें किंचित्‍ । जाऊं न देती तयांला ॥५६॥

    निज भक्ताचे मनोरथ । समर्थ कैसे पुरवितात ।
    तें येईल ध्यानांत । या कथेतें ऐकतां ॥५७॥

    एक माध्यंदिन ब्राह्मण । कवर राजाराम म्हणून ।
    होता धंदा करून । अकोल्यांत सराफीचा ॥५८॥

    सोने चांदी भुसार । घेणें देणें साचार ।
    मध्यम प्रतीचा सावकार । हा राजाराम कवर असे ॥५९॥

    या राजारामाप्रती । महाराजाची होती भक्ती ।
    म्हणून त्याची संतती । मानूं लागली समर्था ॥६०॥

    या कवराकारण । दोन पुत्र होते जाण ।
    गोपाळ त्र्यंबक म्हणून । लव्हांकुशांसारिखे ॥६१॥

    कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती । भाऊस व्यवहारीं बोलती ।
    तो हैद्राबादेप्रती । गेला डाँक्टरी शिकावया ॥६२॥

    लहानपणापासून । भाऊस होतें देवध्यान ।
    म्हणजे त्र्यंबकालागून । हें येथें विसरूं नका ॥६३॥

    कांहीं संकट पडल्यावरी । तो समर्थांचा आठव करी ।
    राहून त्या भागानगरीं । मुसा नदीच्या कांठाला ॥६४॥

    एवंच भाऊ भक्तिमान । होता लहानपणापासून ।
    त्याचें दैवत गजानन । स्वामी शेगांवग्रामींचें ॥६५॥

    तो सुटीमाजीं आला घरीं । इच्छा उपजली अंतरीं ।
    जाऊनिया शेगांवनगरीं । जेवूं घालावें महाराजा ॥६६॥

    पदार्थ त्यांच्या आवडीचे । करोनिया सर्व साचे ।
    परी हें कैसें व्हावयाचें ? । हाच विचार पडला कीं ॥६७॥

    भाऊ म्हणे गुरुनाथा । काय तरी करूं आतां ।
    मरून गेली माझी माता । लहानपणींच दयाळा ॥६८॥

    घरीं माझें नाही कोणी । एक बंधूची कामिनी ।
    जिचें नांव आहे नानी । स्वभाव तापट तियेचा ॥६९॥

    माझ्या आहे ऐसें मनीं । आपण करावी मेजवानी ।
    आपुल्या आवडीचे करोनी । पदार्थ सारे गुरुराया ! ॥७०॥

    भाकरी ती ज्वारीची । कांदा भाजी आंबाड्याची ।
    ऊन पिठलें हिरवी मिर्ची । ऐसें तयार करावें ॥७१॥

    हे पदार्थ करण्याला । सांगूं कसा मी भावजईला ? ।
    हट्ट एक करण्याला । माता तेंच स्थान असे ॥७२॥

    ऐसा विचार करीत । भाऊ राहिला निवांत ।
    तों कांहीं कामानिमित्त । नानी आली ते ठायां ॥७३॥

    नानी दिराला बोलली । चिंता कशाची लागली ? ।
    मुखश्री ती म्लान झाली । तुमची कशानें ये वेळां ? ॥७४॥

    भाऊ वदे दीनवाणी । काय तुला सांगूं वहिनी ? ।
    माझे जे कां आले मनीं । विचार ते ये वेळां ॥७५॥

    पूर्ण सत्तेवांचून । मनोरथ ना होती पूर्ण ।
    म्हणून तुला सांगून । काय करणें आहे गें ॥७६॥

    नानी म्हणे त्यावर । सांगून पहा एकवार ।
    तूं माझा धाकटा दीर । मशीं पडदा ठेवूं नये ॥७७॥

    ज्येष्ठ भ्राता पित्यापरी । तत् कांता माय खरी ।
    मानिली पाहिजे साजिरी । तें तुम्ही जाणतसा ॥७८॥

    तें ऐकून भाऊ हंसला । नानीप्रती बोलता झाला ।
    नानी माझ्या मनाला । आज ऐसें वाटतें ॥७९॥

    गजाननाच्या आवडीचे । सर्व पदार्थ करून साचे ।
    आहेत मला न्यावयाचे । त्यांना द्याया शेगांवीं ॥८०॥

    तें तूं जरी करशील । तरी तुलाही लागेल ।
    पुण्य आणि होईल । काम माझें त्यायोगें ॥८१॥

    तें ऐकतां बोले नानी । दिराप्रती हास्यवदनीं ।
    यासाठींच कां हो मनीं । सचिंत तुम्हीं बैसलात ? ॥८२॥

    सांगा आहे काय कारणें । मजला स्पष्ट शब्दानें ? ।
    कांहीं ना आपुल्या गेहीं उणें । कृपेनें गजाननाच्या ॥८३॥

    मग भाऊनें सर्व कांहीं । निवेदन केलें तिला पाही ।
    तीही लागली लवलाही । आनंदानें स्वयंपाका ॥८४॥

    भाजी चून भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर ।
    ठेविल्या आणून समोर । आपुल्या त्या दिराच्या ॥८५॥

    भाकरी तीन, कांदे तीन । हरभर्‍याचें चून जाण ।
    लोणी ठेविलें माखून । प्रत्येक त्या भाकरीला ॥८६॥

    नानी म्हणाली दिराला । जा आतां शेगांवाला ।
    वेळ थोडका राहिला । आहे पाहा गाडीस ॥८७॥

    ती गाडी चुकल्यावरी । वाया जाईल तयारी ।
    भोजनाच्या वेळेवरी । गेलांत तरी उपयोग ॥८८॥

    ऐसेम नानीं बोलतां । भाऊ निघाला तत्त्वतां ।
    पुसूनियां आपुल्या ताता । येतां झाला स्टेशनासी ॥८९॥

    तों गाडी बाराची । निघूनियां गेली साची ।
    तेणें चित्तवृत्ति भाऊची । होती झाली शोकाकुल ॥९०॥

    अति हिरमोड त्याचा झाला । पाणी आलें लोचनांला ।
    म्हणे महाराज कां हो केला । अव्हेर माझा ये कालीं ? ॥९१॥

    मी मुळींच हीन दीन । कोठून घडावें मला पुण्य ? ।
    आम्हां कावळ्यांकारण । लाभ केवीं मानसाचा ॥९२॥

    अक्षम्य ऐसी कोणती । चुकी झाली माझ्या हातीं ।
    म्हणून माझी गुरुमूर्ति । गाडी चुकली ये वेळां ? ॥९३॥

    हाय हाय हे दुर्दैवा ! । त्वां माझा साधिला दावा ।
    माझ्या करीं गुरुसेवा । घडूं न दिली आज तूं ॥९४॥

    ही माझी शिदोरी । ऐशीच आज राहिली जरी ।
    नाहीं करणार भोजन तरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥९५॥

    गुरुराया कृपारासी । नका उपेक्षूं लेंकरासी ।
    ही शिदोरी सेवण्यासी । यावें धांवून सत्वर ॥९६॥

    थोर आपुला अधिकार । क्षणांत पहातां केदार ।
    मग या या येथवर । कां हो अनमान करितसां ? ॥९७॥

    मी न आज्ञा तुम्हां करितों । प्रेमानें हांका मारितों ।
    म्हणूनियां हा न होतो । अपमान तुमचा यत्किंचित् ॥९८॥

    तीन घंटे अजून । अवकाश गाडीकारण ।
    तोंवरी आपुलें भोजन । होईल ऐसें वाटतें ॥९९॥

    ऐसा विचार करीत । तेथेंच बैसला उपोषित ।
    चतुर्थ प्रहरीं शेगांवांत । आला तिहीच्या गाडीनें ॥१००॥

    कवर गेला दर्शना । तईं तो योगीराणा ।
    न करितां भोजना । बसला होता आसनीं ॥१॥

    नैवेद्याची अतोनात । ताटें होतीं मठांत ।
    पक्वान्नांनीं परिप्लुत । तीं वर्णावी कोठवरी ? ॥२॥

    कोणाच्या जिलब्या घीवर । कोणाचा तो मोतीचूर ।
    कोणाची ती नुसती खीर । श्रीखंड पुर्‍या कोणाच्या ॥३॥

    परी त्या नैवेद्याला । समर्थांनीं ना स्पर्श केला ।
    वरच्यावरी ताटाला । बाळा आणून ठेवीं पुढें ॥४॥

    आणि म्हणे हें करा ग्रहण । गेला एक वाजून ।
    आपुलें न झाल्या जेवण । प्रसाद भक्तां मिळतो कसा ? ॥५॥

    त्यांची ते वाट पाहती । करण्या आपणां विनंति ।
    त्यांची नसे होत छाती । म्हणून मी बोललों ॥६॥

    तैं महाराज म्हणती थांब जरा । आग्रह नको करूंस खरा ।
    आज भोजन चौथे प्रहरा । माझें होणार आहे रे ॥७॥

    मर्जी असल्यास थांबावें । ना तरी खुशाल जेवावें ।
    नैवेद्य घेऊनि घरा जावें । पर्वा नाही त्याची मला ॥८॥

    ऐसा प्रकार तेथें झाला । तों इतुक्यांत भाऊ आला ।
    समर्थ पाहतां आनंदला । भाऊ आपल्या मानसीं ॥९॥

    दुरावलेली माय जेवीं । बाळकें दृष्टि पहावी ।
    झालें असे पहा तेवीं । भाऊ कवराकारणें ॥११०॥

    समर्थासी नमस्कार । केला साष्टांग साचार ।
    उभा राहिला जोडोनी कर । वाट पाहत आज्ञेची ॥११॥

    त्या भाऊस पाहून । समर्थें केलें हास्यवदन ।
    बरेंच दिलेंस आमंत्रण । ही कां वेळ जेवण्याची ? ॥१२॥

    तुझ्या भाकेंत गुंतलों । मी उपोषित राहिलों ।
    नाहीं अजून जेवलों । आण तुझी शिदोरी ॥१३॥

    ऐसें महाराज बोलतां । हर्षलासे कवर चित्ता ।
    म्हणे काय करूं गुरुनाथा । गाडी चुकली बाराची ॥१४॥

    कवरास म्हणे बाळाभाऊ । आतां नको दुःखित होऊं ।
    काय आणलें आहेस पाहूं ? । समर्थासी जेवावया ॥१५॥

    ऐसें ऐकतां सत्वरीं । कांदे भाजी भाकरी ।
    कवरानें ठेविल्या समोरी । स्वामी गजाननाच्या ॥१६॥

    त्यांतील भाकरी दोन । समर्थें केल्या भक्षण ।
    एकीची तो प्रसाद म्हणून । अवघ्या भक्तां वांटिली ॥१७॥

    तो प्रकार पहातां । आश्चर्य झालें समस्तां ।
    कळली स्वामींची योग्यता । खरेच भक्तवत्सल ते ॥१८॥

    जेवीं हस्तिनापुरांत । भगवंतानें ठेविला हेत ।
    सोडून पक्वानाप्रत । विदुराच्या हुलग्यांवरी ॥१९॥

    तैसेंच येथें आज झालें । आमचें पक्वान्न नाहीं रुचलें ।
    भाकरीवरी गुंतलें । चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥

    भाऊंनीही घेतला । सनर्थप्रसाद शेगांवला ।
    सद्भाव येथें उदेला । तेथें ऐसेंच होणार ॥२१॥

    समर्थ बोलले कवरासी । जा आतां अकोल्यासी ।
    पास होशील पुढचे वर्षी । तूं डाँक्टरी परीक्षेंत ॥२२॥

    भाऊ म्हणे गुरुराया । आपुली असूं द्यावी दया ।
    यांविण दुसरें मागावया । मी न आलों ये ठाया ॥२३॥

    आपुले हे दिव्य चरण । हेंच माझें धनमान ।
    सर्वदा घडो चिंतन । आपल्या दिव्य मूर्तीचें ॥२४॥

    ऐसें बोलून अकोल्याला । भाऊ कवर निघून गेला ।
    समर्थ आपल्या भक्ताला । नुपेक्षिती कधींही ॥२५॥

    शेगांवींचा राहणार । तुकाराम शेगोकार ।
    एक होता भाविक नर । कृषिकर्म करीतसे ॥२६॥

    घरची गरीबी होती खरी । काम करोनी शेतांतरीं ।
    अस्तमानाचे अवसरीं । दर्शना यावें मठांत ॥२७॥

    चिलीम द्यावी भरून । घ्यावें पदाचें दर्शन ।
    कांहीं वेळ बसून । जावें पुन्हां शेतांतें ॥२८॥

    ऐसा नित्यक्रम तयाचा । बहुत दिवस चालला साचा ।
    घाला विचित्र दैवाचा । तो न कोणा सोडितसे ॥२९॥

    जें जें असेल दैवांत । तें तें श्रोते घडून येत ।
    एके दिनीं शेतांत । असतां तुकाराम आपुल्या ॥१३०॥

    तों एक आला शिकारी । बंदुक ज्याच्या खांद्यावरी ।
    नेम धरून ससे मारी । छरे घालून बंदुकींत ॥३१॥

    ती प्रभातीची होती वेळा । सूर्य नुकतां उदयाला ।
    तुकाराम होता बसला । आपल्या शेंती शेकत ॥३२॥

    तों त्याच्या मागें कुपाटिला । एक होता बसलेला ।
    ससा शुभ्र तोचि पडला । शिकार्‍याच्या दृष्टीसी ॥३३॥

    त्याची शिकार करण्या भली । शिकार्‍यानें आपुली ।
    नेम धरून झाडिली । खांद्यावरील बंदुक ॥३४॥

    त्यायोगें ससा मेला । एक छरा लागला ।
    त्या तुकाराम माळ्याला । कानामागें अवचित ॥३५॥

    छरा मोठा जोरदार । मस्तकीं शिरला अखेर ।
    थकले अवघे डाँक्टर । प्रयोग करून त्याचेवरी ॥३६॥

    कांहीं केल्या निघेना । छरा तो डाँक्टरांना ।
    होऊं लागल्या यातना । तुकारामासी अतिशय ॥३७॥

    मस्तक दुखे अहोरात्र । निद्रा न लागे किंचित ।
    नवस सायास केले बहुत । परी गुण येईना ॥३८॥

    ऐशाही अवस्थेंत । यावें त्यानें मठांत ।
    एके दिवशीं तो समर्थांचा एक भक्त । ऐसें बोलला तयाला ॥३९॥

    डाँक्टर वैद्य सोडा आतां । साधूचिया सेवेपरता ।
    नाहीं उपाय कोणता । उत्तम या जगामध्यें ॥१४०॥

    कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास ।
    झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तूं ॥४१॥

    तेव्हां सेवा ही घडेल । पुण्य़ तेंही लाधेल ।
    कृपा झाल्या होशील । त्रासापासून मोकळा ॥४२॥

    मात्र आपुल्या पित्यावरी । दांभिकतेनें हें ना करी ।
    शुध्द भाव अंतरीं । सर्वकाळ धरावा ॥४३॥

    तें तुकारामासी मानवलें । झाडणें त्यानें सुरूं केलें ।
    अवघ्या मठास ठेविलें । स्वच्छ त्यानें आरशापरी ॥४४॥

    ऐसीं चौदा वर्षें झालीं । तुकारामाई सेवा भली ।
    तईं गोष्ट घडून आली । ऐशा रीतिं श्रोते हो ॥४५॥

    झाडतां झाडतां कानांतून । छरा पडला गळून ।
    जैसी कांती भोकरांतून । दावितां सुटे आंठोळी ॥४६॥

    तैसें साच येथें झालें । छरा पडतां थांबलें ।
    दुखावयाचें मस्तक भलें । ऐसा प्रभाव सेवेचा ॥४७॥

    ही सेवा झाडण्याची । अखेरपर्यंत केली साची ।
    प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ॥४८॥

    ती एकदां बसल्यावर । मग मात्र होते स्थिर ।
    संतसेवा महाथोर । हे भाविक जाणती ॥४९॥

    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    तारक होवो भाविकांप्रत । भवसिंधुमाझारीं ॥१५०॥

    शुभं भवतु ॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 17

    अध्याय १७

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला ।
    जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥

    हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर ।
    तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥

    प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं ।
    रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥

    दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर ।
    नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥

    त्या भयंकर रुपाची । भीति नसे भक्ता साची ।
    पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥

    तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया ।
    ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥

    तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत ।
    पुरविशी भक्‍तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥

    त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी ।
    दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥

    गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत ।
    तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥९॥

    चापडगांवचे बापु कृष्ण । खटाऊ शेटचें कुटुंब जाण ।
    गोडू लालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥१०॥

    जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत ।
    त्यांचीं नांवें तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥११॥

    एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ ।
    खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यानें ठेविला ॥१२॥

    एक भक्त मलकापुरीं । विष्णूसा नामें निर्धारी ।
    त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥१३॥

    त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला ।
    हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥१४॥

    तो त्या वेळीं होता जवळ । करी कारभार अंगें सकळ ।
    विष्णूसाला होतें बळ । याच भास्कर पाटलाचें ॥१५॥

    भास्कर म्हणे मलकापुरीं । चला समर्था लवकरी ।
    भक्त विष्णूसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥१६॥

    मनोरथ येथील भक्तांचे । तुम्हीं पुरविले असती साचे ।
    आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥१७॥

    तईं समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा ।
    येत नाहीं जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥१८॥

    फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील ।
    याचा विचार करी खोल । मी न बोललों कांहीं तरी ॥१९॥

    दोरीसी दिधल्या फार ताण । ती मध्येंच तुटतसे जाण ।
    मी न हलणार येथून । तूं या फंदांत पडूं नको ॥२०॥

    भास्कर बोले त्यावरी । कांहीं असो मलकापुरीं ।
    चला विष्णूसाचे घरीं । हीच विनंति गुरुराया ! ॥२१॥

    मी तुमचा लाडका । मसी धक्का देऊं नका ।
    मी भरंवसा दिला देखा । तुम्हां घेऊनि येण्याचा ॥२२॥

    ती प्रतिज्ञा माझी पुरी । तुम्हीं करावी आज खरी ।
    चला आतां स्टेशनावरी । गाडींत बसायाकारणें ॥२३॥

    ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन ।
    मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो ! ॥२४॥

    भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी ।
    बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥२५॥

    महाराज तैसेंच बैसले । ते न कांहीं बोलले ।
    जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥२६॥

    तों गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा ।
    डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीतीं ॥२७॥

    जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला ।
    योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥२८॥

    आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार ।
    त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥२९॥

    पोलिसाचा अधिकारी । तेथें आला सत्वरीं ।
    महाराजाला धरुन करीं । खालीं ओढूं लागला ॥३०॥

    अरे वेड्या नंग्या पीरा । अक्कल कैसी तुज ना जरा ।
    बायकांच्या डब्यांत खरा । येऊन कैसा बैसलास ? ॥३१॥

    हिसडा देऊन त्याच्या हाता । तेथेंच बसले तत्त्वतां ।
    अधिकार्‍याची भीति चित्ता । मुळीं न त्यांच्या वाटली ॥३२॥

    मग तो अधिकारी भला । स्टेशन मास्तराकडे गेला ।
    म्हणे डब्यापासीं आतां चला । बायकाच्या माझ्यासवें ॥३३॥

    दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें ।
    योगीराज बसलेले । बायकांच्या डब्यांत ॥३४॥

    मास्तर पोलिसाच्या अधिकार्‍याला । ऐशा रीतीं बोलला ।
    तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥३५॥

    हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर ।
    याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हांही ॥३६॥

    तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी ।
    मी दिली आहे तार खरी । येविषयीं वरिष्ठाला ॥३७॥

    आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित ।
    मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥३८॥

    स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी ।
    बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा ! ॥३९॥

    तुम्हीं खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें ।
    कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥४०॥

    महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती ।
    कायद्याप्रमाणें निश्चिती । जठार साहेबासमोर ॥४१॥

    त्यांनीं फिर्याद घेतली । त्याची तारीख नेमली ।
    शेगांवावरती भली । चौकाशीची श्रोते हो ! ॥४२॥

    बापुसाहेब जठार । आले शेगांवाच्यावर ।
    डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥४३॥

    व्यकंटराव देसाई । अकोल्याचे होते पाही ।
    तेही आले ते ठाईं । कांहीं कामानिमित्त ॥४४॥

    महाराजांच्या खटल्याची । गांवीं पुकार झाली साचि ।
    म्हणून मंडळी शेगांवाची । फार मिळाली बंगल्यावर ॥४५॥

    तैं देसाई म्हणती जठरास । आज कोणता खटला विशेष ।
    तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥४६॥

    जठार म्हणाले त्यातें । याचें कारण तुम्हांतें ।
    कैसें न कळलें ? वाटतें । हेंच मला आश्चर्य ! ॥४७॥

    तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून ।
    पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥४८॥

    त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं ।
    म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥४९॥

    हें ऐकतां भाषण । व्यकंटराव झाले खिन्न ।
    बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥५०॥

    श्रीगजानन साधूची। योग्यता आहे थोर साची ।
    मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥५१॥

    तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना ।
    तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥५२॥

    खटला भरला हीच केली । पोलिसांनीं चूक भली ।
    ती पाहिजे दुरुस्त झाली । आज आपुल्या करानें ॥५३॥

    जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला ।
    याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥५४॥

    कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें।
    तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥५५॥

    तो येऊन समर्थासी । म्हणे चला आतां कचेरीसी ।
    अधिकार्‍यानें तुम्हांसी । मज धाडिलें बोलावण्या ॥५६॥

    बर्‍या बोलानें चलावें । फजितीस ना करुन घ्यावें ।
    ना तरी मला लागेल न्यावें । तुमच्या हाता धरुन ॥५७॥

    तईं वदले गजानन । आम्ही न उठूं येथून ।
    तुझें पहातों शिपाईपण । ये धरीं माझ्या करा ॥५८॥

    शिपायाचा हात धरिला । तो ना सुटे किमपि त्याला ।
    रक्तप्रवाह बंद झाला । त्या दाबाच्या योगानें ॥५९॥

    हातासी लागली कळ । जीव झाला व्याकुळ ।
    करुं लागला तळमळ । शिपाई तो त्याच ठाईं ॥६०॥

    शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविलें वकिलाला ।
    त्या व्यंकटराव देसायाला । समर्थासी आणावया ॥६१॥

    जठार म्हणती तुम्हीं जावें । समर्थासी घेऊन यावें ।
    लोकांसी न जमूं द्यावें । बंगल्याभोंवतीं निरर्थक ॥६२॥

    इतक्यांत आला समाचार । पोलिसाचा धरला कर ।
    बसविला एक्या जागेवर । महाराजांनीं सहज लीलें ॥६३॥

    मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोलले ।
    या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्थां धोतर ॥६४॥

    ऐसी सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं ।
    तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥६५॥

    गेले नागवे कचेरीस । सवें होतां भास्करशिष्य ।
    जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥६६॥

    या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत ।
    कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥६७॥

    नागवें फिरणें हाच गुन्हा । कायद्यांनीं ठरविला जाणा ।
    म्हणून विनंति आपणा । द्या हें सोडून नंगेपण ॥६८॥

    ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून ।
    आणि केलें हास्य वदन । उत्तर त्यासी द्यावया ॥६९॥

    तुला काय करणें यासीं । चिलीम भरावी वेगेंसी ।
    उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥७०॥

    तें ऐकतां भाषण । जठार गेले विरघळोन ।
    जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥७१॥

    हा वृषभदेव भागवतीचा । किंवा शुकाचार्य साचा ।
    किंवा वामदेवाचा । हा दुसरा अवतार ॥७२॥

    हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीनन्मुक्त ।
    नये लावितां याप्रत । गुन्हा विचारें केव्हांही ॥७३॥

    जेवीं अग्नीचा अग्नीपणा । अग्नि सोडीत नसे जाणा ।
    परी अग्निहोत्र्यांना । कुंडांत ठेवणें भाग त्यासी ॥७४॥

    अग्निदेव म्हणोन । ठेविल्या कुंडावांचून ।
    तो करील दग्ध सदन । हा दोष त्याचा नसे ॥७५॥

    तैसें याचें नागवेपण । आहे अग्निचे समान ।
    म्हणून याचा शिष्यगण । आहे अपराधी येविषयीं ॥७६॥

    वस्त्ररुपी कुंडाठायीं । जरी हा ठेविला असतां पाही ।
    तरी हरकत नव्हती कांहीं । सर्वांस सुखद होतें तें ॥७७॥

    ऐसा विचार पूर्ण केला । जठरांनीं चित्तीं भला ।
    आणि हुकूम फर्माविला । त्यांनीं पुढीलप्रमाणें ॥७८॥

    महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित ।
    भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥७९॥

    म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला ।
    ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारापुढें शेगांवीं ॥८०॥

    समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हा ऐशा आग्रहासी ।
    करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया ? ॥८१॥

    भास्कर कांहीं न बोलला । मौन धरुन राहिला ।
    तेथोन मंडळींनीं केला । ऐशा प्रकारें विचार ॥८२॥

    समर्थासी अग्निरथीं । न बसवा येथून कल्पांतीं ।
    विनाकारण कटकटी होती । तें कांहीं बरें नव्हे ॥८३॥

    हा क्रम कित्येक दिवस । चालला असे शेगांवास ।
    भक्त बैलाच्या गाडीस । बसवूं लागले महाराजा ॥८४॥

    या रीतीं अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी ।
    बापुरावाच्या सदनासी । जाऊनियां उतरले ॥८५॥

    याच वेळीं यवन जातीचा । साधु महताबशा नांवाचा ।
    होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरा सन्निध ॥८६॥

    त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीतीं ।
    जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥८७॥

    अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर ।
    बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥८८॥

    तों ऐशा रीतीं घडून आलें । महातबशा येण्या निघाले ।
    अकोल्यास याया भले । समर्थासी भेटावया ॥८९॥

    अकोल्याचा मनुष्य । मध्यें भेटला रस्त्यास ।
    जो आला होता न्यावयास । महताबशाकारणें ॥९०॥

    तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं ।
    त्या मनुष्यालागुनी । महताबशा श्रोते हो ! ॥९१॥

    तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला ।
    आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महताबशा ॥९२॥

    पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून ।
    कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरी ॥९३॥

    महताबशाच्या संगातें । दोन चार यवन होते ।
    अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥९४॥

    दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महताबशा होता जेथें बसला ।
    महाराज आले तया स्थळा । निजलीलें करुन ॥९५॥

    महताबशाचे धरुन केंस । समर्थांनीं ताडिलें त्यास ।
    त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो ! ॥९६॥

    यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण ।
    यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥९७॥

    या आडदांडपणांनीं । तत्त्वघात होईल जाणी ।
    मृत्युलोकींचे अवघे प्राणी । चिंताग्रस्त होतील ॥९८॥

    तुझें महताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव ।
    दोषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥९९॥

    हा द्वेषरुपी अंधार । वाढत चालला वरचेवर ।
    याची नाहीं तुला खबर । म्हणून तुजला ताडिलें ॥१००॥

    ऐसा मिळतां इशारा । महताबशातें तोषला खरा ।
    साधूच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥१॥

    जेव्हां महताबशा तें ताडिलें । तईं संगतीचे यवन भले ।
    कावरेबावरे होते झाले । तो प्रकार पाहून ॥२॥

    महताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें । आम्हांपासीं ।
    जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥३॥

    शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून ।
    तो द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥४॥

    म्हणे उद्यां दयाघना ! । यावें तुम्हीं भोजना ।
    या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥५॥

    दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवूनी समर्थाप्रत ।
    मोठया थाटांनीं मिरवीत । निज सदना आणिलें ॥६॥

    परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं ।
    तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥७॥

    तसाच तांगा नेला परत । बापुरावाच्या सदनाप्रत ।
    मंडळी पडली घोटाळ्यांत । समर्थें ऐसें कां केलें ? ॥८॥

    काल आमंत्रण घेतलें । आज तांग्याखालीं न उतरले ।
    याचें कारण शोधिते झाले । आपापल्या बुद्धीनें ॥९॥

    त्यांत होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत ।
    मला समजलें इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥११०॥

    महताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरले ।
    भोजनाचें कां न केलें । महताबशाला आमंत्रण ॥११॥

    आतां घेऊन दोघांसी । बसून एका तांग्यासी ।
    म्हणजे ते निश्चयेंसी । उभयतांही येतील ॥१२॥

    तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवीत नेलें ।
    महताबशाला उतरविलें । मंदिराजवळील थेटरांत ॥१३॥

    श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी ।
    परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥१४॥

    अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महताबशा लोकांस म्हणे ।
    मला तुम्ही तिकिट देणें । पंजाबचें काढून ॥१५॥

    तैं शेख कडू बोलला । त्या महताबशा फकिराला ।
    तुम्ही कुरुमच्या मशीदीला । टाकून कैसें जातां हो ? ॥१६॥

    ती मशीद बांधून । पंजाबाशीं जावें आपण ।
    काम अर्धें टाकून । जाणें उचित नसे तुम्हां ॥१७॥

    महताब शेख कडूशीं । बोलता झाला प्रेमेशीं ।
    आग्रह करुं नका मशी । ये वेळीं निरर्थक ॥१८॥

    गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला ।
    आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥१९॥

    समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण ।
    होईल हें माझें वचन । सत्य तुम्ही मानावें ॥१२०॥

    धर्माविषयीं द्वैत । संताठाईं नसतें सत्य ।
    तें अवघ्यां धर्माप्रत । समसमान मानिती ॥२१॥

    खुळें देऊळ मशिदीची । तुम्ही नका वाढवूं साची ।
    ती वाढतां दोघांची । आहे हानि होणार ॥२२॥

    सामान देऊळ मशिदीचें । एकची आहे साचें ।
    आकारानें भिन्नत्व त्याचें । मानून भांडूं नये हो ॥२३॥

    यवन तेवढा खुदाचा । आणि हिंदु काय भूताचा ? ।
    पोक्त विचार करा याचा । मनुष्यपण टिकवावया ॥२४॥

    तरीच होईल कल्याण । हिंदु आणि मुसलमान ।
    हीं एकाच देवापासून । निर्माण असती जाहले ॥२५॥

    धर्म बापा ज्याचा त्यांनीं । प्रिय मानावा प्राणाहूनी ।
    परी विधर्म्यांच्या ठिकाणीं । अलोट प्रेम धरावें ॥२६॥

    हें न झालें जोंवरी । सौख्य लांब तोंवरी ।
    जा मशीद होईल पुरी । गजाननाच्या कृपेनें ॥२७॥

    महताबशा निघून गेले । पुनः न इकडे परत आले ।
    या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनीं ॥२८॥

    पाहा महताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी ।
    परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥२९॥

    शाहालागीं घेतल्या । विना । भोजना न गेला योगीराणा ।
    हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टींचे श्रोते हो ! ॥१३०॥

    असो या बापुरावाची । कांता एक होती साची ।
    तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो ! ॥३१॥

    मळवट यावा घटकेंत । घटकेमाजीं कंठीं तात ।
    घटकेमाजीं वस्त्रांप्रत । अग्नी तो लागावा ॥३२॥

    बिब्याच्या पाठीवर । फुल्या याव्या अपरंपार ।
    कधीं दांडीवरील चीर । जळून जावें अकस्मात ॥३३॥

    या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी ।
    क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥३४॥

    भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला ।
    आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥३५॥

    खर्चहि झाला अतोनात । गुण न आला किंचित ।
    अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजाननस्वामीला ॥३६॥

    महाराज माझ्या कुटुंबाला । भानामतीचा त्रास झाला ।
    केले नाना उपायाला । आतां मात्र कंटाळलों ॥३७॥

    तुझीं पाउलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा ! ।
    तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा ? ॥३८॥

    ज्या दरींत पंचानन । बसला आहे येऊन ।
    तेथेंच कां ओरडून । दिमाख दाखवावा कोल्ह्यांनीं ॥३९॥

    जेथें कस्तुरी दरवळली । तेथेंच कां हो रहावी भली ।
    गुरुराया ही ओंगळी । घाण भानामतीची ॥१४०॥

    ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन ।
    केलें निजकृपें करुन । बापुराव कांतेला ॥४१॥

    त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची ।
    नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥४२॥

    असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत ।
    नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥४३॥

    त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी ।
    जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजाननमहाराज ॥४४॥

    पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले ।
    आंतील जलालागीं भले । वरच्यावरी श्रोते हो ॥४५॥

    पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्तीं ।
    नरसिंग महाराज विचारती । अरे हें काय करतोस ! ॥४६॥

    गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती ।
    आणखी तीर्थें आहेत किती । हें पाहातों डोकावून ॥४७॥

    तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण ! ।
    या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥४८॥

    त्यांनीं स्नान घातल्याविना । मी न येथून हले जाणा ।
    ऐशा ऐकून भाषणा । कैक म्हणाले या रीतीं ॥४९॥

    खरोखरी हा आहे पिसा । शेगांव नादीं लागला कैसा ! ।
    जरा थांबा येथेंच बसा । काय करी हा पाहुं पुढें ॥१५०॥

    तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित ।
    श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥५१॥

    हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरी ।
    वर्षूं लागले पहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥५२॥

    लोकां म्हणती गजानन । या रे स्नानालागून ।
    नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥५३॥

    गंगा यमुना गोदावरी । वरता आली आहे खरी ।
    स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥५४॥

    भाविकांनीं केलें स्नान । निंदकांनीं खालीं मान ।
    घातली तो पाहून । प्रकार त्या पाण्याचा ॥५५॥

    संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी।
    त्यांच्या वाणीलागुनी। असत्यता न दे परमात्मा ॥५६॥

    स्नान होतां समर्थ उठले । पाणी पहिल्यापरि झालें ।
    विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥५७॥

    नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन ।
    शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥५८॥

    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    तारक होवो भवाब्धींत । भाविक भक्तांकारणें ॥१५९॥

    शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 18

    अध्याय १८

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा ।
    हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥

    हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना ।
    हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥

    काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी ।
    तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥

    भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी ।
    ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्णन बहुसाळ ॥४॥

    म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा ।
    सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥

    अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं ।
    तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥६॥

    हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य ।
    शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥७॥

    बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी ।
    ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥

    बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत ।
    घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥९॥

    परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला ।
    तेणें जनकजननीला । शिक झाला अनावर ॥१०॥

    बायजेकडे पाहून । जननी करी रोदन ।
    माझ्या बाईचें तारूण्य । वांझ पाहूं राहातें ॥११॥

    भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी ।
    दुसरा नवरा करून इसी । देणें आहे भाग पाहा ॥१२॥

    शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर ।
    हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥१३॥

    कांहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं ।
    बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥१४॥

    नपुसकत्व अधोपरी । आलें असेल त्याला जरी ।
    तें औषधानें होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥१५॥

    ऐसें उभयतां बोलून । बायजासी तेथें ठेवून ।
    आले मुंडगांवाकारण । आपुल्या घरातें ॥१६॥

    बायजीचें वय पंधरासोळा । वर्ण काळासावळा ।
    तारुण्यानें मुसमुसला । होता जिचा शरीरभाग ॥१७॥

    डोळे नाक पाणीदार । बांधा उंच मनोहर ।
    जिला पाहातां अंतर । कामुकाचें मोहित होई ॥१८॥

    तिच्या थोरल्या दिरासी । पाहूनियां बायजासी ।
    इच्छा जाहली मानसीं । संभोग तिचा करावया ॥१९॥

    त्यानें प्रयत्न केले नाना । वळवावया तिच्या मना ।
    म्हणूं लागला क्षणक्षणा । ऐसें बायजाकारणें ॥२०॥

    हताश ऐशी मुळीं न होई । मीच तुला पतीचे ठायीं ।
    आमरण करीन पाही । तुझें वेडे संगोपन ॥२१॥

    झुरणें दे हें सोडून । आनंदित ठेवी मन ।
    वेडे आजपासून । मीच नवरा समज तुला ॥२२॥

    ऐसें त्यानें सांगावें । चाळे नाना करावें ।
    कांहीं आमिष दावावें । चित्त तिचें भुलवाया ॥२३॥

    परी उपयोग होईना । बायजीच्या न हें येई मना ।
    ती म्हणे हे नारायणा ! । कां रे दैन्य मांडलेंस ? ॥२४॥

    बाळपणापासून । ध्याइले मीं तुझे चरण ।
    त्याचेंच कां हें मजलागून । फल दृष्टीं पडावें ? ॥२५॥

    जयाचा मीं हात धरिला । तो ना पुरुष कळून आला ।
    दैवयोग समजून चुकला । संसार नशिबीं नाहीं मम ॥२६॥

    बरें झालें तुझ्याठायीं । चित्त आतां रमेल पाही ।
    कृपा करीरे शेषशायी । स्पर्श पुरुषाचा न होवो मला ॥२७॥

    ज्येष्ठ दीर एके दिवसीं । येता झाला बायजापासीं ।
    आपला हेतु कळविण्यासी । रात्रीचिया समयाला ॥२८॥

    तों बायजानें इनकार । करून केलें उत्तर ।
    कैसी लाज तिळभर । नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥२९॥

    तूं माझा ज्येष्ठ दीर । पित्यापरीस साचार ।
    सोडा हा अविचार । स्वैर ऐसा होऊं नको ॥३०॥

    ह्या तियेच्या भाषणा । तो ना आणी मुळीं मना ।
    होतां कामाची वासना । नीति विलया जातसे ॥३१॥

    अंगावरी टाकण्या हात । जों तो पाही इतक्यांत ।
    तयाचा तो थोरला सुत । माडीवरून पडला हो ॥३२॥

    खोक पडली डोक्यासी । बायजेनें धरिलें त्यासी ।
    बसवून आपुल्या मांडीसी । औषध लावूं लागली हो ॥३३॥

    बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा । या गोष्टीचा विचार करा ।
    अभिलाष तो नाहीं बरा । परस्त्रियेचा केव्हांही ॥३४॥

    मुलगा पडलेला पाहून । भय पावलें त्याचें मन ।
    अनुताप त्यासी झाला पूर्ण । केलेलिया कर्माचा ॥३५॥

    त्यानें नाद सोडिला । सदनीं निवांत राहिला ।
    पुढें शिवराम घेऊन गेला । कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥३६॥

    भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी ।
    महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥३७॥

    तें मानेलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी ।
    महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥३८॥

    बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर ।
    कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥३९॥

    तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले ।
    अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥४०॥

    जेवढे पुरुष जगतांत । तेवढे असती हिचे तात ।
    उगे न पडा फंदांत । लग्न हिचें करण्याच्या ॥४१॥

    तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला ।
    घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवीं ॥४२॥

    परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं ।
    निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥४३॥

    समर्थांचा एक भक्त । पुंडलिक नामें मुंडगांवांत ।
    त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥४४॥

    पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला ।
    शेगांवांस जाण्याला । पुंडलिकाचे बरोबर ॥४५॥

    त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिले ।
    तेच तिच्या करतील भले । निजकृपेनें कल्याणा ॥४६॥

    पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी ।
    ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥४७॥

    पुंडलिकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी ।
    तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥४८॥

    हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें ।
    तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥४९॥

    बायजा आहे तरणीज्वान । पुंडलिकासीही तारुण्य ।
    यांची वारी विषयभान । हीच आहे निःसंशय ॥५०॥

    परस्परें प्रीति जडली । विषयसुखाची नवाळी ।
    भोगण्या ही युक्ति केली । वाटते या उभयतांनीं ॥५१॥

    पुंडलिक जरी माळी असता । तरी हा संबंध योग्य होता ।
    बायजाच्या धरण्या हाता । कां कीं तरुण दोघेही ॥५२॥

    पुंडलिक आहे मराठी । ही माळ्याच्या आली पोटीं ।
    म्हणून यांची ताटातुटी । केलीच पाहिजे जातीस्तव ॥५३॥

    या दोघांचें अंतर । शुध्द होतें साचार ।
    नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥५४॥

    भुलाई म्हणे बायजासी । तूं कां कारटे अहर्निशीं ।
    पुंडालिकाच्या घरा जासी । हें कांहीं कळेना ॥५५॥

    ऐशा तरुण वयांत । तुम्हां कशाचा परमार्थ ? ।
    कोल्हा न राही उपोषित । उंसाचिया फडामधीं ॥५६॥

    वा पाहून बाटुकाला । बैल नाहीं पुढें गेला ।
    कारटे आमुच्या नांवाला । काळें उगें लावूं नको ॥५७॥

    भुलाई म्हणे नवर्‍यासी । हिला नका ठेवूं ऐसी ।
    लावून द्यावे मोहतरासी । पाहा पोरगा माळ्याचा ॥५८॥

    ही पुंडलिकाच्या घरीं जाते । सदा त्यासी हितगुज करिते ।
    एकमेकां पाहून भरतें । येत दोघां प्रेमाचें ॥५९॥

    जाऊं चला शेगांवास । घेऊन या कारटीस ।
    सांगूं अवघे महाराजास । चाळे या बायजीचे ॥६०॥

    संतासी अवघें कळतें । ते सन्न्तीचे चाहाते ।
    पोटामाजीं कधीं न निघते । चंदनाच्या दुर्गंधी ॥६१॥

    भुला-शिवराम-बायजाबाई । पुंडलीक भोकर्‍या आला तोही ।
    चौघे येऊन लागले पाई । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥६२॥

    पुंडलिकासी पाहून । बोलूं लागले दयाघन ।
    कीं बायजा तुझी बहीण । पूर्व जन्मींची पुंडलिका ॥६३॥

    लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावें इजप्रती ।
    दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥६४॥

    भुले आपुल्या पोरीस । लावूं नको भलता दोष ।
    हीं बहीण-भाऊ आहेत । मुळींच पूर्वजन्मींचें ॥६५॥

    शिवाय या बायजीला । कोठेंहि न नवरा भला ।
    ही न आली करायाला । संसार मुळीं जगामध्यें ॥६६॥

    ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मवरी ।
    जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतीं राहिली गे ॥६७॥

    तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला ।
    माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥६८॥

    ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून ।
    गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥६९॥

    घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला ।
    पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥७०॥

    महाराज आपुल्या भक्ताप्रत । सदैव रक्षण करितात ।
    ते कसे, ही थोडक्यांत । गोष्ट सांगतों ये ठाई ॥७१॥

    भाऊ राजाराम कवर । एक होता डाँक्टर ।
    पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥७२॥

    त्यास दुर्धर फोड झाला । आणविला मोठ्या डाँक्टराला ।
    औषधपाणी करायाला । खामगांवामाझारीं ॥७३॥

    बुलढाणा अकोला उमरावती । येथून डाँक्टर आणिले असती ।
    शस्त्रक्रिया करण्याप्रती । त्या भाऊच्या फोडाला ॥७४॥

    नाना औषधें पोटांत दिलीं । विविध पोटीसें बांधिलीं ।
    शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥७५॥

    कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढुं लागला ।
    वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥७६॥

    भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी ।
    शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥७७॥

    आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय ।
    याविणें दुसरी सोय । कांहीं नसे राहिली ॥७८॥

    पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ ।
    या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नका ॥७९॥

    ऐशी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं ।
    रात्र गेली उलटोनी । सुमारें समय एकाचा ॥८०॥

    तमानें भरलें अंबर । रात्रीचा तो शब्द किर्र ।
    कोल्हे-हुकेनें कांतार । दणाणून गेलें हो ॥८१॥

    तो एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली ।
    गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्‍या बैलांची ॥८२॥

    कंठामाजीं घागरमाळा । वाजूं लागल्या खळखळा ।
    मागें पुढें सोडिला । होतां पडदा दमणीस ॥८३॥

    दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी ।
    डाँक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥८४॥

    तों एक उतरला । ब्राह्मण दमणीला खालीं भला ।
    दार ठोठावूं लागला । डाँक्टराच्या बंगल्याचें ॥८५॥

    डाँक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं ।
    प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥८६॥

    ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान ।
    तीर्थअंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥८७॥

    डाँक्टर भाऊ कवराला । जो का आहे फोड झाला ।
    हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥८८॥

    प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत ।
    मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥८९॥

    तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण ।
    त्या शोधाया कारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥९०॥

    परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला ।
    भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥९१॥

    फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा ।
    येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥९२॥

    एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार ।
    पाहा किती आहे जोर । समर्थाच्या अंगार्‍याचा ? ॥९३॥

    भाऊस निद्रा लागली । व्याधीं पुढें बरी झाली ।
    हळूहळू शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥९४॥

    दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास ।
    माझ्या गाडीबैलास । नुसता न चारा दिलास तूं ॥९५॥

    हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून ।
    हृदय आलें उचंबळून । त्या भाऊ कवराचें ॥९६॥

    त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन ।
    लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥९७॥

    कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण ।
    अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥९८॥

    असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं ।
    त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥९९॥

    होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार ।
    स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥१००॥

    जगू आबा पाटील हरी । बापुना व मंडाळी दुसरी ।
    सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥१॥

    त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार ।
    येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्त झालासे ॥२॥

    झरे जिवंत पाण्याचे । आसपास त्या माळाचे ।
    आहेत म्हणून गांवाचें । नांव पडलें नागझरी ॥३॥

    हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादाजी पाटलाचा ।
    प्रथम आशीर्वाद झाला साचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥४॥

    म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे ।
    रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५॥

    या परिपाठे म्हणून । नागझरीसी येऊन ।
    अग्निरथांत बैसून । निघते झाले पंढरीला ॥६॥

    हरीपाटला बरोबरी । समर्थाची होती स्वारी ।
    बापुना आणि दुसरीं । माणसें पांचपन्नास ॥७॥

    आषाढ शुध्द नवमीचा । तो दिवस होता साचा ।
    समुदाय वारकर्‍यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥८॥

    मेघ दाटले अंबरीं । क्वचित् कोठें भूमीवरी ।
    पर्जन्याची वृष्टी खरी । होऊं लागली श्रोते हो ! ॥९॥

    तें भुवैकुंठ पंढरपुर । गजबजून गेलें फार ।
    भरतीं येतां सागर । जेवीं जाय उचंबळोनी ॥११०॥

    प्रदक्षणेच्या रस्त्यावरी । टाळांची ती गर्दी खरी ।
    ' जय जय रामकृष्ण हरी ' । भक्त म्हणती उच्च स्वरें ॥११॥

    शब्द कवणाचा कवणाला । न ये ऐकावयाला ।
    ऐसा आनंदी आनंद चालला । तो वानूं कोठवर ॥१२॥

    नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार ।
    श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥१३॥

    या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा ।
    भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥१४॥

    त्यायोगें आकाशांत । बुक्क्याचें जणूं झालें छत ।
    सुवास उठला घमघमीत । गर्दी तुळशीफुलांची ॥१५॥

    श्रोते त्या समयाला । सम आले पंढरीला ।
    उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥१६॥

    हा प्रदक्षणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं ।
    दर्शनाला भीड खरी । झाली असे राउळांत ॥१७॥

    पोलिस हाताहातावरी । उभे राहिले रस्त्यांतरीं ।
    पथें चालले वारकरी । भजन करीत हरीचें ॥१८॥

    एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर ।
    बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥१९॥

    बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला ।
    म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥१२०॥

    स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी ।
    दर्शनासी गेली सारी । आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥२१॥

    मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत ।
    राउळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥२२॥

    मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना ।
    केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥२३॥

    बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी ।
    कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥२४॥

    तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून ।
    तेवीं येई राउळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥२५॥

    ' अरण ' होते आठ कोस । तैसें नव्हें येथें खास ।
    मी मंदिराच्या सान्निध्यास । उभा आहे वाटेवरी ॥२६॥

    तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ ।
    मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥२७॥

    ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला ।
    परत बिर्‍हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥२८॥

    मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसांचें उपोषण ।
    बापुनाचें अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥२९॥

    शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी ।
    फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥१३०॥

    बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघेजण ।
    हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥३१॥

    शेगांवाहून दर्शना । पंढरीसी आला जाणा ।
    येथें येऊन खेळ नाना । फिरला पाहात गांवामध्यें ॥३२॥

    याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? ।
    ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥३३॥

    कोणी म्हणाले बापुनाला । वेदान्त आहे अवघा आला ।
    तो कशाशीं दर्शनाला । जाईल सांगा राउळांत ॥३४॥

    त्याचा भगवंत हृदयांत । आहे सर्वदा खेळत ।
    वेदान्त्याचें ऐसें मत । दगडामाजीं काय आहे ? ॥३५॥

    आपण वेडे म्हणून । घ्याया गेलों दर्शन ।
    बापुनाचा नारायण । वाटेल तेथें उभा असे ॥३६॥

    मग दुसरा म्हणाला । मग हा येथें कशास आला ? ।
    कां शेगांवीं तयाला । भेटला नसता ईश्वर ? ॥३७॥

    अहो हे वेदान्ती । लोकां ज्ञान सांगती ।
    शब्द चावटी हमेश करिती । अनुभवाचा लेश नसे ॥३८॥

    सगुणोपासना झाल्या पूर्ण । मग होणार आहे ज्ञान ।
    न आल्यासी लहानपण । तरुणपणा येतो कसा ? ॥३९॥

    ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा ।
    अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कुठूनी ? ॥१४०॥

    तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत ।
    ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥४१॥

    गरीबाचें सांकडें । साधूलाच एक पडे ।
    सत्संगती ज्याला घडे । तेच खरे भाग्यवान ॥४२॥

    समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना ।
    ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥४३॥

    तों महाराज उभे राहिलें । कटीं हात ठेविलें ।
    पाय खालीं जुळविलें । समचरण दावावया ॥४४॥

    तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी ।
    बापुनाच्या पडली दृष्टी । शीर ठेविलें पायांवर ॥४५॥

    पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी ।
    तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥४६॥

    धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला ।
    तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राउळांत ॥४७॥

    इतर म्हणाले महाराजांस । तसेंच दर्शन आम्हांस ।
    होऊं द्या आम्हां आहे आस । पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥४८॥

    ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।
    बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥

    तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।
    ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥

    म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।
    निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥

    पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला ।
    कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥५२॥

    संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात ।
    गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥५३॥

    काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी ।
    बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥५४॥

    याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण ।
    रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥५५॥

    पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें ।
    म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥५६॥

    कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा ।
    तो वर्‍हाडप्रांतीचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥५७॥

    तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी ।
    त्या पंढरपुरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥५८॥

    प्रेतामागें चाले प्रेत । पोलिस शिरती घरांत ।
    यात्रा काढून देण्याप्रत । डाँक्टराच्या हुकुमानें ॥५९॥

    वारकर्‍याला ओढिती । गाडीमाजीं बसविती ।
    चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥१६०॥

    हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी ।
    ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥६१॥

    गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी ।
    कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥६२॥

    पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत ।
    शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥६३॥

    वाडा घटकेंत मोकळा झाला । हा वारकरी मात्र होता पडला ।
    कठीण काळच्या समयाला । कोणी न येती उपयोगी ! ॥६४॥

    लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती ।
    तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥६५॥

    तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर ।
    म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥६६॥

    लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया ।
    याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥६७॥

    पन्नास माणूस बरोबर । आपल्या येधवां साचार ।
    मरीचा तो झाला जोर । सांप्रत या पंढरीसी ॥६८॥

    अशा स्थितींत ये ठाई । थांबणें हें कांहीं बरें नाहीं ।
    चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥६९॥

    तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? ।
    आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥१७०॥

    ऐसें वाटून जवल गेले । वारकर्‍याला करा धरलें ।
    त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥७१॥

    चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्‍हाडप्रांता ।
    वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्‍हाड कशाचें हो ? ॥७२॥

    समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त ।
    तई म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥७३॥

    तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर ।
    त्या वारकर्‍याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥७४॥

    वाटूं लागली थोडी शक्ति । उभा राहिला त्वरित गती ।
    संतानें ज्या धरिलें हातीं । त्यातें निजमनें यम नेई कसा ? ॥७५॥

    घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळीच्या बरोबरी ।
    चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थासमवेत ॥७६॥

    आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी ।
    म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥७७॥

    ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार ।
    आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥७८॥

    पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी ।
    मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामीच्या ॥७९॥

    एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन ।
    त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१८०॥

    तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती ।
    म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥८१॥

    सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती ।
    खट्टू झाला परम चित्तीं । समर्थासी पाहातां ॥८२॥

    व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत ।
    हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥८३॥

    सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें ।
    अशा पिशाला म्हणूं लागले । साधू लोक हाय हाय ॥८४॥

    तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत ।
    पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥८५॥

    त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न ।
    आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥८६॥

    याला न कोणी उचलीती । गांजा सदैव धुनकिती ।
    या वेड्यातें वंदिताती । " महाराज, महाराज, " म्हणून ॥८७॥

    जळो याचें साधुपण । मला बुध्दि कोठून ।
    झाली याचें दर्शन । घ्याया कांहीं कळेना ॥८८॥

    त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनियां ।
    येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥८९॥

    आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित ।
    कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥१९०॥

    तें ऐकून रागावला । निज समर्था बोलूं लागला ।
    अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥९१॥

    कुत्रें मरून झाला प्रहर । त्याचें प्रेत रस्त्यावर ।
    पडलें याचा विचार । तुम्हीं न कोणी केला कीं ॥९२॥

    ऐसें बोलतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला ।
    आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥९३॥

    परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर ।
    घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥९४॥

    ऐसें बोलून कुत्र्यापासीं । येते झाले पुण्यराशी ।
    स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥९५॥

    तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर ।
    म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥९६॥

    मी व्यर्थ निंदा केली । योग्यता ना जाणली ।
    ऐसें म्हणून घातली । समर्थाच्या मिठी पायां ॥९७॥

    माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा ।
    वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥९८॥

    तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमीवर ।
    करण्या जगाचा उध्दार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥९९॥

    श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली ।
    कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥२००॥

    प्रसाद घेऊन गेला परत । आपुल्या तो देशाप्रत ।
    समर्थ साक्षात् भगवंत । ऐसी प्रचीति आली तय ॥१॥

    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    भाविकां लाभो सत्पथ । हेंचि इच्छी दासगणू ॥२०२॥

    शुभं भवतु ॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 19

    अध्याय १९

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा ।
    माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥

    हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।
    माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥

    खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता ।
    याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥

    मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।
    हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥

    महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ ।
    जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥

    तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां ।
    मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥

    माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्‍ताचीं लक्षणें ।
    लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥

    माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण ।
    आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥

    तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली ।
    काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥

    जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।
    या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥१०॥

    म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं ।
    तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें ? ॥११॥

    त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना ।
    निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥१२॥

    तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही ।
    तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥

    तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर ।
    मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥१४॥

    तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला ।
    त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥१५॥

    असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी ।
    गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१६॥

    ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी ।
    त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥१७॥

    स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला ।
    परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥१८॥

    गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।
    रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥१९॥

    असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा ।
    वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥२०॥

    त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्‌गुरुनाथ ।
    जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥२१॥

    बुटीचा ऐसा विचार । या सिताबर्डीवर ।
    महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥२२॥

    अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला ।
    तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥२३॥

    शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित ।
    विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥२४॥

    कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून ? ।
    तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥२५॥

    तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार ।
    बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥२६॥

    टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची ।
    येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥२७॥

    जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला ।
    जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥२८॥

    तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें ।
    आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥२९॥

    इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत ।
    जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥

    महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी ।
    या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥३१॥

    तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना ।
    अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥३२॥

    बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी ।
    श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥३३॥

    रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन ।
    परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥

    जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना ।
    बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥३५॥

    शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले ।
    परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥३६॥

    इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी ।
    घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥३७॥

    बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत ।
    त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥३८॥

    अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं ।
    तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥३९॥

    तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार ।
    तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥४०॥

    तुझ्या धनाच्या जोरावरी । उड्या या जाण निर्धारी ।
    तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥४१॥

    हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला ।
    परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥४२॥

    गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी ।
    पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥

    ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास ।
    होत्या पातळ पदार्थांस । वाट्या जवळ चांदीच्या ॥४४॥

    नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें ।
    मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥४५॥

    ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती ? ।
    ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥४६॥

    असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत ।
    तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥४७॥

    वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून ।
    तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥४८॥

    चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी ।
    तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥४९॥

    समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें ।
    अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥५०॥

    विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया ।
    दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥५१॥

    तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी ।
    तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥५२॥

    येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज ।
    पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥५३॥

    आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी ।
    आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥

    भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ ।
    शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥५५॥

    भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी ।
    दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाड्यांत ॥५६॥

    कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें ।
    परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥५७॥

    तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं ।
    माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥५८॥

    तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें ।
    ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥५९॥

    आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला ।
    अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे ! तूं ॥६०॥

    ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन ।
    त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥६१॥

    हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी ।
    ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥६२॥

    त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें ।
    शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥६३॥

    उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।
    त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥६४॥

    तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून ।
    शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥६५॥

    धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत ।
    होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥६६॥

    अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं ।
    त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥६७॥

    श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति ।
    कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥६८॥

    ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।
    बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥

    अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।
    मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥

    तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।
    चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥

    चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी।
    जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥

    तो कर्‍हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न ।
    हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥

    ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।
    तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥

    एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।
    हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥

    एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।
    एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥

    एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती ।
    एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥

    स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।
    आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥

    स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली ।
    तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥

    फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।
    स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥

    बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां ।
    संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥८१॥

    त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून ।
    ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥८२॥

    ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला ।
    बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥८३॥

    ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे ।
    हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥८४॥

    स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण ।
    तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥८५॥

    सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान ।
    या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥८६॥

    हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं ।
    तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥८७॥

    अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां ।
    म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥८८॥

    येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी ।
    परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥८९॥

    आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें ।
    भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥९०॥

    मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही ।
    त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा ! रे ॥९१॥

    दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां ।
    श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥९२॥

    मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून ।
    ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥९३॥

    या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी ।
    भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥९४॥

    परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण ।
    जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥९५॥

    आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा ।
    या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥९६॥

    परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं ।
    योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥९७॥

    जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत ।
    त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥९८॥

    आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख ।
    धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥९९॥

    कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा ।
    आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥१००॥

    या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें ।
    परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥१॥

    जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण ।
    म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥२॥

    काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर ।
    हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३॥

    आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक ।
    शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥४॥

    तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची ।
    बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥५॥

    मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार ।
    जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥६॥

    पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला ।
    अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥

    या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।
    मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥

    वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी ।
    हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥

    व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।
    उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥

    श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर ।
    हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥

    जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।
    तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥

    तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।
    कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥

    नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।
    ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥

    नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार ।
    दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥

    शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।
    सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥

    तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत ।
    मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥

    पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।
    जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥

    खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई ।
    गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥

    पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।
    आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥

    मुर्‍हा गांवचें संतरत्‍न । झिंगाजी तो होय जाण ।
    तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥

    या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।
    परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥

    मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।
    जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥

    आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी ।
    कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥२४॥

    जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल ।
    आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥२५॥

    आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही ।
    निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥

    ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल ।
    त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥२७॥

    ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला ।
    उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥२८॥

    कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत ।
    तरीच भेटे जगन्नाथ । जगद्‌गुरु जगदात्मा ॥२९॥

    ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला ।
    प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥१३०॥

    अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले ।
    वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥३१॥

    मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर ।
    वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥३२॥

    साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची ।
    ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥३३॥

    तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी ।
    डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥३४॥

    जे येतील तयांना । साळु घाल भोजना ।
    येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥३५॥

    ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत ।
    जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥३६॥

    प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला ।
    तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥३७॥

    खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं ।
    त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥३८॥

    पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा ।
    होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥३९॥

    या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी ।
    तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥१४०॥

    प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न ।
    गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥४१॥

    श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी ।
    शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥४२॥

    चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? ।
    बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥४३॥

    आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी ।
    विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥४४॥

    स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी ।
    हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥

    तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता ।
    आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥४६॥

    त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती ।
    आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥४७॥

    ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान ।
    न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्‍याची ॥४८॥

    शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी ।
    मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥४९॥

    प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून ।
    चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥१५०॥

    समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत ।
    पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुच्या समाधीची ॥५१॥

    मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली ।
    शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥

    इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।
    येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥५३॥

    भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला ।
    तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥५४॥

    स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर ।
    निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥५५॥

    ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण ।
    ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥५६॥

    मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा ।
    तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥५७॥

    श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत ।
    पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥५८॥

    तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं ।
    गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥५९॥

    उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर ।
    खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांड्याच्या ॥६०॥

    राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला ।
    ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥६१॥

    हा पांड्या मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त ।
    म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥६२॥

    क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी ।
    अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥६३॥

    ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन ।
    महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥६४॥

    तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां ।
    म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥६५॥

    पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी ।
    विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥

    तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर ।
    रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥६७॥

    आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची ।
    पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥६८॥

    ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर ।
    नफातोट्याची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥६९॥

    तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता ।
    म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांड्याकारणें ॥१७०॥

    कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची ।
    उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥७१॥

    ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण ।
    तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥७२॥

    महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी ।
    दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥

    ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली ।
    खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥७४॥

    मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार ।
    वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥७५॥

    दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें ।
    उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥७६॥

    ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला ।
    दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥७७॥

    महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी ।
    बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥७८॥

    मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन ।
    तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥

    तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां ।
    झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१८०॥

    मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला ।
    गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥८१॥

    म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले ।
    रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥८२॥

    ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी ।
    मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥८३॥

    आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार ।
    लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥८४॥

    आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई ! ।
    सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥८५॥

    खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला ।
    तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥८६॥

    ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून ।
    लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥८७॥

    मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें ।
    खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥८८॥

    ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर ।
    आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥८९॥

    ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती ।
    आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१९०॥

    छे ! छे ! वेड्या ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस ।
    नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥९१॥

    तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी ।
    दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥९२॥

    रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत ।
    आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥९३॥

    तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला ।
    उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥९४॥

    ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें ।
    पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥९५॥

    गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं ।
    तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥९६॥

    शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी ।
    असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥९७॥

    तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची ।
    त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥९८॥

    मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर ।
    त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥९९॥

    तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां ।
    त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥२००॥

    नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।
    समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१॥

    तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत ।
    साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥२॥

    ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला ।
    लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥३॥

    हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ ।
    ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥४॥

    वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी ।
    परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥५॥

    ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून ।
    आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥६॥

    तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर ।
    उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥७॥

    कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी ।
    वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥८॥

    या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत ।
    आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥९॥

    तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें ।
    अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥२१०॥

    हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।
    कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥

    हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ ।
    तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥

    ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे ।
    तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥१३॥

    तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले ।
    त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥१४॥

    एका पंधरवड्यांत । हवालदाराचे अवघे आप्त ।
    होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१५॥

    म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी ।
    वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥१६॥

    नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर ।
    गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥१७॥

    अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा ।
    तेथील हरी जाखड्याचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥१८॥

    हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण ।
    गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१९॥

    तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी ।
    बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥२२०॥

    तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन ।
    कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥२१॥

    तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी ।
    येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥२२॥

    कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार।
    निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥२३॥

    आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें ।
    ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥२४॥

    संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण ।
    मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥२५॥

    हे स्वामी गजानना ! । सच्चिदानंदा दयाघना ! ।
    संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥२६॥

    ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी ।
    प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥

    ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त ।
    थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥२८॥

    या हरी जाखड्यानें । बावंच्या मागला मजकारणें ।
    म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥२९॥

    संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया ।
    यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥२३०॥

    पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।
    सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥

    ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखड्यासी पाहिलें ।
    जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥३२॥

    तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून ।
    होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥३३॥

    जा आतां परत घरा । सुखें करी संसारा ।
    करीत असावा परमेश्वर । आठव वेड्या ! विसरुं नको ॥३४॥

    ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन ।
    दिलें हरी जाखड्याकारण । लग्न स्वतःचें करावया ॥३५॥

    हरी जाखड्या संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं ।
    महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥३६॥

    ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार ।
    रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥

    बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर ।
    तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥

    हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत ।
    इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥

    वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती ।
    हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥

    फलभारें तरुवर । वांकले असती अपार ।
    वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥

    असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी ।
    एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥

    तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास ।
    लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥

    असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी ।
    योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥

    तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन ।
    गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥

    नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र ।
    तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥

    काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां ।
    कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥

    तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी ।
    ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥

    उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त ।
    त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥

    बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी ।
    अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥

    पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर ।
    कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥

    तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां ।
    ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥

    तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी ।
    हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥

    षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर ।
    त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥

    मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत ।
    योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥

    गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! ।
    सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥

    नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून ।
    येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥

    जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला ।
    ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥

    तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी ।
    तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥

    त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार ।
    शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥

    महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ।
    आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥

    महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण ।
    तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥

    नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती ।
    तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥

    म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! ।
    मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥

    धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत ।
    पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥

    ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले ।
    भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥

    कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं ।
    तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥

    मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण ।
    कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥

    तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला ।
    तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥६९॥

    हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची ।
    सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥२७०॥

    जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी ।
    करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥७१॥

    योगाभ्यास ही समोरी । त्या खेड्याच्या आदरें करी ।
    त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥

    तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत ।
    आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥७३॥

    एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं ।
    त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥७४॥

    म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला ।
    जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥७५॥

    तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण ।
    मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥७६॥

    दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली ।
    आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥

    तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण ।
    औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥७८॥

    नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली ।
    धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥

    ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण ।
    नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥

    तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया ।
    अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥८१॥

    ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं ।
    हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥८२॥

    व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार ।
    आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥८३॥

    तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं ।
    बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥८४॥

    हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत ।
    शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥८५॥

    असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी ।
    घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥८६॥

    जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा ।
    जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥८७॥

    जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती ।
    जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥८८॥

    पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान ।
    गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥८९॥

    हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था ।
    हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥२९०॥

    तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर ।
    जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥९१॥

    आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें ।
    पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥९२॥

    देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी ।
    अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥९३॥

    ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी ।
    अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥९४॥

    हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता ।
    अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥९५॥

    किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा ।
    म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥९६॥

    महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर ।
    सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥९७॥

    तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं ।
    इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥९८॥

    चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला ।
    तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥९९॥

    पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें ।
    चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥

    तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस ।
    संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥१॥

    पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला ।
    पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥

    गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी ।
    आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥३॥

    कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित ।
    चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥४॥

    त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण ।
    दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥५॥

    तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला ।
    या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥६॥

    दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित ।
    तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥७॥

    हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी।
    ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥८॥

    जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले ।
    शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥९॥

    चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास ।
    बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥३१०॥

    मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका ।
    कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥११॥

    ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण ।
    दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥१२॥

    शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।
    भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥

    प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला ।
    सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥

    देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन ।
    स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥

    पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ ।
    ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥

    गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।
    गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥

    गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा ।
    विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्‍यानें ॥१८॥

    अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? ।
    कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥

    मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल ।
    ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥३२०॥

    श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी ।
    विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥२१॥

    आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस ।
    हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२॥

    आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती ।
    अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥२३॥

    ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल ।
    नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२४॥

    गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे।
    ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥२५॥

    त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी ।
    तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥

    त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया ।
    पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥२७॥

    लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं ।
    जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥

    तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता ।
    एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२९॥

    निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित ।
    आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥३३०॥

    तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें ।
    भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥

    दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत ।
    आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥३२॥

    तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला ।
    लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥३३॥

    रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार ।
    सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥३४॥

    रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी ।
    दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥३५॥

    मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात ।
    रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥३६॥

    वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार ।
    होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥३७॥

    तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले ।
    फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥३८॥

    बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती ।
    कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥३९॥

    ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर ।
    उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥४०॥

    समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी ।
    रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥४१॥

    पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर ।
    भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥४२॥

    जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा ।
    अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥४३॥

    ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी ।
    उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥४४॥

    अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण ।
    ’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥४५॥

    मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार ।
    शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥४६॥

    दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ ।
    घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥४७॥

    खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा ।
    सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥४८॥

    स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ ।
    भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥३४९॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥
     

    gajanan vijay granth adhyay 20

    अध्याय २०

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
    देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥

    तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं ।
    मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥

    माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून ।
    राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥

    यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष ।
    खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥

    म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा ।
    पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥

    असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर ।
    म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥

    शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती ।
    आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥

    समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर ।
    कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥

    आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? ।
    देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥

    ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती ।
    महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥

    जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ।
    ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥

    तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ ।
    ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥

    ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां ।
    गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥

    हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा ।
    नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥

    अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी ।
    बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥

    एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस ।
    उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥

    केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी ।
    शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥

    तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां ।
    हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥

    उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी ।
    कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥

    हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें ।
    दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥

    फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती ।
    गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥

    हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण ।
    तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥

    तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी ।
    उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥

    त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें ।
    प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥

    यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर ।
    येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥

    अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य ।
    त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥२६॥

    पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी ।
    म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥

    ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस ।
    तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥

    आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार ।
    सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥

    मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची ।
    तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥

    असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें ।
    त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥

    या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची ।
    जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥

    लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां ।
    बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥

    कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत ।
    हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥

    घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या घेतला मनें ।
    कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥

    असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं ।
    तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥

    आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा ।
    ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥

    तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य ।
    ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥

    तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी ।
    चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥

    गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर ।
    यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥

    पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी ।
    तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग तें ॥४१॥

    पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? ।
    अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥

    उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास ।
    हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥

    खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण ।
    म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥

    लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला ।
    तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥

    मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी ।
    प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥

    अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी ।
    भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥

    एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी ।
    आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥

    हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर ।
    त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥

    दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली ।
    अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥

    आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन ।
    ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥

    जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी ।
    रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥

    तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून ।
    आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥

    मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें ।
    पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥

    जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार ।
    जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥

    शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी ।
    जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥

    दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात ।
    जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥

    झंझावात बळावला । कडकडाट करी चपला ।
    मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥

    मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा ।
    शेतकर्‍यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥

    शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण ।
    तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥

    तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं ।
    बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥

    हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां ।
    अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥

    कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।
    त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥

    तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन ।
    करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥

    दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन ।
    मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥

    तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर ।
    तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥

    जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता ।
    वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥

    कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन ।
    तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥

    ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी ।
    उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥

    ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां ।
    पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥

    पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें ।
    जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥

    वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा ।
    दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥

    बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी ।
    कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥

    साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन ।
    हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥

    कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही ।
    ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥

    एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार ।
    हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥७६॥

    यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला ।
    त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥

    परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना ।
    फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥

    फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी ।
    स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥

    हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त ।
    उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥

    तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला ।
    भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥

    पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी ।
    डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥

    कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर ।
    त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥

    जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी ।
    नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥

    परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे ।
    येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥

    घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी ।
    भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥

    यादव म्हणे मनांत । भिकारी हा लोचट बहुत ।
    नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥

    त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन ।
    सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥

    दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य ।
    फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥

    तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें ।
    तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥

    हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन ।
    आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥

    कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण ।
    श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥

    पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे ।
    श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥

    ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार ।
    तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥

    त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी ।
    रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥

    ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता ।
    कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥

    भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी ।
    होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥

    पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले ।
    तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥

    यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला ।
    तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥

    संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? ।
    कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥

    तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार ।
    माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥

    तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? ।
    ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥

    फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात ।
    तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥

    रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी ।
    यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥

    परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला ।
    ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥

    सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं ।
    फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥

    तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या ।
    विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥

    विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत ।
    तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥

    आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला ।
    तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥

    समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं ।
    निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥

    भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर ।
    त्याची तेल्हार्‍याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥

    म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला ।
    सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥

    गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची ।
    वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥

    बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं ।
    अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥

    तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित ।
    आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥

    ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत ।
    कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥

    आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों ।
    नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥

    बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डाँक्टर भला ।
    घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥

    रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी ।
    वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥

    तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला ।
    कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥

    गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार ।
    गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥

    म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला ।
    हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥

    खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत ।
    अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥

    तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण ।
    आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥

    काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला ।
    वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥

    तेल्हार्‍याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार ।
    मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥

    ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां ।
    कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥

    मी हमेश भाडें करतों । तेल्हार्‍याहून येथें येतों ।
    वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥

    बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले ।
    तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥२९॥

    मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य ।
    प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥

    बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला ।
    म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥

    हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण ।
    गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥

    तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला ।
    डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥

    गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर ।
    या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥

    तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें ।
    नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥

    हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली ।
    तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥

    हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार ।
    मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥

    सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला ।
    वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥

    मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें ।
    व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥

    आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा ।
    करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥

    समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत ।
    मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥

    संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी ।
    भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥

    दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी ।
    आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥

    एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार ।
    तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥

    त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला ।
    बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥

    दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें ।
    वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥

    मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना ।
    ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥

    वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी ।
    हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥

    शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर ।
    उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥

    ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां ।
    शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥

    येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार ।
    पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥

    दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ ।
    घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥

    हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें ।
    मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥

    ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं ।
    घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥

    आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास ।
    शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥

    तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला ।
    मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥

    माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत ।
    तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥

    अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन ।
    हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥

    पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी ।
    तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥

    अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी ।
    नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥

    त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला ।
    मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥

    नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी ।
    तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥

    समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? ।
    सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥

    दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत ।
    नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥

    दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा ।
    आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥

    कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची ।
    ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥

    ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर ।
    प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥

    लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी ।
    प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥

    मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती ।

    तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥

    तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर ।
    औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥

    थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला ।
    परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥

    चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी ।
    एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥

    वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती ।
    कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥

    मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला ।
    मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥

    तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं ।
    तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥

    पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत ।
    हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥

    तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी ।
    पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥७७॥

    निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव ।
    उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥

    रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा ।
    परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥

    वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार ।
    पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥

    औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत ।
    ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥

    त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी ।
    मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥

    वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें ।
    कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥

    कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य ।
    कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥

    कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार ।
    दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥

    औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले ।
    गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥

    पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत ।
    म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥

    कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें ।
    कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥

    तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी ।
    विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥

    वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन ।
    देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥

    माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची ।
    आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥

    तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान ।
    मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥

    तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य ।
    समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥

    गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया ।
    वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥

    खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची ।
    परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥

    समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर ।
    बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥

    हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी ।
    त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥

    बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें ।
    नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥

    हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना ।
    रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥

    ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन ।
    म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥

    कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं ।
    यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥

    पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण ।
    संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥

    श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा ।
    अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥

    मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर ।
    मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥

    त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें ।
    लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥

    ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं ।
    निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥

    तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें ।
    लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥

    त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन ।
    येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥

    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥

    शुभं भवतु ॥

    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥

    gajanan vijay granth adhyay 21

    अध्याय २१

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥

    जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा ।
    जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥

    देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास ।
    सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥

    पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य ।
    पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥

    म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी ।
    धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥

    म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा ।
    काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥

    तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन ।
    या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥

    सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत ।
    कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥

    तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई ।
    अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥

    पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा ।
    आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥

    कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजला करी ।
    दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥१०॥

    तुझ्यावांचून मजप्रत । नाहीं वशिला जगतांत ।
    अवघेंच तुझ्या हातांत । आहे कीं रे पांडुरंगा ॥११॥

    श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण ।
    तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१२॥

    एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची ।
    त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥१३॥

    बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर ।
    एक होता मजूर । हाताखालीं गवंड्यांच्या ॥१४॥

    तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकीं झोक गेला ।
    तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥१५॥

    तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला ।
    उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥१६॥

    परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत ।
    जैसा चेंडू झेलितात । तैसें त्यांचें जाहलें ॥१७॥

    सोपानसाह्यें ज्यापरी । जन उतरती भूमीवरी ।
    तेथें झालें त्याचपरी । त्या मजुराकारणें ॥१८॥

    मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला ।
    तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥१९॥

    पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी ।
    हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥२०॥

    अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा ।
    हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥२१॥

    या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें ।
    तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥२२॥

    असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची ।
    बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥२३॥

    तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयाचा दृष्टान्त झाला ।
    तूं या रामनवमीला । जाई शेगांवाकारणें ॥२४॥

    तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्‌गुरुनाथ ।
    ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥२५॥

    या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन ।
    रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥२६॥

    प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला ।
    अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥२७॥

    काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें ।
    खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥२८॥

    दीड फूट जाडीचा । पांच फूट लांबीचा ।
    प्रत्येक खांब दगडाचा । ऐसे होते किती तरी ॥२९॥

    उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें ।
    खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥३०॥

    श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला ।
    जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥३१॥

    त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं ।
    होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥३२॥

    म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया ।
    गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥३३॥

    तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला ।
    तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥३४॥

    तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? ।
    लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥३५॥

    दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी ।
    पाणी मुखांत घालोनी । लोबोकडे पाठविलें ॥३६॥

    ही लोबो डाँक्टरीण । शस्त्रविद्येंत अतिप्रवीण ।
    ही जातीनें ख्रिश्चन । भक्त येशू ख्रिस्ताची ॥३७॥

    तिनें ह्या रजपूतिणीला । रीतीप्रमाणें उपचार केला ।
    लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥३८॥

    हें आश्चर्य खरोखर । खांब दगडाचा होता थोर ।
    त्याच्या खालीं शरीर । सुरक्षित रहावें कसें ॥३९॥

    आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला ।
    हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥४०॥

    खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं ।
    त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥४१॥

    बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत ।
    नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामीचा ॥४२॥

    ऐसेंच एका उत्सवाची । नाईक नवर्‍याच्या मस्तकांसी ।
    सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥४३॥

    तोही गोल थोर होता । परी स्वामीची अगाध सत्ता ।
    कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥४४॥

    पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा ।
    परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥४५॥

    एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी ।
    ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥४६॥

    भूक लागलि मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? ।
    ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥४७॥

    पाटील मूळचा भाविक । त्याची वाटलें कौतुक ।
    गोसाव्याची ऐकून हांक । दारामाजीं पातला ॥४८॥

    निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी ।
    स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥४९॥

    गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत ।
    दिला बसण्या पाट । पूजा केली पायांची ॥५०॥

    गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला ।
    कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥५१॥

    कर्जाची न चिंता करी । तें फिटून जाईल निर्धारीं ।
    अरे उन्हाळ्यांत गोदावरी । थोडी कोरडी पडतसे ॥५२॥

    तैसाच हाही प्रकार । संपन्नतेचा येईल पूर ।
    कृपाघन वर्षल्यावर । श्रीहरीचा समज हें ॥५३॥

    उष्टें माझे जें ठायीं । पडेल बापा तें ठाईं ।
    कशाचेंही कधीं पाही । कमी नाहीं पडणार ॥५४॥

    आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन ।
    मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥५५॥

    पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा ।
    तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥५६॥

    परी तो याचक । आधीं पाहिजे शुद्ध देख ।
    त्यावांचून हें कौतुक । होणार नाहीं कधींही ॥५७॥

    आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं ।
    पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥५८॥

    तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला ।
    तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥५९॥

    तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं ।
    ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥६०॥

    समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना ।
    योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥६१॥

    तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी ।
    तीही होईल बापा परी । ही दक्षणा दिल्यानें ॥६२॥

    बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत ।
    बांधितों म्हणजे चेटूकभूत । याचीन बाधा होय त्यासी ॥६३॥

    का कीं ही जमेदारी । कठीण आहे भूमीवरी ।
    पाण्याशींच पाणी वैरी। ये ठाईं होत असे ॥६४॥

    पाटीलकीचें तुझें वतन । हें वाघाचें पांघरुण ।
    त्याचा उपयोग करणें जाण । अति जपून रामचंद्रा ॥६५॥

    द्वेषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये ।
    राजाविरुद्ध जाऊं नये । उगीच भलत्या कामांत ॥६६॥

    साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून ।
    दांभिकांच्या नादीं जाण । कदापीही लागूं नये ॥६७॥

    हीं व्रतें पाळल्यास । तुझा ऋणी श्रीनिवास ।
    होईल या वचनास । असत्या माझ्या मानूं नको ॥६८॥

    आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी ।
    साधुसंत येतां घरीं । विन्मुख त्याला लावूं नये ॥६९॥

    अपमान खर्‍या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा ।
    होतसे बापा साचा । संतचरणीं प्रेमा धरीं ॥७०॥

    आपल्या वंशजाचें उणें । पाहूं नये कदा मनें।
    सोयर्‍याधायर्‍यांकारणें । समयानुसार मान द्यावा ॥७१॥

    कोप असावा बाह्यात्कारी । दया असावी अंतरीं ।
    जैसें का तें फणसावरी । कांटे आंत गोड गरे ॥७२॥

    मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस ।
    ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥७३॥

    दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला ।
    पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥७४॥

    पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार ।
    हा गोसावी कोणी इतर । नसावा ऐसें वाटतें ॥७५॥

    श्रीगजाननस्वामी मला । आले उपदेश करायाला ।
    घेऊन गोसावीवेषाला । हें आतां समजलें ॥७६॥

    रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन ।
    ऐसें स्वामीगजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥७७॥

    श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र ।
    अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥७८॥

    या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका ।
    वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥७९॥

    प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन ।
    केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥८०॥

    माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी ।
    देवीदासाच्या सदनापासीं । दिसते झाले प्रथमतः ॥८१॥

    बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर ।
    त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥८२॥

    कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य ।
    गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥८३॥

    पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला ।
    बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥८४॥

    कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला ।
    गांजाचा श्रीसमर्थाला । पाजण्याचा विबुध हो ॥८५॥

    त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली ।
    तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥८६॥

    जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें ।
    देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥८७॥

    मृत्यूचे ते प्रकार । तेथें कथिले सविस्तर ।
    विठोबासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥८८॥

    कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही ।
    जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥८९॥

    किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य ।
    सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥९०॥

    त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत्‌ केले चिंचवण्याला ।
    जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥९१॥

    होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले ।
    तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥९२॥

    चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला ।
    शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥९३॥

    कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत ।
    बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनियां ॥९४॥

    गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली ।
    महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥९५॥

    हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला ।
    महाराजासी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥९६॥

    समर्थासी आणले परत । कांहीं दिवस राहून तेथ ।
    पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥९७॥

    कोरड्या ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला ।
    एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरड्या विहिरी ठायीं ॥९८॥

    भास्कराची उडवलि भ्रांती। घेऊन आले तयाप्रती ।
    शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥९९॥

    षष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्‌गुरुनाथा ।
    मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥१००॥

    गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत ।
    पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥१॥

    बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची ।
    घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥२॥

    नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला ।
    जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥३॥

    कांहीं दिवस राहिले । अकोटामाजीं भले ।
    नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥४॥

    चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं ।
    कृपा व्रजभूषणावरी । केली असें जाऊन ॥५॥

    मारुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत ।
    समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥६॥

    गांवींची पाटीलमंडळी । अवघी आडदांड होती भली ।
    हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थाबरोबर ॥७॥

    हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले ।
    मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुताला ॥८॥

    उंसाचा चमत्कार । दाऊनियां साचार ।
    अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥९॥

    भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत ।
    आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥११०॥

    ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही ।
    निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटीलमंडळींची ॥११॥

    कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत ।
    अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥१२॥

    खंडूवरी बालंट आलें। तें समर्थांनीं नासिलें ।
    निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥१३॥

    तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला ।
    आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥१४॥

    कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी ।
    मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥१५॥

    ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानविरहित केला ।
    "नैनं छिन्दन्ति" श्र्लोकाला । रहस्यासह सांगून ॥१६॥

    जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर ।
    न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्‍या संताला ॥१७॥

    कथा नवमाध्यायाला। द्वाड घोडा शांत केला ।
    खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥१८॥

    दासनवमीचे उत्सवासी। समर्थ बाळापुरासी ।
    घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥१९॥

    बाळकृष्णालागून । करविलें समर्थाचें दर्शन ।
    संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥१२०॥

    दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक ।
    उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥२१॥

    गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पाईं ।
    भावभक्तीनें लवलाही । श्रीगजाननस्वामीच्या ॥२२॥

    गणेश दादा खापडर्याला । शुभ आशीर्वाद दिधला ।
    छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥२३॥

    द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची ।
    दांभिक भक्ति घुड्याची । कशी ती कथन केली ॥२४॥

    एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान ।
    आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥२५॥

    झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी ।
    येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥२६॥

    निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला ।
    द्वारकेश्वरासन्निध भला । सतीबाईचे शेजारीं ॥२७॥

    आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला ।
    वांचविले गणु जवर्‍याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥२८॥

    शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची ।
    मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥२९॥

    स्वामीचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला ।
    स्वइच्छेनें येता झाला । परमभक्त होता जो ॥१३०॥

    पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी ।
    वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविलीं ॥३१॥

    पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ ।
    नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥३२॥

    विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी ।
    महाराज नव्या मठासी। आले जुन्या मठांतून ॥३३॥

    झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला ।
    पर्जन्यानें घोटाळा । भंडार्‍याचा केला असे ॥३४॥

    झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली ।
    पुंडलिकाची निमाली । गांठ प्लेगची श्रीकृपें ॥३५॥

    कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा ।
    हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥३६॥

    बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें ।
    कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥३७॥

    नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास ।
    नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥३८॥

    विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला ।
    या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥३९॥

    अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा ।
    आले अकोले नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥१४०॥

    भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला ।
    मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण करायाकारणें ॥४१॥

    श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झाले उपदेश ।
    नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥४२॥

    कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी।
    जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥४३॥

    पादुकाचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला ।
    कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥४४॥

    छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा ।
    ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥४५॥

    सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास ।
    जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥४६॥

    नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं ।
    केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥४७॥

    महताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला ।
    हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥४८॥

    बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची ।
    भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥४९॥

    कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची ।
    कवर डाँक्‍टरच्या फोडाची । कथा यांत ग्रथित असे ॥१५०॥

    महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला ।
    तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥५१॥

    कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी ।
    त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥५२॥

    एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठून मेलेला ।
    दाऊन त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥५३॥

    कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी ।
    आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येता दर्शना ॥५४॥

    गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला ।
    श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥५५॥

    त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत ।
    परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥५६॥

    धार-कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत ।
    समर्थासी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥५७॥

    श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति ।
    दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतातें ॥५८॥

    तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला ।
    तो समर्थांनीं निवटिला । करुनियां उपदेश॥५९॥

    केलें खळ्याचें संरक्षण । गाढवाचे पासून ।
    समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरीं ॥१६०॥

    गजाननाचे कृपें भलें । जाखड्याचें लग्न झालें ।
    कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥६१॥

    तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला ।
    नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥६२॥

    पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन ।
    महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥६३॥

    पुढें भाद्रपदमासासी । ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं ।
    आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्त जहाला ॥६४॥

    विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर ।
    जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥६५॥

    जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी ।
    दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥६६॥

    आतां हा एकविसावा । अवघ्या कथेचा कळस बरवा ।
    अवघ्यांचा लेखावा । तुम्ही सार श्रोते हो ॥६७॥

    प्रत्यक्षापरी प्रकार । येथें होती वरच्यावर ।
    म्हणून म्हणणें आहे सार । अवघ्यांचें या अध्याया ॥६८॥

    वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें ।
    मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥६९॥

    ऐसें भव्य सुंदर । काम कोठें न भूमीवर ।
    धर्मशाळा चौफेर । चहूं बाजूंनीं बांधिल्या ॥१७०॥

    या भव्य कामाला । बहुतांनीं हात लाविला ।
    त्यांचीं नांवें तुम्हांला । सांगतां ग्रंथ वाढेल ॥७१॥

    मुख्य जे होते त्यांतून । त्यांचीं नांवें करितों कथन ।
    कुकाजीचा नंदन । हरी पाटील नाम ज्याचें ॥७२॥

    सांगवी गांवचा बनाजी । उमरीचा तो गणाजी ।
    बटवाडीचा मेसाजी । लाडेगावचा गंगाराम ॥७३॥

    भागू, नंदू, गुजाबाई । अकोल्याची बनाबाई ।
    सुकदेव पाटलाची ती आई । यांनीं हजारों रुपये दिले ॥७४॥

    पाटील रामचंद्र कृष्णाजी । दुसरा दत्तु भिकाजी ।
    पळसखेडचा सुखदेवजी । मार्तन्ड गणपती शेगांवचा ॥७५॥

    बालचंद्राचा रतनलाल । पंचगव्हाणचा दत्तुलाल ।
    त्याच गांवींचा बिसनलाल । अंबरसिंग टाळकीचा ॥७६॥

    किसन बेलमंडळेकर । विठोबा पाटील चावरेकर ।
    हसनापुरचा राहणार । गंगाराम नाम ज्याचें ॥७७॥

    या दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनी ।
    केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥७८॥

    कोठया कचेरी स्वैंपाकघरें । सोपे उत्तम प्रकारें ।
    बांधिले असती साजिरे । समाधीच्या चौफेर ॥७९॥

    लोकांनीं ज्या देणग्या दिल्या । त्या बांधकामीं जिरुन गेल्या ।
    परी पुष्कळ गोष्टी राहिल्या । बांधण्याच्या अवशेष ॥१८०॥

    त्यासाठीं युक्ति केली । वर्गणी जमवण्यासाठीं भली ।
    योजना ती ऐशी झाली । ती ऐका विबुध हो ॥८१॥

    बसविला शेतसार्‍यावर । समर्थांचा धार्मिक कर ।
    कोणासी न करितां जोर । रुपयामागें एक आणा ॥८२॥

    तैशीच बाजारपेठेशीं । धान्य अथवा कपाशी ।
    जी येईल विकायासी । पट्टी बसविली त्यावर ॥८३॥

    गाडीमागें अर्धा आणा । हर्ष वाटे देतांना ।
    कां कीं समर्थांच्या चरणां । निष्ठा होती सर्वांची ॥८४॥

    समाधीपुढें स्वाहाकार । होऊन गेले अपार ।
    परी त्यांतून मोठे चार । सर्वश्रुत जाहले ॥८५॥

    शतचंडीचें अनुष्ठान । ब्राह्मणांच्या करवीं जाण ।
    केलें आदरेंकरुन । किसनलाल शेठजीनें ॥८६॥

    अनुष्ठान शतचंडीचें । करणें अति अवघड साचें ।
    अधिकशून्य ना खपायाचें । जगदंबे कालिकेस ॥८७॥

    कांहीं चुकतां विधानांत । तात्काळ होतें विपरीत ।
    काम्य अनुष्ठानाप्रत । भीति चहूं बाजूंनीं ॥८८॥

    वडील किसनलालाचा । बंकटलाल नांवाचा ।
    भक्त होता समर्थांचा । एकनिष्ठ पहिल्यापून ॥८९॥

    पूर्ण आहुतीच्या दिवशीं । त्या बंकटलाल भक्तासी ।
    व्याधि उद्भवली शरीरासी । प्राणांताचा समय आला ॥१९०॥

    लोक गेले घाबरुन । म्हणती हें काय आलें विघ्न ।
    शतचंडीचें अनुष्ठान । करतां विपरीत व्हावें कां ? ॥९१॥

    बंकटलाल म्हणे पुत्रासी । भिऊं नकोस मानसीं ।
    माझा तारिता पुण्यरासी । समाधीसी बसलासे ॥९२॥

    तो अवघें करील बरें । नका होऊं बावरें ।
    पूर्ण आहुतीचें काम सारें । घ्यावें सशास्त्र उरकून ॥९३॥

    माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न ।
    भक्ताचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥९४॥

    तेंच पुढें सत्य झालें । व्याधीचें स्वरुप मावळलें ।
    एका बाईचें निमालें । भूत शतचंडींत या ॥९५॥

    बनाजी तिडके सांगवीकर । यांनीं केला स्वाहाकार ।
    कसुर्‍याची रहाणार । गुजाबाई नाम जिचें ॥९६॥

    चापडगांवींचा वामन । शामरावाचा नंदन ।
    यांनींही एक यज्ञ । केला समाधीच्या पुढें ॥९७॥

    ऐसीं धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थासमोरी ।
    खरे खरेच साक्षात्‌कारी । श्रीगजाननमहाराज ॥९८॥

    यावत्‌ कालपर्यंत । लोक होते निष्ठावंत ।
    तावत्‌ कालपर्यंत । वर्‍हाड होता सुखी बहु ॥९९॥

    जसजसी निष्ठा कमी झाली । तों तों विपन्न दशा आली ।
    अवदसेनें घातली । माळ कंठीं वर्‍हाडाच्या ॥२००॥

    विपुल पिकणें टाकिलें । काश्यपीनें पहा भले ।
    नवे वाहूं लागले । वारे सर्व वर्‍हाडांत ॥१॥

    वर्‍हाडाची ऐसी दैना । समर्थांसी पाहवेना ।
    म्हणून घेतलें आपणां । कोंडोनीं त्यांनीं जलांत ॥२॥

    तीस फुटांपासून । पाया आणिला भरुन ।
    तेथेंच कां हें जीवन । निर्माण व्हावें श्रोते हो ॥३॥

    म्हणून ऐसें वाटतें । राग आला समर्थांतें ।
    म्हणून त्यांनीं जलातें । भोंवतीं केलें निर्माण ॥४॥

    सुखसंपन्न पहिल्यापरी । वर्‍हाड व्हावा निर्धारी ।
    ऐसें चित्तांत असल्या जरी । या वर्‍हाडी जनांच्या ॥५॥

    तरी त्या अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं ।
    पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥६॥

    ऐसें न जरी करतील । तरी याहीपेक्षां येईल ।
    वर्‍हाडासी बिकट काळ । याचा विचार करा हो ॥७॥

    गजाननपदीं निष्ठा ठेवा । सुख-अनुभव सर्वदा घ्यावा ।
    कुतर्कासी मुळीं न द्यावा । ठाव आपुल्या मानसीं ॥८॥

    या गजाननरुप जमिनींत । जें जें कांहीं पेराल सत्य ।
    तें तें मिळणार आहे परत । बहुत होऊन तुम्हांला ॥९॥

    दाणे टाकिल्या खडकावरी । त्यांचीं न रोपें होतीं खरीं ।
    याचा विचार अंतरीं । सर्व काळ करा हो ॥२१०॥

    कंटाळा संतसेवेचा । ज्या ज्या प्रांता येत साचा ।
    त्या त्या प्रांतीं दुष्काळाचा । प्रादुर्भाव होतसे ॥११॥

    धर्मश्रद्धा ही वाघीण । गेल्या मनरुपी दरींतून ।
    दुर्वासनेचे कोल्हे जाण । येऊन बसतील ते ठायां ॥१२॥

    भक्ति शुचिर्भूत अंगना । अभक्ति वारांगना ।
    तिच्या नादीं लागल्या जाणा । विटंबनाच सर्वत्र ॥१३॥

    सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका ।
    शत्रु न माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ॥१४॥

    ऐसें तुम्ही वागल्यास । येतील चांगले दिवस ।
    या वर्‍हाड प्रांतास । हें कधींहि विसरुं नका ॥१५॥

    एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन ।
    एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१६॥

    हा एकवीस अध्यायांचा । गजाननविजय नांवाचा ।
    नैवेद्य एकवीस मोदकांचा । गजाननासी अर्पा हो ॥१७॥

    वा हे अध्याय साचार । माना एकवीस दुर्वांकुर ।
    पारायणरुपें निरंतर । वाहाव्या गजाननासी ॥१८॥

    सद्‌भाव जो मानवाचा । तोच दिवस चतुर्थीचा ।
    प्रेमरुपी चंद्राचा । उदय झाला पाहिजे ॥१९॥

    मग या ग्रंथाचें अक्षर । एकेक हें दुर्वांकुर ।
    अर्थ शब्दाचा साचार । मोदक समजा विबुध हो ॥२०॥

    तो अर्पून गजानना । पारायणरुपी पारणा ।
    साधून घ्यावा करा ना । वेळ आतां थोडकाही ॥२१॥

    हा ग्रंथ ना कादंबरी । ती गजाननाची लीला खरी ।
    येथें जो अविश्वास धरी । तो बुडेल निःसंशय ॥२२॥

    श्रीगजाननस्वामी चरित्र । जो नियमें वाचील सत्य ।
    त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥२३॥

    हें गजाननचरित्र भागीरथी । कथा या तोय निश्चिती ।
    महाराष्ट्र ओंव्या तयावरती । लहरी समजा विबुध हो ॥२४॥

    वा कल्पवृक्ष हें स्वामीचरित्र । शाखा अध्याय तयाप्रत ।
    पद्मरचना हीच सत्य । पालवी या वृक्षाची ॥२५॥

    जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव ।
    संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥२६॥

    हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी ।
    दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥२७॥

    जेथें गजाननचरित्राचा । पाठ होईल नित्य साचा ।
    तेथें वास लक्ष्मीचा । चिरकाल होईल हो ॥२८॥

    दारिद्रयासी मिळेल धन । रोगीयासी आरोग्य जाण ।
    साध्वी स्त्रीचें वांजपण । फिटेल याच्या वाचनें ॥२९॥

    निपुत्रिकासी होईल पुत्र । निष्कपटी मिळेल मित्र ।
    चिंता न राहील अणुमात्र । या ग्रंथाच्या वाचका ॥२३०॥

    दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला ।
    अनुपम येईल भाग्य त्याला । श्रीगजाननकृपेनें ॥३१॥

    गुरुपुष्य योगावरी । जो याचें पारायण करी ।
    बसून एक्या आसनावरी । राहूनियां शुचिर्भूत ॥३२॥

    त्याच्या अवघ्या मनकामना । खचित होतील पूर्ण जाणा ।
    कसल्याही असोत यातना । त्या त्याच्या निरसतील ॥३३॥

    जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत ।
    लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्म समंधाचा ॥३४॥

    ऐसें याचें महत्त्व । ये भाविकाला प्रचीत ।
    कुटिलदुष्टदुर्जनांप्रत । याचा अनुभव येणें नसे ॥३५॥

    मानसाची योजना । राजहंसासाठीं जाणा ।
    तैसें हें संतसज्जनां । मानस स्वामीचरित्र ॥३६॥

    पूर्वकालीं ज्ञानेश्वर । मीरा मेहता कबीर ।
    नामा सांवता चोखा महार । गोरा बोधला दामाजी ॥३७॥

    उंबरखेडी ऐनाथ । सखाराम अंमळनेरांत ।
    वा देव मामलेदार यशवंत । वा हुमणाबादी माणिकप्रभू ॥३८॥

    तेवींच हा वर्‍हाडांत । गजाननस्वामी सद्‌गुरुनाथ ।
    फरक नाहीं यत्किंचित । त्यांच्या यांच्या मधीं हो ॥३९॥

    आतां हीच विनंति । तुम्हां अवघ्यां भाविकांप्रती ।
    अत्यंत असूं द्यावी प्रीति । श्रीगजाननांचे चरणीं ॥२४०॥

    म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार ।
    होऊनियां व्हाल पार । दुस्तर भवामधूनी ॥४१॥

    आतां स्वामी दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।
    दासगणूच्या यातना । सकल निवारी कृपेनें ॥४२॥

    मी तुझा झालों भाट । मार्ग दावी मला नीट ।
    दुर्वासनेचा येतो वीट । चित्तामाजीं दयाळा ! ॥४३॥

    आमरण वारी घडो । संतचरणीं प्रेमा जडो ।
    अक्षय्यीचा वास घडो । श्रीगोदेच्या तीराला ॥४४॥

    प्रसंग याचना करण्याचा । मशीं नको आणूंस साचा ।
    समर्था दासगणूचा । अभिमान वाहावा मानसीं ॥४५॥

    मी सकल संतांचा चरणरज । माझी राखा तुम्ही लाज ।
    हेंचि मागणें आहे आज । पदर पसरुन तुम्हांतें ॥४६॥

    जैसी केलीस प्रेरणा । तैसेंच मी वदलों जाणा ।
    हे स्वामी गजानना ! । तुझें चरित्र लिहितां कीं ॥४७॥

    शेगांवचे मठांत । कांहीं होतें कागदपत्र ।
    ते रतनसातें मजप्रत । आणूनियां दाखविले ॥४८॥

    त्यांच्या आधारें ग्रंथ लिहिला । कल्पनेच्या ना उपयोग केला ।
    म्हणून अधिक न्यूनाला । मी नाहीं कारण ॥४९॥

    झालें असल्या अधिकऊन । त्याची क्षमा गजानन ।
    करो सर्वदा मजलागून । हीच आहे विनंती ॥२५०॥

    शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत ।
    चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥

    हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला ।
    तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥

    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥२५३॥

    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

    ॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥

    ॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥

    ॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥

    ॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥

    ॥समाप्त॥

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या